तो बालपणी खोडकर नव्हता. पण, हुशार होता. त्याच्यात जिज्ञासा आणि चिकित्सा हे गुण उपजतच होते. आकर्षण हा माणसाचा स्थायीभाव. निसर्गसृष्टीकडे हा बाळकृष्ण रमला. त्याच्याच कर्तृत्वाचा हा आढावा...
निसर्गमित्रांशी दोस्ती करणार्या आणि या आनंददायी सृष्टीत रमणार्या बाळकृष्ण देवरे यांची आई बालवाडी शिक्षिका. तेथील नगरपालिकेची बालवाडी टागोरनगर भागात, एका बगिच्यात असल्याने तिथेच सरडे, खारुताई, पाली, फुलपाखरू, कीटक सरीसृपांबद्दल आवड त्यास निर्माण झाली आणि ती आतापर्यंत कायम आहे. जळगाव जिल्ह्यातील वृक्षतोड, सर्पहत्या बघून बाळकृष्णला खूप वाईट वाटायचे. आपण काही करू शकत नाही, याची खंत त्याला होती. मात्र, स्वतःपासून सुरुवात करायची, हे त्याने ठरवलं.
पर्यावरण रक्षण हे त्याचे पहिलं पाऊल. त्यानंतर या क्षेत्रात एकजुटीने काम करायला हवे म्हणून समविचारी तरुणांचा शोध घेताना त्यावेळी ‘सर्पमित्र’ ही चळवळ नुकतीच सुरू झाली होती. त्यांचा उपयोग निसर्गातील इतर घटकांना करता येईल, म्हणून सर्वच भागांतून तरुणांना जोडण्याचे काम त्यांनी केले. ही आवड मग पुढे त्यांनी अधिक जोपासली. त्यासाठी संशोधक डॉ. वरद गिरी, निलमकुमार खैरे, देवदत्त शेळके यांसारख्या व्यक्तींची पुस्तके वाचून हा तरुण बाळकृष्ण प्रेरित होत गेला.
मग त्याने ‘वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय’ संस्था स्थापन केली. खानदेश विभागात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी या तरुणाने स्वतःलाया कार्यात झोकून दिले. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संशोधन-संरक्षण आणि संवर्धन अशा क्षेत्रात सकारात्मक दृष्टीने बाळकृष्णने कार्य केले आहे. त्याचे हे कार्य महाराष्ट्रात सुरू असून त्याने ‘सर्पमित्र पक्षीमित्र संमेलन’ आयोजित करुन निसर्गप्रेमींना एकत्र आणले. सर्पमित्र, पक्षीमित्र, वनस्पती, सरीसृप, फुलपाखरू व कीटक यांचे अभ्यासक, संशोधक, डॉक्टर, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, छायाचित्रकार व व्यावसायिक असे किती तरी जण या निसर्गमित्र विश्वात सहभागी आहेत, हे विशेष.
हा तरुण महविद्यालय, शासकीय-निमशासकीय संस्था, औद्योगिक वसाहत आणि ग्रामीण भाग यांसारख्या ठिकाणी ‘सर्प, मानव व पर्यावरण’, ‘मानव वन्यजीव संघर्ष’, ‘वृक्षतोड व कायदे कार्यशाळा’ असे जनजागृतीपर कार्यक्रम करीत असतो. या तरुणाने या संस्थेमार्फत ‘रेस्क्यू’, ‘रिसर्च’, ‘कॉन्झर्वेशन’ असे गट करून कार्य सुरू केले आहे. ‘ग्रीन सोल्जर’ गट हा ज्या भागात बेकायदेशीर वृक्षतोड होत असेल ती थांबवतो आणि, ‘वृक्ष जगवा’ म्हणून प्रोत्साहनही देतो. ‘रेस्क्यू फोर्स’ गट म्हणजे बचाव गटामार्फत बाळकृष्ण निसर्गातील सर्प, वन्यजीव, पक्षी, जखमी अवस्थेत सापडल्यास त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकार्यांद्वारे वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्याचे कार्य करीत असतो.
तसेच, ‘रिसर्च गटा’मार्फत तो जैवविविधता संशोधन करून त्यांच्या नोंदी संबंधित विभागास देण्याचे कार्य केले जाते. या तरुणाने आपले मित्र आणि अभ्यासकांद्वारे ६०० पेक्षा जास्त वनस्पतींची नोंद, ३५० पेक्षा जास्त पक्षी प्रजाती, सापांच्या ३० प्रजाती, ३० पेक्षा जास्त सरीसृप, १४० पेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे, १०० पेक्षा जास्त प्रजातींचे कीटक, २५० प्रजातींचे पतंग, याची महत्त्वपूर्ण अशी नोंद केली आहे. बाळकृष्णचे जैवविविधता अभ्यासकांद्वारे २० पेक्षा जास्त कोळ्यांच्या प्रजाती, सात प्रजातींचे बेडूक, ३५ पेक्षा जास्त ‘ड्रॅगनफ्लाय’ अशा नोंदींचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.
याशिवाय या तरुणाने लोकसहभागातून पाच हजारांपेक्षा जास्त रोपे जगवली आहेत.
त्याला २०१८ साली ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ आणि २०१९ साली ‘ऑर्किड नेचर निसर्गमित्र’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या ‘वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो’मध्ये २०२१ साली स्वयंसेवक म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. त्याच्या संस्थेला २०१० साली ‘सृष्टी’ पुरस्कार, २०१८ साली ‘बहिणाबाई’, ‘युवा प्रेरणा’ पुरस्कार आणि २०१९ साली प्लास्टिक निर्मूलनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘प्लास्टो व्हिजन’ असे पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात हे कार्य पुढे नेण्यासाठी आणि आपल्या निसर्गाचे प्राणी, पक्षी, कीटक यांचे रक्षण करण्यासाठीदेखील बाळकृष्ण देवरे यांनी नियोजन केले आहे.
विद्यार्थीदशेतच पर्यावरण संस्कार घडावे, यासाठी प्रत्येक शाळेत आणि दुर्गम भागात पर्यावरण संस्कार केंद्र सुरू करण्याचा या निसर्गप्रेमी तरुणाचा मानस आहे. शिवाय सातपुड्यातील मनुदेवी वनक्षेत्रास जैवविविधता वारसा स्थळ, फुलपाखरू संवर्धन राखीव म्हणून मान्यता मिळवण्यासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीवांवर उपचारासाठी ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती त्याने दिली. निसर्गसृष्टीत रमणारा हा नव्या युगातील बाळकृष्ण सर्व तरुण आणि निसर्गप्रेमींसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.
लेखक: अतुल तांदळीकर