‘हिजाब’चा दैनंदिन वापर महिलांच्या आरोग्याला अपायकारक आहे, याकडे लक्ष जाताना दिसत नाही. सर्वांगाला झाकणारा ‘हिजाब’ बाहेर जाताना सतत वापरण्याने मानसिक आणि प्रकृतीस्वास्थ्यावर परिणाम होतात. सामाजिक स्तरावर ही प्रथा पाळली गेल्याने समाजस्वास्थ्य धोक्यात येते. याची नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४० दरम्यान केली आहे.
‘हिजाब'संदर्भात हदीस संकलनांत माहिती मिळते. येथे लक्षात घेतले पाहिजे की, ही संकलने सुमारे दोन शतके आणि नंतरच्या काळात केवळ आठवणींच्या आधारे नोंदविली गेली. त्यात विशेष म्हणजे हे संकलक अरब नव्हते. त्यांनी आठवणी विश्वसनीय ठरविण्याचे शास्त्र तयार केले. त्या कसोट्यांवर उतरणारे सर्वात विश्वसनीय आणि संकलित आठवणींची संख्या ७,५६३ असलेले सहीह बुखारी शरीफ सर्वात वरचे गणले जाते. (इतर हदीस संकलनांबाबत पाहा, इस्लामी धर्मग्रंथांची ओळख, २०१७, ले. डॉ. प्रमोद पाठक.) हदीस संकलनांत फेरफार होत गेले, त्यात नंतर संकलित झालेली हदीस कथने विश्वसनीय वाटावी, अशी ग्रंथित केली गेली. माझ्या ओळखीच्या काही सुविद्य, उच्चशिक्षित मुस्लिमांनी त्यांचा हदीस कथनांवर जराही विश्वास नसल्याचे व्यक्तिगत बोलताना सांगितले. हदीस वाङ्मयाचा त्यादृष्टीने अभ्यास क्लिष्ट आहे. इथे प्रमुख्याने बुखारी शरीफ हदीसना धरून चर्चा केली आहे.
बुखारी शरीफ संकलने
या आधीच्या लेखात कु.श. मधील ३ सुरा १९, २४ आणि ३३ यातील आयतांचा उहापोह महिलांच्या बुरख्यांसंदर्भात केला होता. त्या आयतांना धरून बु. श. खंड-६ मध्ये कु.श.च्या सुरांना धरून फार कमी हदीस संकलित आहेत. १९व्या सुरेला धरून काही हदीस असल्या तरी ख्रिस्त माता मेरीच्या संदर्भात १९.१७ या आयतीला धरून एकही हदीस नाही. कु.श. २४.३१, खिमारला धरुन दोन हदीस आल्या आहेत. त्या आयतीत वक्षस्थळे-गुह्य अंगे या अर्थी आलेल्या ‘जुयुबिहीन्न’ या शब्दाची व्याप्ती बु.श.च्या काळापर्यंत शरीर, चेहरा, मान आणि वक्षस्थळे इथपर्यंत वाढली. महिलांनी आपली नेसण्याची वस्त्रे मुरूत फाडून त्या तुकड्यांनी आपले डोके आणि चेहरे झाकले. त्या तुकड्यांसाठी ‘खिमार’ शब्द न वापरता ‘मुरूत’ वापरला आहे. दोन्ही हदीस मध्ये असेच दिले आहे. हे पुढच्या काळात झालेले अर्थांतर आहे. सुरा ३३.३३ संदर्भात एकही हदीस नाही. ३३.५३ संदर्भात पूर्वी दिलेली ह. जैनाबशी लग्नाच्या वेळची हदीस दिली आहे. तीच गोष्ट चार वेळा थोडी वेगळी पण ह. अनास याच्या तोंडून आली आहे. एक वेगळीच हदीस आहे. पैगंबरांच्या एक पत्नी ह. सौदा या लठ्ठ होत्या. ‘हिजाब’ आयत आल्यानंतर त्या पडदा राखत असत. या ठिकाणी अर्थ बदलला आहे. हदीसमध्ये तो ‘व्यक्तिगत आवरण’ असा येतो. एक वेळेस त्या बहिर्दिशेस जात असताना पैगंबरांचे अंतरंग अनुयायी ह. उमर यांनी त्यांना पाहिले. त्यांनी ह. सौदांना सांगितले की, “तुला दुरून ओळखता येते. काही तरी करून तू आहेस हे लक्षात येणार नाही असे कर.” ह. सौदांनी ते पैगंबरांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, “तुम्हा महिलांना तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर जाण्यास परवनगी आहे.” याचा अर्थ ह. उमरसारख्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. अधिक झाकून घ्या, असे सांगितले नाही. त्यावेळी घरात शौचघर बांधण्याची पद्धत नव्हती. आता सुद्धा विशेषत: ग्रामीण भागात सर्वांनी शौचास बाहेर जाण्याची पद्धत आहे.
