नवी दिल्ली: भारतात हिंसाचार घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी आता बिहारला आपला नवा अड्डा तयार केल्याचे वृत्त आहे. यासाठी बिहारमध्ये तीन मॉड्यूल्स एकाचवेळी काम करत आहेत. नेपाळ सीमेपासून दिल्लीपर्यंत ‘टेरर कॉरिडॉर’ तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
तिन्ही मॉड्यूल्सची काम करण्याची पद्धती वेगवेगळी आहे, पण उद्देश भारताला उद्ध्वस्त करण्याचा आहे. भारताच्या विध्वंसाच्या योजनेवर काम करणार्यांत ‘सिमी’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेची अद्ययावत आवृत्ती सामील असून, ’पीएफआय’शी संबंधितांना बरोबर घेऊन ती आपल्या मनसुब्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत होती.
उघडकीस आलेल्या फुलवारी शरीफ टेरर मॉड्यूलचा उद्देश सर्वाधिक धोकादायक होता. ‘सिमी’च्या जुन्या सदस्यांच्या मदतीने २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याच्या उद्देशाने ‘पीएफआय’ बिहारमध्ये आपले संघटन आणि जाळे आणखी बळकट करण्यासाठी काम करत होती. इथून अटक केलेल्या अतहर परवेझला ’टॅलेंट सर्च प्रोग्रॅम’चे काम सोपवण्यात आले होते. त्याच्या आडून डिबेट आणि सेमिनार विविध मदरसे आणि अन्य ठिकाणी होत होते. त्याद्वारे ज्यांचे विचार कट्टरपंथीयांच्या विचारांशी जुळतील, अशा लोकांचा शोध घेतला जात असे. नंतर त्या लोकांचे ‘ब्रेन वॉश’ केले जात असे.
भारतात हिंसाचार घडवण्यासाठी काम करणार्या दहशतवादी संघटनांच्या ‘सिमी’च्या अद्ययावत आवृत्तीच्या ‘टेरर ग्रुप-१’चे काम जिहादसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना तयार करण्याचे आहे. त्याचा उद्देश २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा आहे. दि. १२ जुलैला पाटण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधी फुलवारी शरीफमधून अतहर परवेझ आणि मोहम्मद जलालुद्दीनला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात २६ संशयितांविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे.
‘गझवा-ए-हिंद’ या ‘टेरर ग्रुप-२’चे काम देशभरात ‘आयएसआय’चे मोठे जाळे उभे करण्याचे आहे. त्याचा उद्देश २०२३ मध्ये मोठा हिंसाचार घडवून देशाला दुबळे करण्याचा आहे. ‘एटीएस’ने दि. १४ जुलैला फुलवारी शरीफमधून मरगुब अहमद दानिशची अटक करत पाकिस्तानशी असलेल्या संबंधांचा खुलासा केला होता. ‘गझवा-ए-हिंद’च्या माध्यमातून भारतात ‘जिहाद’ची मोठी योजना या ग्रुपने आखली होती.
‘जमात-ए-मुजाहिद्दीन’ या ‘टेरर ग्रुप-३’चे काम मोठ्या योजनेंतर्गत देशात ‘जिहाद्यां’ची निर्मिती करण्याचे होते. त्याचा उद्देश ‘जिहाद्यां’कडून देशात दहशतवादी हल्ले करण्याचा होता. मध्य प्रदेशात ‘जमात-ए-मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर दि. २० जुलैला ‘एनआयए’ने बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये तीन ठिकाणी छापेमारी केली. यावेळी मौलाना असगर अलीला अटक करण्यात आली.
बिहारला केले ‘जिहाद हब’
‘सिमी’चे माजी सदस्य आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित काही लोक बिहारमध्ये भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत होते. पूर्वेकडूनपश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बिहारचे चार विभाग करुन ते भारतविरोधी योजना तयार करत आहेत. राज्याच्या ३८ जिल्ह्यांसह नेपाळ सीमेपासून शेजारी राज्यांना आपल्या परिघात आणण्यासाठी बिहारला जिहादचे जागतिक केंद्र तयार करण्यात आले. पाटण्यातून नेपाळशी संपर्क साधण्यासाठी सहा जिल्ह्यांचा विशिष्ट भाग तयार करण्यात आला.
कसे आहे जिहादी जाळे?
जिहाद्यांनी बिहारमध्ये १५ पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरांची उभारणी केली आहे. त्यातील २६ जणांची नावे समोर आली असून त्यापैकी चार संशयितांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान, या सगळ्या दहशतवादी जाळ्यात ‘सिमी’चे नावही प्रामुख्याने समोर येत आहे. या संघटनेची स्थापना १९७७ साली उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये करण्यात आली होती. २००२ साली ‘सिमी’वर बंदी घालण्यात आली. ‘सिमी’चा उद्देश भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा होता. नेपाळ सीमेवर बर्याचदा ‘सिमी’च्या दहशतवाद्यांना अटक केले जाते.
सीमेपार नेपाळमध्ये काम
सीमेपार नेपाळमध्ये या संघटना स्वतःला मजबूत करत मोठ्या प्रमाणावर पाठीराखे तयार करत आहेत. बिहारला लागून असलेल्या नेपाळी भागात ते आपले जिहादी केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र चालवत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नेपाळच्या सीमावर्ती भागात २० जिहादी केंद्रांची ओळख पटवण्यात आली आहे. सुरक्षा संस्थांच्या मते नेपाळमध्ये ‘मुस्लीम वर्ल्ड लीग’ आणि ’द ऑर्गनायझेशन ‘वर्ल्ड असेम्ब्ली ऑफ मुस्लीम युथ पीएफआय’ला थेट सहकार्य करत आहे. इतकेच नव्हे, तर या संघटना भारत-नेपाळ सीमेवर प्रामुख्याने मुस्लीम समुदायातील लोकांना वसवण्याचे काम करत आहे. या योजनेला ‘मिशन आबाद’ नाव देण्यात आले आहे.
नेपाळच्या खुल्या सीमेमुळे धोका
भारताला लागून असलेली नेपाळ सीमा खुली असल्याने तिने बिहारला दहशतवाद्यांच्या येण्या-जाण्याचे केंद्र केले आहे. बिहारमध्ये नेपाळ सीमेवरुन कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला अटक करण्यात आलेली आहे.
‘सिमी’च्या सदस्यांची साथ
सुरक्षासंस्थांनी केलेल्या चौकशीतून ‘पीएफआय’च्या संपर्कात बंदी घातलेल्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेचे लोक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना मदत करत आहेत. अतहर परवेझने याचा खुलासा केला असून ‘सिमी’च्या लोकांची मदत करत असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार एक नवी संघटना उभी करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सिमी’सारख्या लढवय्यी आणि दहशतवादी घटना प्रत्यक्षात आणणार्या संघटनेची बांधणी करण्यात येत आहे.
नव्या दहशतीच्या सावटाखाली बिहार
जिहाद्यांचे जाळे नुपूर शर्मा आणि त्यांच्यासारख्या अन्य लोकांच्या समर्थकांचा हे जिहादी जाळे शोध घेत आहे. पोलिसांची चौकशी आणि वृत्तपत्राच्या वृत्तानुसार दहशतवादी हल्ल्यापेक्षा ‘स्पॉट अटॅक’चे कारस्थान रचण्यात आले होते. जे लोक इस्लामविरोधात बोलतात, त्यांना लक्ष्य करण्याचे या ‘जिहाद्या’ंचे उद्दिष्ट होते. त्यानुसार बिहारमध्ये एका युवकावर चाकूने हल्लादेखील करण्यात आला होता.
बिहारमधील दहशतवाद्यांना कतारमधून मिळायची ‘क्रिप्टोकरन्सी’
बिहारमधील दहशतवाद्यांना कतारमधून ‘क्रिप्टोकरन्सी’च्या माध्यमातून निधी मिळायचा, अशी माहिती फुलवारी शरीफ दहशतवादी मॉड्यूल प्रकरणाचा तपास करताना समोर आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. फुलवारी शरीफ येथील रहिवासी असलेल्या मरगुब अहमद दानिशला ‘गझवा-ए-हिंद’ आणि ‘डायरेक्ट जिहाद’ हे दोन ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. कतार येथील ‘अल्फाल्ही’ या संस्थेकडून ‘क्रिप्टोकरन्सी’च्या रूपात दानिशला निधी मिळाल्याचे पुरावे तपासादरम्यान गोळा करण्यात आले आहेत, असे अधिकार्याने सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात ‘एनआयए’ करीत आहे. पाकिस्तानातील कट्टरवादी संघटना ‘तेहरिक-ए-लब्बैक’सोबत दानिश संपर्कात होता, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. याव्यतिरिक्त तो फैझान नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कातही होता, असे अधिकार्याने सांगितले. ‘गझवा-ए-हिंद’ या ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’वर राष्ट्रध्वज व चिन्हाचा अनादर करणारे संदेश प्रसारित करण्यात आल्याचे तपासात आढळले. दानिश या ग्रुपचा ‘अॅडमिनिस्ट्रेटर’ होता आणि इतर अनेक विदेशी ग्रुपच्या तो संपर्कात होता. तीन जणांना अटक करून पोलिसांनी या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता.
बिहार-नेपाळ सीमेवर ‘युरेनियम’ची तस्करी पकडल्याने खळबळ
बिहार पोलिसांनी नेपाळमधून भारतात आणले जाणारे ‘युरेनियम’ ताब्यात घेतले असून यातून दहशतवाद्यांच्या मोठ्या कारस्थानाचा खुलासा झाला आहे. अररिया जिल्ह्यापासून जवळ नेपाळ सीमेजवळ दोन किलो ‘युरेनियम’ ताब्यात घेण्यात आले, तसेच 15 तस्करांना अटक करण्यात आले. स्फोटक शस्त्रांच्या निर्मितीत ‘युरेनियम’चा वापर केला जाणार होता. ‘युरेनियम’चा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासाठीदेखील केला जातो. मोरंगचे पोलीस अधीक्षक शांतिराज कोइराला म्हणाले की, “हे तस्कर नेपाळची राजधानी काठमांडूहून ‘युरेनियम’ घेऊन चालले होते. त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. सध्या तरी हे युरेनियम कुठून आणले आणि कुठे घेऊन चालले होते, हा चौकशीचा विषय आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान, एक किलो युरेनियमपासून २४ मेगावॅट ऊर्जेचा बॉम्ब तयार केला जाऊ शकतो. तर १९४५ साली अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये ६४ किलो युरेनियम वापरले होते. अशात दोन किलो ‘युरेनियम’ सापडणे मोठी गोष्ट आहे. ते चुकीच्या हातात पडण्याचा धोका सरकार घेऊ शकत नाही. ‘युरेनियम’पासून अणुबॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान दहशतवादी संघटना व सर्वच देशांकडे नाही, हेही खरेच. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात ‘युरेनियम’ आढळल्याने चिंतेचा विषय मानले जात आहे.