१५६ कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देऊन भारताने लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती नुकतीच साजरी केली. पण, कोणे एकेकाळी ‘कॅटल क्लास’ म्हणून ज्या तथाकथित विकसित देशांनी भारताला पावलोपावली हिणवले, आज त्याच भारताचे लोककेंद्री लसीकरणाचे मॉडेल ‘वर्ल्ड क्लास’ आणि सर्वस्वी अनुकरणीय ठरले आहे.
“२०१५ मध्ये माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मी म्हटले होते की, “आपला देश ‘टीम इंडिया’मुळे पुढे वाटचाल करत आहे आणि ही ‘टीम इंडिया’ आपल्या १३० कोटी लोकांची मोठी टीम आहे. लोकसहभाग ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. जर आपण १३० कोटी भारतीयांच्या सहभागातून देश चालवला, तर आपला देश प्रत्येक क्षणी १३० कोटी पावले पुढे जाईल.” आपल्या लसीकरण मोहिमेने पुन्हा एकदा या ‘टीम इंडिया’ची ताकद दाखवून दिली आहे. लसीकरण मोहिमेत भारताने मिळवलेल्या यशाने संपूर्ण जगाला ‘लोकशाहीत हे शक्य आहे,’ हेदेखील दाखवून दिले आहे.” अगदी अचूक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्दबद्ध केलेले भारताच्या यशस्वी लसीकरण मोहिमेचे हे गमक. आज लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर याच लोकसहभागाचे, सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व जगाच्या पाठीवरही पुनश्च अधोरेखित झालेले दिसते. कारण, देशातील ६९.८ टक्क्यांहून अधिक जनतेचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर देशातील ९३ टक्के प्रौढ लोकसंख्येने लसींच्या डोसची किमान एक मात्रा घेतली आहे. गेल्या वर्षी दि. १६ जानेवारी रोजीच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात या ‘लसोत्सवा’चा शुभारंभ झाला. त्यानंतर दि. २५ जूनपर्यंत २५ कोटी, दि. ६ ऑगस्टपर्यंत ५० कोटी, दि. १३ सप्टेंबरपर्यंत ७५ कोटी आणि दि. २१ ऑक्टोबर रोजी १०० कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा भारताने ओलांडला, असे हे कोटींची उड्डाणे करणारे केवळ संख्यात्मक बळ नाही, तर ते भारताच्या समूहशक्तीचे वास्तवदर्शनच म्हणावे लागेल. आपला देश या कोरोनाच्या महामारीतून लवकरात लवकर मुक्त व्हावा, आपले कुटुंब, आपला समाज सुरक्षित राहावा, देशाचे टाळेबंदीमुळे बिघडलेले अर्थचक्र पुनश्च गतिमान व्हावे, या समूहभावनेचाच हा परिपाक! भारतीय इतिहासाचीही पाने उलटून पाहिली तर १८५७च्या उत्स्फूर्त उठावापासून ते स्वातंत्र्य आंदोलनातही याच लोकशक्तीने भारताला शत्रूशी लढण्याचे स्फुरण दिले. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारतीयत्वाच्या याच एकात्मभावनेने या राष्ट्राला बळकटी दिली. त्याचप्रकारे प्रजासत्ताक भारतीयांनीच या लसीकरणालाही सर्वार्थाने आज ‘लससत्ताक’ करुन दाखविले आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरु नये.
खरंतर गेल्या वर्षी लसीकरणाचा श्रीगणेशा होण्यापूर्वीच देशातील काही नतद्रष्टांनी या मोहिमेलाच संक्रमित करण्याचे उलटे उद्योग आरंभले. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहाता ही मोहीम कशी अपयशीच ठरेल, याचे भविष्यसंकट वर्तविण्यात काही मंडळींनी धन्यता मानली. लसनिर्मितीपासून ते लसीकरणाच्या पुरवठ्यापर्यंत प्रत्येक बाबतीत लसीकरणालाच कुचकामी ठरविण्याचे राजकीय डावपेच खेळले गेले. ‘भाजपची लस घेणार नाही,’ असे अकलेचे तारे तोडणार्या अखिलेश यादवांसारख्या नेत्यांची तर कीव करावी तितकी कमीच! पण, आज एका वर्षानंतर हेच अखिलेश यादव लस न घेता उत्तर प्रदेशात राजकीय दौरे करत फिरत आहेत का? तर निश्चितच नाही. पण, संकटसमयी राजकारणापलीकडे जाऊन ‘राष्ट्र प्रथम’ ही वृत्ती ना काही राजकीय मंडळींनी कधी अंगीकारली आणि पुरोगामी विद्वानांकडून तर तशी अपेक्षा करणेच फोल ठरावे. तसेच सरकारचा टाळेबंदीचा निर्णय असेल अथवा आरोग्य कर्मचार्यांच्या समर्थनार्थ थाळी वाजवण्याचा, कोरोनाचा अंध:कार दूर सारण्यासाठी दिव्यांचा झगमगाट करण्याचा, मोदींच्या या लोकमानसातही संकटसमयी सकारात्मक ऊर्जा संचारित करण्याच्या प्रत्येक आवाहनाची खिल्ली उडवण्याची संधी या मोदीद्वेष्ट्यांनी दवडली नाही. एकूणच काय तर गोंधळ, अपप्रचार आणि शंकासुरांचा नाहक भडिमार करुन लसीकरण मोहिमेला ग्रहण लावण्याचा राजकीय संसर्गही कोरोनाइतकाच वेगाने फोफावत होता. पण, कुठलीही कायदेशीर सक्ती नसतानाही भारतीयांनी अगदी उत्स्फूर्तपणे सरकारवर, देशाच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास प्रकट केला आणि लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला. याउलट चित्र आज पाश्चात्य देशांमध्ये दिसते, जिथे सुशिक्षित जनता फाजील गैरसमजांमुळे लसीकरणापासून मात्र चार हात लांबच आहे! म्हणूनच आता या देशांमध्ये कायदेशीर लससक्तीचा मुद्दा चर्चेत आहे. पण, भारतात लसीकरण ऐच्छिक असले आणि काही प्रमाणात त्यासाठी सार्वजनिक नियमांचा बडगा उगारला असला तरी जनतेने मात्र लसीकरणातून व्यक्तिहित आणि समाजहिताचा सुवर्णमध्यच साधला. जनमानसाबरोबरच केंद्र सरकारने लस उत्पादकांना सर्वप्रथम विश्वासात घेऊन, त्यांच्या कच्च्या मालापासून ते पुरवठ्यापर्यंतच्या सर्व समस्या मार्गी लावून लसनिर्मितीत ‘आत्मनिर्भरते’ची ज्योत प्रज्वलित केली. देशातील लसींवर काम करणारे संशोधक, वैज्ञानिक यांनाही वेळोवेळी प्रोत्साहन देत ‘आपण हे नक्कीच करु शकतो’ हा आत्मविश्वास मोदी सरकारने निर्माण केला. ज्या वैद्यकीय क्षेत्राच्या खांद्यावर प्रत्यक्ष लसीकरणाची जबाबदारी होती, त्या डॉक्टर्स, परिचारिका आणि फ्रंट लाईन कर्मचार्यांनीही लसीकरण मोहिमेला तितकीच बळकटी दिली. परिणामी, कोरोना प्रतिबंधक लस ही अगदी गावखेड्यापासून ते दुर्गम वनवासी पाड्यांपर्यंत पोहोचली. म्हणूनच देशातील ग्रामीण भागात ९९ कोटी लसीच्या मात्रा, तर वनवासी जिल्ह्यांमध्ये ११ कोटींहून अधिक भारतीयांचे लसीकरण यशस्वी होऊ शकले. एकूणच काय तर लसनिर्मितीपासून ते प्रत्यक्ष लसीकरणापर्यंत प्रत्येक टप्प्याचे सरकारने केलेले सूक्ष्म नियोजन हे या लसीकरण मोहिमेला सर्वार्थाने ‘लसस्वी’ करुन गेले.
देशात ज्याप्रमाणे लसीकरण मोहिमेला पाण्यात पाहाणारे स्वयंघोषित विद्वान कंठशोष करत होते, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतातील लसीकरण मोहिमेला खीळ लावण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नही झाले. भारत लसनिर्मितीत पदार्पण करुन जागतिक स्पर्धेतउतरेल, या भीतीने लसीसाठी लागणार्या कच्च्या मालाची अडवणूक करण्यापासून ते ‘आमच्याच मॉर्डना, फायझरसारख्या लसींना भारतात बिनशर्त परवानगी द्या,’ असा अमेरिकेचा दबावही आपल्या कणखर सरकारने सपशेल धुडकावून लावला. खरंतर भारताच्या परराष्ट्र नीतीची वेळोवेळी परीक्षा पाहाणाराच तो काळ होता. पण, मोदी सरकारने मोठ्या हुशारीने, सामंजस्याने आणि कुटनीतीक मार्गाने प्रत्येक निर्णयातच भारताचे नाणे अगदी खणखणीत वाजवले. इतकेच नाही, तर मास्क, पीपीई कीट, औषधे असे कोरोना प्रतिबंधक साहित्य तसेच अन्नधान्य, लसींचाही इतर देशांना गरजेनुरुप पुरवठा करुन विश्वबंधुत्वाचा भावही आपण जगाला दाखवून दिला. महामारीमुळे परदेशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांबरोबरच मित्रदेशांच्या नागरिकांचीही केंद्र सरकारने सुखरुप सुटका केली. तसेच भारताच्या लसीकरण मोहिमेत सिंहाचा वाटा उचलणार्या ‘कोविन’ अॅपनेही जगाचे लक्ष वेधून घेतले आणि कित्येक देशांनी मागणी केल्याप्रमाणे आपल्या या स्वदेशी तंत्रज्ञानाचा या देशांना विनामूल्य लाभ प्रदान केला. त्यामुळेच तर ब्राझीलसारख्या देशाने भारताला द्रोणागिरी पर्वत उचलणार्या हनुमानाच्या रुपात दाखवून भारताचे मनस्वी आभार मानले. म्हणजेच, देशांतर्गत मागणी, लसीचा पुरवठा यांचा योग्य समतोल साधत मित्रदेशांनाही या महामारीच्या काळात भारताने दिलेला मदतीचा हात हा ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्याच संस्काराचे वैश्विक दर्शन घडविणारा ठरला. अशा या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाने लोकशाहीतील लोकशक्तीचीच प्रचिती अख्ख्या जगाला दाखवून दिली. तसेच भारत हा आता साप नाचवणार्या गारुड्यांचा, ‘कॅटल क्लास’वाल्यांचा गरीब, मागास देश नाही, हे आपण या लसीकरणाच्या विश्वविक्रमातून जगासमोर सिद्ध केले. तसेच विकसित देशांपेक्षाही चार पावलं पुढे टाकत महामारी असेल अथवा अर्थव्यवस्था, भारत सर्वच क्षेत्रांत मजबूत पायांवर उभा असून, त्याचे विद्यमान नेतृत्व तितकेच कणखर आणि लोकाभिमुख आहे, यावरही यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालेच. तेव्हा बिंदू बिंदू जोडून जशी भव्य आकर्षक रांगोळी आकार घेते, तसेच या कोट्यवधी लसमात्रांतून हे लसीकरण अभियान परिपूर्ण आणि यशस्वी करणार्या प्रत्येक भारतीयांचेही आभार आणि अभिनंदन!