बोधामृत पाजण्याचा भंपकपणा!

    11-Apr-2022
Total Views | 495



बोधामृत पाजण्याचा भंपकपणा
 
 
 
जिल्हापातळीवर एखादे लहानसे काम करायचे आणि त्यानंतर पर्यावरण, मानवता, विचारधारा यावर बोधामृत पाजायचे, अशी सध्याची ‘फॅशन’ झालेली आहे. इतरांप्रमाणे डॉ. अभय बंगदेखील त्याच ‘फॅशन’मध्ये ‘रॅम्पटॉक’ करणारे. रा. स्व. संघावर त्यांनी निराधार आरोप केले, पण आपण अनुसरण करत असलेला गांधीवाद का फसला, याचे त्यांना काही सोयरसुतक असल्याचे दिसले नाही.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजवण्यासाठी शतकाची रणनीति आखल्याचा आरोप नुकताच डॉ. अभय बंग यांनी केला. ‘साधना प्रकाशन’ आणि ‘सेवाग्राम कलेक्टिव्ह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी विषय’ या तीन ग्रंथांचे प्रकाशन रविवारी सर्वोदय आश्रमात झाले. यावेळी ‘सद्यःस्थिती आणि गांधी विचार’ या विषयावर डॉ. बंग बोलत होते. मात्र, कार्यक्रमाचा विषय महात्मा गांधी व गांधी विचार असला तरी तो स्वयंभूपणे मांडण्याचे काम डॉ. अभय बंग यांना करता आले नाही, हे समस्त गांधीवाद्यांचे दुर्दैव! गांधी विचाराच्या प्रचार-प्रसारासाठी डॉ. बंग यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात शिव्या देण्याची वेळ आली, हा वडाची साल पिंपळाला लावण्याचाच प्रकार. डॉ. अभय बंग वा इतर गांधीवाद्यांचा विचार, वर्तन, कृती अर्थपूर्ण असती तर त्यांनी रा. स्व. संघाबद्दल नको ती विधाने करण्यापेक्षा आपल्या सकारात्मकतेवर भर दिला असता. पण, ते त्यांना जमले नाही, म्हणून रा. स्व. संघविरोधात त्यांना आपल्या विचारांचा इमला बांधावासा वाटला.
 
 
 
भारतात हिंदू-मुस्लिमांतील युद्ध प्रकट नसले तरी ते मानसिक पातळीवर होते आणि गेले शतकभर त्याला खतपाणी घालण्यात आल्याचा एक निराधार आणि अनैतिहासिक दावाही यावेळी डॉ. बंग यांनी केला. पण, मुळात भारतावर कट्टर इस्लामी आक्रमकांनी सातव्या शतकापासून हल्ले केले ते प्रकट युद्ध म्हणूनच! त्यानंतरही हजारभर वर्षे धर्मांध मुस्लिमांनी हिंदूवर जमिनीवरचेच युद्ध लादले. भारतावर ब्रिटिशांचे राज्य असतानाही इस्लामी कट्टरपंथीय खिलाफत चळवळ, मलबारमधील हिंदूंच्या नरसंहारापर्यंत हिंदूविरोधात प्रत्यक्ष युद्धच करत होते. इतकेच नव्हे, तर भारताची फाळणीसुद्धा मुस्लिमांच्या हिंदूविरोधातील प्रकट युद्धातूनच झाली आणि स्वातंत्र्यापासून परवाच्या श्रीराम नवमीच्या मिरवणुकीवरील हल्ल्यापर्यंत धर्मांध मुस्लिमांनी हिंदूंविरोधात प्रत्यक्षातल्या युद्धाचाच अवलंब केला, हिंदूनी मुस्लिमांविरोधात नव्हे. कदाचित बुद्धीला समाजवादाचा आणि नमाजवादाचा गंज चढलेला असल्याने डॉ. अभय बंग यांना वरील इतिहास आणि वर्तमानही समजत नसावा. म्हणूनच त्यांनी हिंदू-मुस्लिमांत प्रकट युद्ध नव्हते, ते मानसिक पातळीवर होते, असे म्हटले. हिंदू-मुस्लिमांत मानसिक पातळीवर युद्ध आहे, पण तो मुस्लिमांनी हिंदूंशी केलेल्या प्रत्यक्ष युद्धाचा परिणाम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
डॉ. अभय बंग रा. स्व. संघाविरोधात बडबडले असले तरी त्यांनी ‘सर्च आणि निर्माण’च्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात जे काम केलेले आहे, ते कौतुक करण्यासारखेच आहे. पण, जिल्हापातळीवर एखादे लहानसे काम करायचे आणि त्यानंतर पर्यावरण, मानवता, विचारधारा यावर बोधामृत पाजायचे, अशी सध्याची ‘फॅशन’ झालेली आहे. इतरांप्रमाणे डॉ. बंगदेखील त्याच ‘फॅशन’मध्ये ‘रॅम्पटॉक’ करणारे. रा. स्व. संघ काय करू शकला नाही, असे त्यांनी सांगितले, तो मुद्दा बाजूला ठेवूया. पण, डॉ. अभय बंग अनुसरण करणारा गांधीवाद का फसला, याचे त्यांना सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. गांधीवाद म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांचे पालन व त्यानुसार कार्य नव्हे, तर फक्त गांधी कुटुंबीयांचे चोचले पुरवण्याचे काम करणे, अशी या लोकांची दशा झालेली आहे. त्याच्यापलीकडे त्यांना काही सूचत नाही. आज डॉ. बंग ज्या राज्यात राहतात, त्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा, एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलन आणि १२० जणांच्या आत्महत्येचा, त्यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न तापलेला आहे. पण, डॉ. अभय बंग यांच्या तोंडातून त्यातल्या एकाही प्रश्नावर शब्दही निघालेला नाही वा त्यांनी राज्यकर्त्यांवर टीकेचे आसूड ओढलेले नाहीत. त्याचे, काँग्रेस आणि गांधी घराण्याच्या गुलामांचा सत्तेतील सहभाग हेच कारण आहे. हाच या लोकांचा गांधीवाद आहे व त्यामुळेच गांधीवाद निष्प्रभावी झाला.
 
