ठाणे : कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचे काम दि. २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची हमी ठाणे महापालिकेने रेल्वेला दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कोविड नियमांना अक्षरश: तिलांजली दिल्याचे दिसून आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. परंतु 'कोरोना वगैरे काही नाही' असे विधान त्यांच्याच पक्षातल्या एका मंत्र्याने केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी खारेगाव पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हे अजब विधान केले. 'कोविडला आता कोणी घाबरत नाही! मरणाला अजून किती घाबरणार!', असं म्हणत त्यांनी चक्क अजित दादांचे आदेश धाब्यावर ठेवल्याचे दिसत आहे.