मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी खासगी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. खासगी प्रसार माध्यम वाहिन्यांनी खोटे, बनावट दावे आणि सनसनाटी निर्माण करणारे भडक मथळे देणे टाळावे, असे या मार्गदर्शक सूचनांमधून सांगितले आहे. सर्वांनी, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, १९९५मधील ‘कलम २०' च्या सगळ्या नियमांचे पालन करावे, विशेषतः कार्यक्रमाविषयी असलेल्या संहितांचे पालन केले जावे, अशी सूचना या सविस्तर मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आली आहे.
गेल्या काही काळात अनेक उपग्रह वाहिन्यांवरील कार्यक्रमात कार्यक्रमाचा दर्जा, आणि पातळी खालावली असून, यातील भाषा, असभ्य आणि बदनामीकारक तसेच ज्यात अनेकदा जातीय रंगही आढळल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः युक्रेन-रशिया युद्ध आणि उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या घटनांचे वार्तांकन ज्या पद्धतीने झाले, त्याचा उल्लेख करत, यासंदर्भातल्या कार्यक्रमात, विहित संहितेचे उल्लंघन झाल्याचे, या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. या हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेख करत, मंत्रालयाने याविषयी गंभीर चिंता व्यक्त करत, हे कार्यक्रम केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, 1995 चे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे.