डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त आहे. पावसाळ्याआधी खड्डेमुक्त रस्त्यांची आश्वासने पावसाळा संपल्यानंतरही अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्यांची झालेली चाळण आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ‘कल्याण-डोंबिवलीत रस्ते खड्ड्यात’ या विशेष वृत्तमालिकेद्वारे आजपासून प्रकाशझोत टाकणार आहोत कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवर...
कल्याण-डोंबिवलीतील ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण ग्रामीण परिसरातील ललित काटा ते सोनारपाडा या रस्त्यांचीदेखील अशीच दुरवस्था झाली आहे. शिवाय, रस्त्यावरून गटाराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना नाक मुठीत प्रवास करावा लागतो. कल्याण-डोंबिवलीतील ग्रामीण परिसरात रस्त्यांची पावसामुळे अक्षरश: चाळण झालेली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणे नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. रस्ते दुरूस्तीचा निधी लाटण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यानंतरही महापालिका त्यावर कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. महापालिकेकडूनही खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. पण तरीही अनेक भागात खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे दिसते. तसेच, ग्रामीण भागात ‘अमृत योजने’चे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. याचा वाहनचालक, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही गावे जेव्हा ग्रामपंचायतीत होती तेव्हा रस्त्यांची डागडुजी होत होती. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक नागरिक पाडुरंग वझे यांनी सांगितले की, “या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले पाहिजे. गटारे बंदिस्त केली पाहिजे. जेणेकरून गटारे वाहताना दिसणार नाही. परिणामी, आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही व या रस्त्यावरून जाणे नागरिकांनाही सुसह्य होईल.” दरम्यान, यासंदर्भात प्रभाग अधिकारी भारत पवार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात...
ललित काटा ते सोनारपाडा तलाव या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर गटाराचे पाणी वाहत आहे. अरूंद रस्त्यामुळे वाहन चालवताना त्रास होतो. पायी जाणार्या नागरिकांनाही गटाराच्या पाण्यातून वाट काढावी लागते. रस्त्यालगतच्या जी. आर. पाटील आणि एस.जी.एम या शाळेच्या आवारातच गटाराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष द्यावे.
- दत्तात्रय वझे, माजी सरपंच, मानपाडा
२७ गावांतील सर्वच रस्त्यांची दुरवस्था
केवळ या एकाच नव्हे, तर २७ गावांतील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. साफसफाई करणार्या गाड्याही आतमध्ये येण्यास तयार होत नाही. या रस्त्यासाठी यापूर्वी निधी मंजूर झाला. पण, प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला नाही. ही प्रक्रिया अजून सुरू आहे. या भागातील रस्ते लवकरच दुरूस्त होतील. यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
- गुलाब वझे, उपाध्यक्ष, २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती