नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बुधवारी ’ईडी’ कार्यालयाबाहेर जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, भ्रष्टाचार लपविण्यासाठी काँग्रेसकडून हिंसेचा मार्ग अवलंबिला जात असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. ‘नॅशनल हेराल्ड’ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सलग तिसर्या दिवशी ‘ईडी’द्वारे चौकशी करण्यात आली.
चौकशीच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसतर्फे निदर्शने आणि आंदोलन करण्यात येत आहे. चौकशीच्या तिसर्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील ‘ईडी’ मुख्यालयासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यालयाबाहेर टायर जाळून विरोध करण्यात आला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांना चौकशीदरम्यान अमानवी वागणूक देण्यात येत असल्याचाही आरोप चौधरी यांनी केला आहे.
भाजपतर्फे काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी पत्रकार परिषदेत म्हणाले की, “७० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस दररोज खालच्या पातळीवर उतरत असल्याचे दिसत आहे. याच पक्षाच्या दोन पंतप्रधानांनी स्वत:च स्वत:ला ‘भारतरत्न’ प्रदान करून घेतले होते. महात्मा गांधी ते सोनिया गांधी असा काँग्रेस पक्षाचा प्रवास पाहता काँग्रेस पक्ष निम्नस्तरावर गेल्याचे स्पष्ट होत आहे” हे प्रकरण भारतीय राजकारणातील अभूतपूर्व प्रकरण असल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “हा विषय संपुआ सरकारच्या काळात सुरू झाला होता. राजकीय पक्षाकडून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेस पक्ष केवळ एका कुटुंबापुरता उरल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ही केवळ भारतातील जनतेसाठीच नाही, तर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीही चिंतेची बाब आहे,” असे त्रिवेदी यांनी यावेळी नमूद केली.