बेस्टच्या खासगी बसचालकांनी टाकला ‘काम बंद’चा गिअर

प्रवाशांना धरले वेठीस

    21-Apr-2022
Total Views | 90

best
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्टने प्रवाशांसाठी चांगली सेवा देण्याकरीता  भाडेतत्वावर घेतलेल्या वातानुकूलित बसेस्च्या चालकांना पगार न दिल्यामुळे कोेणतीही पूर्वसूचना न देता गुरुवारी ‘काम बंद’चा ‘फर्स्ट गिअर’ टाकला. दोन तास बसेस् निघाल्याच नाहीत, असा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे.
 
प्रवाशांची काहीही चूक नसताना असंख्य प्रवाशांना चालकांनी सकाळी वेठीस धरले. त्यांच्यामुळे अनेकांना टॅक्सी व खाजगी टॅक्सीनेच प्रवास करण्याची वेळ तर आलीच आणि मन:स्ताप सोसत नोकरदारांचा ‘लेट मार्क’ लागला तो वेगळाच ! भविष्यात येऊ घातलेल्या खाजगी बेस्ट बसेस्च्या कारभाराची चुणूक प्रवाशांना पाहण्यास मिळाली.
 
एम.पी. ग्रुपतर्फे दररोज ६३ बसगाड्या सोडण्यात येतात. परंतू, गुरुवारी बेस्टच्या चालकांसह ‘एम.पी’ने अवघ्या ९ बसगाड्या चालवल्या. प्रवाशांची कुचंबणा होऊ नये याकरीता बेस्टने अन्य १३ मार्गांवरील बसेस् इतरत्र वळवल्या तसेच आणिक व वरळी डेपोंमधून ११ बसेस् मागवण्यात आल्या. अशा मिळून ३३ बसेस् प्रवाशांच्या सेवेत आल्या.
 
बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या ‘एम.पी. एंटरप्राईज अँड असोसिएटस्’ या कंत्राटदार कंपनीने वेळेवर पगार न दिल्याने गुरुवारी सकाळी या बसच्या चालकांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे बेस्ट सेवेवर परिणाम होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. याबाबत कंत्रादारावर कारवाई करण्यात येईल असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्यामुळे यातून बाहेर काढण्यासाठी खासगी बसेस चालवण्याचा सल्ला तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी दिला होता. त्यानंतर बेस्टने मिडी, मिनी, एसी बसेस भाडेतत्वावर घेतल्या. या बसेस चालवण्याच्या बदल्यात कंत्राटदार कंपनीला प्रति किलोमीटरनुसार रक्कम दिली जाते. यामधून कंत्राटदाराला चालकाचे वेतन, सीएनजी गॅस, बसची देख•ााल करावी लागते. कंत्राटदाराने त्यांच्या चालकांना गेले पाच ते सहा महिने पगार दिला नाही. परिणामी सकाळी अचानक खासगी बस चालकांनी एकही बस रस्त्यावर काढली नाही. यामुळे प्रवाशांच्या दिनक्रमात खंड झाला. त्यांना खासगी टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर आदी वाहनांनी रेल्वे स्थानक, कार्यालय गाठण्याशिवाय पर्याय उरला नाही. दादर पूर्व येथून टाटा, के ई एम, वाडिया या रुग्णालयात जाण्यासाठी या खाजगी बसेस मोठ्या प्रमाणात सोडल्या जातात. दररोज तेथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी होते. परंतू, सकाळी बस सेवा सुरु नसल्याने धस्स झाले, अखेर त्यांना टॅक्सी व खाजगी वाहनांनी प्रवास करणे महाग पडले.
 
काम बंद आंदोलन सुरु झाल्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या अधिका-यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. ‘मारुती’ कंपनीने कर्मचा-यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांना सांगण्यात आले. बेस्ट प्रशासनाने या कंपनीच्या अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर कर्मचा-यांनी आंदोलनाचा ‘रिव्हर्स गिअर’ टाकला. कंपनीविरुद्ध कंत्राटामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. बस न चालवल्यास कंपनीवर ठरवलेली दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एम.पी. ग्रुपतर्फे कुलाबा, वडाळा, विक्रोळी, वांद्रे आणि कुर्ला येथून दररोज २७५ निर्धारित बसगाड्या सोडल्या जातात. मात्र २१ ए्प्रिल रोजी फक्त ११५ बसेस् सोडण्यात आल्या. १६० बसगाड्या रस्त्यांवर आल्याच नाहीत. त्याचा फटका हजारो प्रवाशांनी नाहक सोसला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121