राज्यातील सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वन करण्याबाबत नियोजन सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
15-Aug-2022
Total Views | 85
]
मुंबई(प्रतिनिधी): कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे हे सागरी किनाऱ्यालगतच्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगार देखील मिळेल. हे लक्षात घेता येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणण्यासाठी नियोजन सुरू आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रालयात देशाच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
जुलै महिन्यात पार पडलेल्या कांदळवन कक्षाच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्राबाबत घोषणा केली होती. राखीव वन अधिसूचित करण्याबाबत राज्य सरकारचे नियोजन सुरू आहे असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दि. १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात सांगितले. यंदा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव सुरू आहे, या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. नुकताच ठाणे खाडी परिसराला 'रामसर स्थळा'चा दर्जा मिळाला आहे. यामुळे, पर्यटनाला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. महाराष्ट्रात आता तीन रामसर स्थळे अधिसूचित आहेत. शहरी भागातील एकेमेव असा 'ठाणे खाडी परिसर' हा 'रामसर स्थळां'च्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. या सोबतच आता भारत देशात ७५ रामसर स्थळे अधिसूचित आहेत. रविवारी राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले. पर्यावरण मंत्रालयाची धुरा खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे. कांदळवने अधिसूचित करण्याबाबत लवकरच निर्णय होईल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.