सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविणार्या पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताने जोरदारधक्का दिला आहे. सोशल मीडियाद्वारे भारताविरूद्ध विष आणि द्वेषपूर्ण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भारताने पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. नुकतेच भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी खोटी माहिती पसरविणार्या आणि पाकिस्तानच्या पैशांच्या जीवावर भारतातील शांतता भंग करण्याचा खटाटोप करणार्या ३५ युट्यूब वाहिन्या, दोन संकेतस्थळे यांसह अन्य काही खाती ‘ब्लॉक’ करण्याचे आदेश दिल्याची माहिती नुकतीच माहिती प्रसारण खात्याचे सहसचिव विक्रम साठे यांनी दिली. भारतात २०२१ साली नव्याने लागू झालेल्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यामधील ‘नियम १६’अंतर्गत तरतुदींचा आधार घेत हे आदेश देण्यात आले आहेत. भारताविरुद्ध सुरू असलेले हे ‘सोशल मीडिया’तील कारस्थान पाकिस्तानातून सुरू असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत ३५ युट्यूब वाहिन्या, २ इन्स्टाग्राम व ट्विटर अकाऊंट्स, २ वेबसाईट्स आणि एका फेसबुक अकाऊंटवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. भारत आणि भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर गैरसमज पसरवत असल्याचा ठपका या खात्यांवर ठेवण्यात आला आहे.
खाती चालवण्यापासून मजकूरनिर्मिती ते मजकूर प्रसिद्धी यामध्ये पाकिस्तान हा महत्त्वाचा दुवा आढळून आला आहे. खोट्या बातम्या प्रसारित करणे, भारताविषयी गैरसमज पसरवणे आणि भारतातील धार्मिक द्वेष वाढून तेढ निर्माण होईल, अशा ‘पोस्ट’ करणे यासंदर्भात असंख्य तक्रारी माहिती प्रसारण खात्याकडे आल्यानंतर पाकिस्तानचा या विकृत ‘सोशल’ अजेंड्याचा बुरखा भारताने जगासमोर उघडा पाडला. ‘कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.’ शेपूट कोणत्याही साच्यात टाकले तरीही ते कदापिही सरळ होऊ शकत नाही. मुळात भारतातून वेगळे होत आपला सवतसुभा उभा करूनही पाकिस्तानने दिव्यांपेक्षा विकृत दिवट्यांच्या निर्मितीकडे सर्वाधिक लक्ष दिल्याचे आपल्याला अनेक प्रसंगावरून लक्षात येते. मुळात पाकिस्तानचे मूळ भारतद्वेष हेच असल्याने तेथील चिम्यागोम्यांनांही भारताविरोधात भडकावण्याचे काम वारंवार केले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, ‘ब्लॉक’ केलेल्या युट्यूब वाहिन्यांचे तब्बल १ कोटी, २० लाख सदस्य असून एकत्रितपणे १३० कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज आहे. त्यामुळे अवघ्या २० ते २५ कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानातील या ‘सोशल’ माध्यमांना इतक्या मोठ्या प्रमाणावरील मिळणारा प्रतिसाद हा नक्कीच चिंताजनक आहे. या ‘सोशल साईट्स’च्या माध्यमातून भारतीय सेना, जनरल बिपीन रावत आणि नरेंद्र मोदींविषयी सातत्याने गैरसमज पसरवण्याचे रिकामटेकडे उद्योग सुरू होते. अलीकडेच डिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानच्या २० युट्यूब वाहिन्या आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीही पाकचे नापाक उद्योग काही थांबले नाही. पाकिस्तान सध्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा महागाईला सामोरे जात आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान जागतिक स्तरावर मदतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. चीनच्या जीवावर फुटकळ वल्गना करता येतात. मात्र, नुसत्या वल्गनांनी पोट भरत नाही, हे पाकला कधी समजेल. ही गोष्ट जेव्हा समजेल तेव्हा मात्र खूप उशीर झाला असेल.
भारताविषयी विद्वेष पसरविणारी खाती ‘ब्लॉक’ करून दुसरी तयार करता येऊ शकतात. त्यामुळे भारताने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून याची मुख्ये सूत्रे तपासणेदेखील आवश्यक आहे. वाचन माणसाला विचार करायला भाग पडते. ‘सोशल मीडिया’ हा लोकांपर्यंत आपले म्हणणे लोकांपर्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात पोहोचवण्याचे उत्तम साधन आहे. त्यामुळे व्यक्तीच्या थेट मोबाईलपर्यंत आपल्याला पोहोचता येत असते. पाकने हिच गोष्ट हेरली आहे. पंतप्रधान मोदींनी काश्मीरसहित सीमालगतच्या भागात पाकची चांगली कोंडी केली आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरही पाकची आर्थिककोंडी करण्यात भारत बर्यापैकी यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता गोळीबार आणि घुसखोरीऐवजी पाकिस्तान अशाप्रकारचा साधा आणि सोपा हातखंडा आजमावण्यास प्राधान्य देत आहे. परिणामी, भारतानेेही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांना पायबंद घालण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानची ‘सोशल’कोंडी हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल.
७०५८५८९७६७