मुंबई: पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आम आदमी पक्ष आता महाराष्ट्रातही शिरकाव करु पाहत आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक ‘आप’ संपूर्ण ताकदीने लढणार आहे. ‘आप’कडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली आहे.कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही आमच्यासाठी 2024 ची पूर्वतयारी आहे, असा दावाही त्यांनी केला. पंजाब मधील विजयाने राष्ट्रीय पातळीवर भाजपसाठी पर्याय बनण्यासाठी आपने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये स्थापन झाल्यापासून आपने स्वतःला भ्रष्टाचारविरोधी पक्ष म्हणून लोकांसमोर ठेवले आहे. दिल्लीत दोन वेळा सत्ता मिळवलेला आणि आता पंजाबमध्ये सत्ता मिळवलेला पक्ष महाराष्ट्रात खरेच ती जादू दाखवू शकेल का? हा मोठा प्रश्न आहे.
राजकारणात उदय आणि दिल्लीची सत्ता
२०१२ साली दिलीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनातून या पक्षाचा जन्म झाला. भ्रष्टाचार, लोकपाल विधेयक या विषयांवरून देशभर असंतोष पसरला होता त्यामुळे त्या आंदोलनाचा अण्णा हजारेंबरोबर त्यांचे सहकारी म्हणून असलेले अरविंद केजरीवालसुद्धा होते. या आंदोलनाने मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा उचलत आपने दिल्लीत सत्ता मिळवली. २०१५ साली देशभर नरेंद्र मोदींची लाट असतानाही केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता राखली आणि प्रचंड बहुमत मिळवले. दिल्लीत राबवलेल्या, मोहल्ला क्लिनिक, शिक्षणव्यवस्थेतील काम या सर्व कामांमुळे २०२० सालच्या निवडणुकांमध्येही दिल्लीतील सत्ता आपने राखली. पक्षांतर्गत वाद - विवाद, केजरीवाल यांची हुकूमशाही असे आरोप होऊनसुद्धा दिल्लीत केजरीवाल त्यांची सत्ता टिकवून ठेवून आहेत.
पंजाब मधील राजकारण
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपला पंजाब विधानसभेत प्रचंड यश मिळून एकहाती सत्ता मिळवता आली. पण या निकालाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास या विजयामागचे खरे कारण आपचा करिष्मा नसून काँग्रेस बद्दलची नाराजी हे होते. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेले लोक, अकाली दलाचे संपुष्टात आलेले अस्तित्व, भाजपचा कमी जनाधार यांमुळे आम आदमी पार्टीला सत्ता मिळवत आली. नेहमीप्रमाणे त्यांनी भ्रष्टाचाराचे निर्मूलन वगैरे घोषणा केल्या आहेत आणि त्यासाठी काम करायचे जाहीर केले आहे. याचमुळे वादग्रस्त पार्श्वभूमी असुनसुद्धा आपच्या भगवंत मान यांना लोकांची पसंती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील राजकारण आणि आप
सुरुवातीपासूनच आप राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी सातत्याने वेगवेगळी राज्यांच्या निवडणुका लढवत आहे. या निवडणुकांमध्ये सुद्धा आपने सर्व राज्यांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले होते. पण पंजाब वगळता कुठेच यश मिळालेले नाही. आता महाराष्ट्रात आप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून सुरुवात करत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे पंजाब नव्हे. आधी भ्रष्टाचाराविरोधात रान उठावणे, त्यानंतर त्यासाठी लोकांचे जन्मात तयार करणे आणि निवडणुकीत यश मिळवणे याच पद्धतीने आप काम करत असतो. पण महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पक्षांचा जनाधार,त्यांची संघटनात्मक बांधणी या सर्व अजूनही मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे जसे पंजाबमध्ये करता आले किंवा पंजाब मध्ये कोणीच नाही म्हणून आप असा प्रकार महाराष्ट्रात घडण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात आपची जादू चालेल अशी शक्यता कमीच आहे.