मुंबई : "मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका अनोळखी गाडीचं शिरणं ही अनावधानाने घडलेली घटना आहे. त्यामुळे त्या प्रकाराला गांभिर्यानं घेण्याची आवश्यकता नाही.", असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. शुक्रवारी (दि. १८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा ताफा राजभवन येथून वर्षा निवासस्थानी चालला होता. त्यावेळी मलबार हिलवरील रस्त्यावर अचानक एक अनोळखी चाकचाकी गाडी त्या ताफ्यात शिरली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि वाहनचालकावरील कारवाई याबाबत प्रश्नचिन्ह उद्भवत होते. त्यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलत घडलेल्या प्रकाराचा खुलासा केला.
"मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्याजवळ घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही चौकशी केली. परंतु त्यात कोणताही गैरप्रकार नाही. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात 'त्या' गाडीचं शिरणं ही अनावधानाने घडेलली घटना आहे. त्यामुळे त्या प्रकाराला गांभिर्यानं घेण्याची आवश्यकता नाही. अर्थात पोलीस यंत्रणा त्या ठिकाणच्या बंदोबस्तात कमी पडली आहे का? याचा तपास आम्ही घेत आहोत.", असे वळसे पाटील यांचे म्हणणे आहे.