आयत ३३.५५ ला धरून फक्त एकच हदीस आहे. पै. महंमदाची पत्नी ह. आयेशा यांच्या ओळखीच्या एक महिलेच्या भावाने त्यांना भेटण्याची इच्छा कळवली. तो दूरच्या ओळखीतील असल्याने आयेशांनी पैगंबरांना त्याला येण्यास परवानगी विचारली. त्यांनी नि:संकोचपणे बोलविण्यास तर सांगितलेच, पण तो ह. आयेशांचा मामा लागतो असेही सांगितले. म्हणजे सर्वच बाबतीत पडदा पाळणे, आपापसातील संबंध नाकारणे पैगंबरांना अपेक्षित नव्हते. कारण, ३३.५५ आयतीच्या शेवटी दिल्याप्रमाणे अल्ला सर्वज्ञ आहे. तुमच्या मनात घडणारी मानसिक आंदोलने तो जाणतो आणि त्याप्रमाणे फळ देतो. बु.श. मध्ये केवळ एकच मोठे संकलन, प्रकरण क्र.७७, पोशाख या विषयाला धरून आहे. त्यात १८६ हदीस संकलित आहेत. त्या विशेष करून पुरुषांच्या पेहरावाला आणि दाढी, कानातील कुंडले इत्यादींना धरून आहेत. महिलांच्या कपड्यांना धरून एकही हदीस नाही. पुरुषांचे दिसणे, त्यांचा पोशाख इत्यादीबाबत पैगंबरांची जितकी आस्था होती, त्याच्या एक दशांशही आस्था त्यांनी महिलांचा पोशाख आणि अलंकरणे इ.बाबत दाखवलेली नाही. ‘हिजाब’च्या बाबतीत तर मुळीच नाही. ती चर्चा त्यांना करायची नव्हती असे दिसते. एक नक्की की, सोन्याचे दागिने घालून पुरुषांनी फिरणे, त्या दागिन्यांचे प्रदर्शन करणे त्यांना अजिबात आवडत नव्हते. अनेक आयतींमध्ये दागिने घालून मिरवणार्या पुरुषांबाबत त्यांनी स्पष्ट शब्दात निषेध नोंदविला आहे. पैगंबरांच्या मतानुसार ‘हिजाब’, बुरखा इत्यादीकरिता दंडक निर्माण करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. आज ‘हिजाब’च्या बाबतीत जो बागुलबुवा माजवला जातो आहे, तो विपर्यस्त आणि इतर लोकांच्या, अगदी मुस्लीम लोकांच्या अज्ञानचा राजकीय कारणासाठी फायदा करण्याचा हेतूने माजवला जातो आहे.
‘हिजाब’ची वैद्यकीय बाजू
‘हिजाब’चा दैनंदिन वापर महिलांच्या आरोग्याला अपायकारक आहे, याकडे लक्ष जाताना दिसत नाही. सर्वांगाला झाकणारा ‘हिजाब’ बाहेर जाताना सतत वापरण्याने मानसिक आणि प्रकृतीस्वास्थ्यावर परिणाम होतात. सामाजिक स्तरावर ही प्रथा पाळली गेल्याने समाजस्वास्थ्य धोक्यात येते. याची नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४० दरम्यान केली आहे. ते लिहितात, “मुस्लीम स्त्रिया प्रार्थनेसाठीही मशिदीत जाऊ शकत नाही. बुरखा वा पडदा पद्धतीमुळे मुस्लीम स्त्री आणि पुरुष यापैकी कोणाचेच एकमेकांशी संभाषण, आदानप्रदान काही ठरावीक कौटुंबिक प्रसंग सोडले, तर होतच नाही. त्यामुळे मुस्लीम स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण होतेच, पण मुस्लीम पुरुषालाही ‘स्त्री’ म्हणजे काहीतरी वेगळे वाटायला लागते. (भिन्नलिंगी) व्यक्तींची साथ, सहवास न लाभल्याने त्यांच्यातही अनेक विकृती निर्माण होताना दिसतात. याचे विदारक प्रत्यंतर ‘इसिस’चे नराधम आणि तालिबान्यांच्या वागणुकीत