 
 
वैयक्तिकरित्या डॉ. बंगांचे काम प्रभावी नाही, असे नव्हे. पण, त्या कामाच्या बळावर डॉ. अभय बंग जो शहाणपणा दाखवताहेत, त्याला काही अर्थ नाही. कारण, ते जे करताहेत तशी हजारो कामे हजारो लोकांनी केलेली आहेत आणि त्याचा प्रभाव अगदी ठसठशीतपणे पाहायलाही मिळतो. पण, त्या कोणी कधी कोणाला डॉ. बंगांप्रमाणे ज्ञान देण्याचे वा कोणाविरोधात बोलून स्वतःला पुढे करण्याचे काम केले नाही. आपल्या कामावरील, सकारात्मकतेवरील विश्वास हे त्याचे कारण. त्यातले एक नाव म्हणजे भारतरत्न नानाजी देशमुख. दीनदयाळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून दारिद्य्र निर्मूलन, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील ५०० गावांच्या विकासासाठी पुढाकार आणि चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाच्या स्थापनेतून नानाजी देशमुखांनी उभ्या केलेल्या कार्याची भव्यता, परिणामकारकता याची देही याची डोळा पाहता-अनुभवता येते. मात्र, गांधीवादी, समाजवाद्यांप्रमाणे प्रसारमाध्यमांतले मित्र बाळगणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नावे पोहोचविण्याच्या तंत्राच्या माध्यमातून चर्चेत राहण्याची समज नसल्याने अशी कामे फारशी पुढे आली नाहीत, तर तशी समज असल्याने एखादे काम करूनही समाजवादी मात्र हिमालयाएवढे काम केल्याचा डांगोरा पिटू शकले.
 
 
 
इथे पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आठवते. अजातशत्रु असण्याला एक बेरकीपणा लागतो. पण, या सामाजिक कार्यकर्त्यांकडे तो नाही, हीच त्यांची शोकांतिका. तसा बेरकीपणा, गांधीवादी-समाजवाद्यांकडे चांगलाच सापडतो. म्हणूनच थोडेफार काम करून वा न केलेल्या कामाच्या जोरावरही विचारवंत, बुद्धिजीवी म्हणून त्यांना स्वतःला प्रस्थापित करता येते. प्रसारमाध्यमांतूनही आपलाच उदो उदो होईल, आपण म्हणजे सर्वज्ञानी असे म्हणत त्यांना वृत्तपत्रे वा वृत्तवाहिन्यांची जागा व्यापता येते. पण, प्रत्यक्षात त्यांच्या विचारांत वा बुद्धीतच घोटाळा असतो आणि डॉ. अभय बंग त्याचेच उदाहरण. आज देशात धार्मिक द्वेषभावना बळकट झाली आहे, ही स्थिती बदलण्यासाठी गांधीविचार आशेचा किरण आहे. त्यासाठी गांधीविचाराच्या लोकांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. पण, गांधीविचारात अर्थ असला तरी तो पसरवू म्हणणारे गांधीवादी भंपक आहेत. ते गांधीविचार नव्हे, तर गांधी घराण्याची गुलामगिरी करण्यालाच गांधीविचार मानतात आणि तशी गुलामगिरी करणार्‍यांच्या टोळ्या तयार करण्याचेच त्यांचे उद्दिष्ट आहे, ज्यातून काहीही सकारात्मक निष्पन्न होणार नाही, तर प्रत्यक्षात कामे करणार्‍यांविरोधात आताच्यासारखी नकारात्मकताच ते पसरवतील.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121