मुंबई (ओंकार मुळये) : “साहित्य संमेलनात साहित्याव्यतिरिक्त चर्चा होऊ नये, असा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. महामंडळाचाही यंदा तोच प्रयत्न असेल. त्यासाठी निवडलेले विषय हे महत्त्वपूर्ण ठरतात. यावरून चर्चा कशी असावी, हे पाहिले जाते. काही परिसंवाद कथांवर, कादंबर्यांवर होणे, हेही महत्त्वाचे असते. राजकीय किंवा अन्य विषय शक्यतो संमेलनात असू नयेत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे,” असे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (अ.भा.म.सा.सं.) अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघातर्फे (मुं.म.सा.सं) शनिवार, दि. ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते. मुलाखतीचे संवादक म्हणून प्रा. नरेंद्र पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांच्या निवेदनाने झाली. तत्पूर्वी मुं.म.सा. संघातर्फे संघाच्या अध्यक्षा अचला जोशी यांच्या हस्ते सासणेंचा सत्कारही करण्यात आला.
सासणेंनी लिहिलेले साहित्य, कथा, दीर्घकथा, बाल साहित्याचे लेखन, लेखनाच्या कार्यशाळेप्रमाणे वाचनाची कार्यशाळा पण व्हायला हवी का? राजकीय कादंबरी अद्याप तयार न होण्याचे कारण; असे अनेक विषय यावेळी मुलाखतीतून उलगडले. आजची तरूणाई आणि साहित्य यावरही त्यांनी पुढे भाष्य केले. या कार्यक्रमादरम्यान साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांच्यासह मुं.म.सा. संस्थेच्या अध्यक्षा अचला जोशी, संस्थेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, संस्थेच्या कार्याध्यक्षा-महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे आणि इतर मंडळी उपस्थित होते. यावेळी भारत सासणे यांच्या ‘साहित्य’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
...म्हणून राजकीय कादंबरी अद्याप तयार झाली नाही
यावेळी भारत सासणे म्हणाले की, “राजकीय कादंबरी तयार होणे, ही प्रत्येक काळाच्या टप्प्यावरील गरज असते. यावर एखाद्या चांगल्या लेखकाने नक्कीच भाष्य करायला हवे. मात्र, अशा स्वरूपातील कादंबरी तयार न होण्यामागे विषयाच्या आकलनाचा एक मुद्दा असू शकतो. जितके खोलात जाल, तितक्या नवीन गोष्टींचा उलगडा यातून होत जातो. तसेच सर्वपक्षीय राजकारण, राजकीय व्यवस्था, इ.ची राजकीय पार्श्वभूमी माहित असलेला लेखक आपल्याकडे अजून आलेला नाही. कादंबरीत राजकीय विषय मांडायचे म्हटले, तरी कोणाच्या बाजूने मांडणार, हा देखील प्रश्न असतो. त्यामुळे प्रचारकीय कादंबरी होऊ शकते. या कारणास्तव ती चिरंतर राहत नाही. त्यामुळे यापूर्वी अशा लिखाणाचा प्रयत्न झालेला नाही आणि राजकीय कादंबरी अद्याप तयार झाली नाही.”
जिथे कथा संपते, तिथे वाचकाची विचारप्रक्रिया सुरु होते
“भारत सासणेंच्या लेखनाबद्दल सांगायचे झाले, तर जिथे त्यांची कथा संपते, तिथे वाचकांच्या मनात विचारप्रक्रिया सुरु होते आणि तो व्यक्ती विचार करायला सुरुवात करतो; असं त्यांचे लिखाण आहे. त्यांच्या लेखनात प्रतिमा आणि प्रतिकं यांचा खूप चांगला वापर केलेला असतो. मला त्यांची आवडलेली कादंबरी म्हणजे दोन मित्र. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या लिखाणातील सूचक मांडणी ही आजही कालसुसंगत आहे,” असे मत प्रा. नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.