दिसते. याच कारणांमुळे स्त्री-पुरुषांच्या नैतिकतेवर मोठा परिणाम होतो. दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये परस्परांबद्दल लैंगिक आकर्षण असते. वास्तविक, पडदा पद्धतीमागची (गैर) समजूत ही असते. त्यामुळे अशा व्यक्तींना एकमेकांपासून लांब ठेवण्याची, झाकून ठेवण्याची पद्धत या समाजात रूढ झाली. मात्र, परिणाम पूर्ण उलटाच होताना दिसतो आहे की, तुम्ही जेवढे झाकून ठेवाल, तेवढी अधिकच उत्सुकता निर्माण होऊन मुस्लीम पुरुषांमध्ये उलट विकृती वाढते आहे. पडदा पद्धतीचा जो नैतिक परिणाम झाला आहे, त्याच्या तुलनेत शारीरिक व बौद्धिक परिणाम काहीच नाहीत. स्त्री-पुरुषांच्या मनात खोलवर रूजलेली संशयास्पद लैंगिक भूक हे पडदा पद्धतीचे मूळ आहे आणि स्त्री-पुरुषांना अलग पाडून त्यावर नियंत्रण ठेवणे हा त्याचा उद्देश आहे. स्त्री-पुरुष यांच्यातील अशाप्रकारे संबंध तोडणार्या सामाजिक पद्धतीने लैंगिक अतिरेकाकडे पाहाण्याची रोगट प्रवृत्ती निर्माण होते व अनैसर्गिक अन्य वाईट सवयी पुरुषांना लागतात. हे सांगण्यास मनोविश्लेषण तज्ज्ञाची आवश्यकता नाही. त्यामुळे कौटुंबिक वातावरण जास्त बिघडत जाते. स्त्रियांवरचे अत्याचार वाढतात.
सार्वजनिक जीवनात नीट सहभागी करून न घेतल्याने मुस्लीम महिलांमध्ये गुलामीची मानसिकता वाढते, मनात न्यूनगंड निर्माण होऊन ज्ञानाची भूक मरते, वैचारिक प्रगल्भता येत नाही, असे अनेक परिणाम डॉ. आंबेडकर पुढे नोंदवतात. प्रकृती अस्वास्थ्यासंदर्भात डॉ. बाबासाहेबांनी मुस्लीम स्त्रियांच्या आरोग्यविषयक अनेक तक्रारींची नोंद घेतली आहे. ते लिहितात, “बुरख्यामुळे मुस्लीम महिला सहसा पायरिया (दातांचारोग) पंडू रोग, क्षय अशा रोगांना बळी पडतात. त्याचे शरीर विकृत होते. पाठीला बाक येतो. हातपाय वाकडे होतात. हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाणही (छातीतली धडधड) कमी होते. प्रसूतीच्या वेळीही ओटीपोटाच्या विकृतीमुळे (Pelvic deformity) मातांच्या मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते.” (पाकिस्तान-अर्थात भारताची फाळणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेश प्रकाशन, पुणे, पृ.१७४-५,वरून साभार.) आपल्या देशापेक्षा इराणमध्ये बुरख्याची सक्ती अधिक कठोरपणे राबवली जाते. मोकळेपणापासून वंचित असलेल्या इराणी स्त्रियांचे प्रमाण फार जास्त आहे. इराणच्या सर्वांगीण स्वास्थ्यविषयक प्रश्नांची माहिती असलेल्या डॉक्टरांच्या मतानुसार इराणमधील महिला सदैव बुरख्यात वावरतात. त्यामुळे त्यांना आपल्या शरीरयष्टीची काळजी नसते. त्या खूप लठ्ठ असतात. त्यांच्यात मधुमेह, रक्तदाब, लकवा, कॅन्सर इ. जास्त प्रमाणात असून अकाली मरणाला त्या बळी पडतात. काळे कपडे अंगभर घातल्याने गर्मीच्या दिवसात ते उन्हात तापतात. त्यांना उन्हाचा खूप त्रास होतो. चामडीचे आजार होतात.
