कोणत्याही व्यक्तीला किंवा देशाला घडवणारी व्यवस्था म्हणजे शिक्षण. देशाचे राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 नंतर खर्या अर्थाने अद्ययावत झालेच नाही. गेल्या 34 वर्षांत जग किती बदलले. बदलत्या जगाशी देशातल्या भावी पिढीला जुळवून घेण्यासाठी, त्यांना बदलत्या जगात वावरायचे बळ देण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आवश्यक होते. देशाच्या भावी नागरिकांचा पाया मजबूत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम-श्री’ (प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया) या योजनेची घोषणा केली असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पीएम श्री स्कूल’या नवीन केंद्र पुरस्कृत योजनेला मंजुरी दिली आहे.
देशभरातील 14 हजार, 500 शाळा ‘पीएमसी स्कूल’म्हणून अद्ययावत केल्या जातील. 2022-23 ते 2026 या पाच वर्षांच्या काळात या योजनेसाठी तब्बल 27 हजार, 360 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसाठी व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, हे पंतप्रधानांचे वाक्य खरे ठरले आहे. ‘पीएम-श्री’ शाळांची निवड ही पूर्णपणे आव्हानात्मक आणि त्याबाबतीतील निकष पूर्ण करणारी असेल. कारण, या 14 हजार, 500 शाळांचे अनुकरण देशातील इतर शाळा करतील. या मॉडेल स्कूल परिसरातील इतर शाळांना मदत करतील.
प्राथमिक, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळा केंद्र शासन, राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ‘पीएम-श्री’ शाळांसाठी निवडल्या जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची पूर्ण अंमलबजावणी करणार्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांची ‘पीएमसी स्कूल’साठी निवड केली जाईल. आनंददायी वातावरणात या शाळांमधून शिक्षण दिले जाणार असून विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक गरजा आणि मुलांच्या विविध शैक्षणिक क्षमतांची काळजी या शाळांमध्ये घेतली जाईल. स्वयंअध्ययनावर भर दिला जाईल. या शाळांचा उद्देश केवळ गुणवत्ता एवढाच नसून 21व्या शतकातील कौशल्याच्या गरजा पूर्ण करून सर्वांगीण आणि पूर्ण विकसित नागरिक तयार करणे असेल.
रोजगाराची परिस्थिती आणि वैश्विक परिसंस्था वेगाने बदलत असताना मुलांचे केवळ शिकणेच महत्त्वाचे ठरणार नाही, तर कसे शिकायचे? हे शिकणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मजकूर कमी करून तार्किक विचार कसा करायचा आणि समस्या कशा सोडवायच्या? कल्पक आणि बहुशाखीय कसे व्हायचे? नावीन्यपूर्णता कशी आणायची जुळवून कसे घ्यायचे आणि नवनवीन आणि बदलणार्या क्षेत्रातील नवीन सामग्री कशाप्रकारे आत्मसात करायची? हे ‘पीएम-श्री’ शाळांमधून शिकविले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
पारंपरिक पद्धतीच्या शिकवण्याला छेद देत या शाळांमध्ये अनुभवात्मक समग्र खेळातून शिक्षण शोधकेंद्रित लवचिक आणि आनंददायी शिक्षण असेल. रोजगार क्षमता वाढावी आणि भविष्यात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्थानिक उद्योगांशी समन्वय साधले जातील. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी कोणता ना कोणता गुण असतोच, तो योग्य वेळी योग्य वयात हेरून त्या गुणांवर संस्कार करून त्याला विकसित करण्याचे काम या शाळा करतील. पर्यावरणाचे महत्त्व बालवयातच कळावं म्हणून या शाळांमध्ये सौर पॅनल ‘एलईडी’ दिवे, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त, जलसंधारण, नैसर्गिक शेती याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. या शाळांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील, ज्यात प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये, खेळाचे साहित्य, कला दालन यांचा समावेश असेल आणि हे सर्वसमावेशक तसेच सर्वांसाठी खुले असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शिक्षक दिनाच्या भाषणात ‘पीएम-श्री’ शाळा म्हणजेच शिक्षणाभिमुख दृष्टिकोनावर भर देऊन या शाळांमध्ये शिक्षण देण्याचा आधुनिक परिवर्तनवादी आणि सर्वांगीण मार्ग असेल असे म्हटले आहे. त्यानुसार या सर्व शाळा देशातील इतर शाळांचे नेतृत्व करतील आणि त्यांना मार्गदर्शन करून देशातील लाखो सक्षम नागरिक घडवतील. भारताचे वर्तमान आणि भविष्य बनविण्यासाठी हे कार्य एका महायज्ञासारखे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी तसेच त्यावर आधारित ‘पीएम-श्री स्कुल्स’ उभारण्यासाठी एकत्र संकल्पबद्ध होऊन काम करणे गरजेचे आहे.
-अनिल बोरनारे
(लेखक भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आहेत.)