सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचा गदारोळ, संसदेचे कामकाज ठप्प

    20-Jul-2022
Total Views | 68
Parliament's work
 
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेत सुरळीत कामकाज होऊ शकले नाही.
 
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १८ जुलैपासून प्रारंभ झाला. मात्र, १८ तारखेपासून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळा घालण्यास प्रारंभ केला आहे. अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीदेखील हा गदारोळ कायम असल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी २ तर लोकसभेचे कामकाज दुपारी ४ वाजेनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
 
 
संसद ठप्प होण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. ते म्हणाले, काँग्रेसला विधायक चर्चेत रस नसून केवळ अशांतता निर्माण करायची आहे. महागाईच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेची मागणी काँग्रेस करत असून, सरकार ते मान्य करत नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, महागाईसह अन्य सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकारची तयारी आहे. तसे विरोधी पक्षांच्या नेत्यांना वेळोवेळी सांगण्यात आले आहे. महागाईच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर सविस्तर उत्तर देणार असल्याचेही जोशी यांनी यावेळी सांगितले.
 
 
माओवादी हिंसाचारात घट – केंद्रीय गृह मंत्रालय
डाव्या विचारांच्या माओवादी संघटनांकडून होणाऱ्या हिंसाचारात मोठी घट झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली. ते म्हणाले, डाव्या माओवाजी संघटनांकडून होणाऱ्या हिंसाचारात ७७ टक्क्यांनी घट झाली आहे. देशात अशा प्रकारच्या हिंसाचाराचे प्रमाण २००९ मध्ये सर्वाधिक होते, त्यावर्षी २ हजार २५८ हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यातुलनेत २०२१ साली केवळ ५०९ घटना घडल्या आहेत. गेल्या बारा वर्षात माओवादी, नक्षलवादी संघटनांकडून झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचप्रमाणे हिंसाचाराच्या घटनांमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली. या मृत्यूंमध्ये ८५ टक्क्यांनी घट झाली असून सन २०१० मध्ये १००५ मृत्यू झाले होते तर सन २०२१ मध्ये १४७ मृत्यूंची नोंद झाल्याचे राय यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
राहुल गांधी संसदेत गोंधळ घालणाऱ्यांचे म्होरके – स्मृती ईराणी
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी संसदेत गदारोळ घालणाऱ्या काँग्रेसला लक्ष्य करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका केली. त्या म्हणाल्या, राहुल गांधी यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य संसदीय परंपरेचा अपमान करण्यात गेले आहे. देशातील जनतेला संसदेत चर्चा हवी आहे, पण राहुल गांधी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्यात व्यस्त आहेत. त्यांची संसदेत उपस्थिती ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. राहुल गांधी कधी देशात असतात, आणि कधी देशाबाहेर असतात याचा पत्ता नसतो. संसदेत गोंधळ घालणाऱ्यांचे म्होरकेपण मिरविणाऱ्या राहुल गांधी यांनी लोकशाहीचा अपमान करू नये, असेही ईराणी यावेळी म्हणाल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121