स्त्रिया उपजतच आपल्या सौंदर्याविषयी जागरूक असतात. ‘हिजाब’ घातल्याने स्त्रियांचे सौंदर्य झोकोळले जाते याची जाणीव या देशांतील महिलांना असते, असे एका संशोधनाच्या आधारे पुढे आले आहे. त्या संशोधनाचा सारांश, ”In sum, while wearing the hijab may be dominated by male attitudes towards suppressing female attractiveness towards males, the findings from this study suggest that female Muslims too perceive the negative influence of wearing the hijab on female facial attractiveness.'' (संदर्भ PLoS One. २०१८; १३(१०): e०१९९५३७.) हे सर्व हिजाब राखणार्या भारतीय मुस्लीम महिलांना लागू होते. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या गोष्टी आज तशाच्या तशा लागू होत नसल्या तर मुस्लीम महिलांची तरुण पिढी बुरख्याच्या अट्टाहासापायी आपलेच नुकसान करून घेणार आहे. साधारण १९९० पूर्वी बुरखा घालणार्या महिला क्वचितच दिसत. भारतात वहाबी विचारसरणीने मूळ धरताच प्रथम घरातील वातावरणात वाढलेल्या धार्मिक कट्टरतेमुळे तरुण महिला ‘हिजाबा’त वावरू लागल्या. उडुपी येथील प्रसंगानंतर त्याला देशव्यापी स्वरूप देण्याचा ठरवून प्रयत्न होतो आहे.
व्यक्तिस्वातंत्र्याचा बागुलबुवा
पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उकरून काढलेल्या या वादाचा ओवेसीसारखे विघ्नसंतोषी लोक फायदा घेऊन महिलांची मने कलुषित करणार, त्यांना पुढ्यात घालून प्रशासनाची हतबलता अनुभवणार, त्यातून बेशिस्त वाढीस लागून अल्पसंख्य समुदाय ठिकठिकाणी अराजक माजविण्याचा प्रयत्न करणार. प्रशासन कमी पडते आहे, हे दिसताच परत नव्या कुरापती काढत राहणार, हे दिसतेच आहे. हे देशहिताच्या विरोधात जाते आहे, हे सामान्य लोकांच्या लक्षात आले तरी जे उच्चविद्याविभूषित आहेत, आपली मते चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, त्यांची बुद्धी वाकडीच वळताना दिसते. इथे भारतातील एका प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या दोन महिलांच्या लेखाची नोंद घ्यायची आहे. त्यातील एक जानकी नायर आहेत. त्या जेएनयुमध्ये इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या काही वर्षांत जेएनयुमध्ये जी गोंधळाची आणि बेशिस्तीची स्थिती झाली आहे, त्यासाठी असे प्राध्यापक जबाबदार आहेत. त्यांच्या ‘Weaponising Secularism' (Ind. Expr. Feb ८) या लेखात त्यांनी या आंदोलनाला मुस्लीम मुलींच्या शिक्षण अधिकाराचा मुलामा दिला आहे. या बाई जेव्हा वर्गात शिकवत असतील तेव्हा जर विद्यार्थ्यांनी बेशिस्त वागणूक केली, तर त्यांना चालणार आहे का? जर वर्गात शिस्त पाहिजे, तर संपूर्ण संस्थेला ही ते लागू पडते. तीच गत परिणिता शेट्टी या शिक्षिकेच्या लेखात दिसते. त्यांच्या ’Not so Uniform' (Ind. Expr Feb १०) लेखातील वाक्य - ”When a classroom becomes a space where students are disciplined into a narrow uniformity, then learning becomes a means of straitjacketing body and the mind.” त्यांच्या विकृत विचारसरणीवर प्रकाश टाकते.
शिक्षण straitjacket- अडथळा बनते त्याचे कारण रटून घेणारी शिक्षाप्रणाली आहे, वर्गातील गणवेश नव्हे. हे अनेक वर्षे शिक्षिका असलेल्या बाईंना समजू नये? पण, केवळ सेक्युलर म्हणून मिरविण्यासाठी हा व्यक्तिस्वातंत्र्याचा बागुलबुवा करणार्या या विद्वान लेखिका भविष्यात घडणार्या घटनांचे आकलन करू शकत नाहीत, असे विकृत विचार मांडणारे विद्वान लोक उच्चशिक्षित वाचकांची मते बिघडवतात. या सगळ्या गदारोळात एक समजूतदार आवाज ऐकायला मिळाला. परिणिता शेट्टींच्या लेखाखालीच मौ. आझाद उर्दू विद्यापिठाचे माजी कुरगुरू प्रा. फिरोझ बख्त अहमद यांचा ‘Not by Politics or Religion' (Ind. Expr. Feb. १०) हा फार वाचनीय लेख आहे. शैक्षणिक दर्जा वाढता असावा हा दृष्टिकोन लक्षात घेऊन, चांगल्या संस्थेने केलेले, तसेच, प्रत्येक कार्यप्रणालीचे नियम पाळणे आवश्यक असते, यावर प्रा. बख्त भर देतात. मला ते विचार आवडले. त्यांच्यासारख्यांच्या विचारांना आपण सुजाण वाचक कसे सुदृढ करणार आहोत, याचा विचार केला पाहिजे.