कल्याण: डोंबिवली शहरात रिक्षा मीटर पद्धतीने सुरू कराव्यात,अशी गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा संघटना आणि प्रवासी मागणी करीत आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे डोंबिवलीत रिक्षा नियमाप्रमाणे मीटरपद्धतीची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांसाठी भाजप वाहतूक सेलने आवाज उठवला आहे. नुकतेच भाजप वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी दत्ता माळेकर, नंदू परब, संजय देसले, प्रमोद गुरव, संतोष आतकरे, रवी जाधव, एकनाथ माळी आदी उपस्थित होते.
डोंबिवलीत रिक्षाचालक मीटर पद्धतीने कधीही जात नसल्याची ओरड प्रवाशांकडून सतत केली जाते. डोंबिवली पूर्वेला एकच मीटरपद्धतीचे स्टँड आहे. इतर सर्व ठिकाणी प्रवाशांच्या मागणीनुसार शेअर पद्धतीचे रिक्षास्टँड आहेत. प्रवाशाला मीटरपद्धतीप्रमाणे प्रवास करायचा असल्यास शेअर पद्धतीचे रिक्षाचालक भाडे नाकारतात. पण नियमानुसार भाडे नाकारणे चुकीचे आहे. त्यासाठी ‘आरटीओ’ने फलक लावणे गरजेचे आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा आंदोलन
डोंबिवली शहरात रिक्षासाठी कायदेशीर व नियमाप्रमाणे मीटरपद्धतीची अंमलबजावणी त्वरित सुरू करावी, प्रवाशांचे हित लक्षात घेऊन शहरात मीटरपद्धती व शेअर पद्धतीच्या रिक्षास्टँडचे नियोजन करावे, सदर मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दत्ता माळेकर यांनी दिला.