नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील व्यावसायिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजप या राजकीय पक्षाशी विचाराने जोडले गेलेले दीपक वेढणे यांनी येथील नागरिकांमध्ये जनजागृती करत आरोग्य रक्षणाचा ‘दीप’ प्रज्वलित करण्याचे कार्य केले. तसेच अगदी तळागाळातील दुर्लक्षित समाजघटकांनाही त्यांनी मदतीचा हात दिला.
त्यानिमित्ताने ‘कोविड’ काळातील त्यांच्या या सेवाकार्याचा आढावा घेणारा हा लेख...ग्रामीण आणि वनवासी अशा दोन्ही अंगाने ओळख असलेला नाशिक जिल्ह्यातील तालुका म्हणजे कळवण. मूलत: कष्टकरी वर्गाचे वास्तव्य या तालुक्यात आढळते. येथील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जागृती होणे आणि त्यापासून बचावाची माहिती येथील नागरिकांना व्हावी, यासाठी दीपक वेढणे प्रयत्नशील होते.
वेढणेंना ही समाजकार्याची प्रेरणा भारतीय जनता पक्षाच्या सान्निध्यातच मिळाली. आजही भाजपच्या संपर्कात येण्याचा प्रसंग त्यांच्या स्मरणात आहे. दि. ७ डिसेंबर, १९८४ मध्ये धुळे लोकसभेत कुवरसिंग फुलजी वळवी निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या प्रचारासाठी उत्तमराव पाटील आले होते. त्यांच्या सभेत वयाच्या ११व्या वर्षी दीपक वेढणे यांनी सभेत भाषण केले होते. तेव्हापासून ते आजतागायत वेढणे हे भाजपचे खंदे प्रचारक आहेत. प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी स्वखर्चाने नाटिका वगैरे तयार करून ते गावोगावी फिरतात.
कोरोनाकाळात वेढणे यांनी ‘कमलाक्षी बहुउद्देशीय संस्था’, ‘कृष्णा फ्रेंड सर्कल’, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून आपले सेवाकार्य केले. सुरुवातीला कोरोना नेमका काय आहे, याबाबत अनेकांना सुसंगत अशी माहिती नव्हती. अशा वेळी वेढणे यांनी चित्रफीत बनवत कोरोनाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला. या चित्रफितीत आताच्या केंद्रीय कुटुंबकल्याण व आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कळवणचे तहसीलदार, प्रांत यांच्या मुलाखती घेत त्यांनी जनजागृती, शासन, लोकप्रतिनिधी यांच्या भूमिका नागरिकांच्या समोर मांडण्याचे यथोचित प्रयत्न केले. तसेच, नागरिकांत जबाबदारीचे भान जागृत व्हावे यासाठी ‘घे ना जबाबदारी’ या शीर्षकाचे गीतदेखील त्यांनी प्रसारित केले.
रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी वेढणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात सुमारे ५१ रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच, भाजपच्या माध्यमातून अन्नदान करण्यावर वेढणे यांनी या काळात भर दिला. त्यात त्यांनी गहू, तांदूळ, बटाटे, कांदा आदी अन्नपदार्थांचे वितरण केले. तसेच, भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या नागरिकांच्या पालावर जात त्यांनी त्यांना कोरोनाकाळात घ्यावयाची आरोग्यकाळजी याबाबत माहिती देत तेथे मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप केले.
कोरोनाकाळात सक्रिय असणार्या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढावे, तसेच नागरिकांना या योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी ‘ऑनलाईन’ स्वरूपात धन्यवाद स्पर्धेचे आयोजनदेखील वेढणे यांनी या काळात केले. त्यांना राज्यातील १८ जिल्ह्यांतून ३७८ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, ‘गड्या आपला गाव बरा’ हा विषय देत वेढणे यांनी कोरोनाकाळात निबंध स्पर्धेचेदेखील आयोजन केले. इतर ठिकाणी वास्तव्यास असणार्या रहिवाशांना आपले हक्काचे ठिकाण म्हणून आपल्याच गावाने आधार दिला होता. त्यामुळे नागरिकांना आपल्या गावाबद्दल असणार्या भावना यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी या काळात वेढणे यांनी दिली. या स्पर्धेला २२ जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभला.
तसेच, कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी, यासाठीदेखील ते विविध माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देत आहेत. कोरोनाकाळात सर्वात महत्त्वाच्या ‘प्लाझ्मा’दानबाबत जनजागृती करणे व नागरिकांना त्याबाबत प्रवृत्त करण्याचे महत्तम कार्य या काळात वेढणे यांनी केले. वेढणे यांच्या अथक प्रयत्नातून या काळात ९० ते ९५ नागरिकांनी ‘प्लाझ्मा’दान करत आरोग्यरक्षणाची महत्त्वाची भूमिका या काळात बजावली. यासाठी काम करता असताना वेढणे यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.
एक ‘प्लाझ्मा’ मिळविण्याकामी त्यांना दोन दिवस अथक मेहनत घ्यावी लागत होती. त्यातच कोरोनाबाबत विचारणा कशी करायची, हा यक्षप्रश्न वेढणे यांच्यासमोर या काळात होता. यावर उपाय म्हणून वेढणे यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या नागरिकांची यादी मिळविण्यास प्रारंभ केला. ‘प्लाझ्मा’ मिळावा, यासाठी त्यांनी २०० नागरिकांना प्रत्यक्ष संपर्क केला. यासाठी रात्री ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत मान, पाठ एक करत वेढणे यांनी आपले अविश्रांत प्रयत्न सुरू ठेवले होते. यासाठी त्यांना ‘जनकल्याण’ व ‘अर्पण रक्तपेढी’ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, कोरोनाच्या दुसर्या लाटेत जिल्ह्यात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन व ‘ऑक्सिजन’ बेडबाबत विचारणा करणारे असंख्य फोन वेढणे यांना येत असत. गरज असलेल्या अनेक रुग्णांना याकामी मदत करण्यात वेढणे यांनी मोलाची भूमिका बजावली.
यासाठी वेढणे यांना नाशिक ग्रामीणचे भाजप सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव, मालेगाव भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम, नगरसेवक गजू अण्णा देवरे, मकरंद वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि. प. सदस्या जयश्री पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळा बाजार होत असताना, वेढणे यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांना योग्य किमतीत हे इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली. सेवावस्तीमधील नागरिक, श्रीगोंदा, मालेगाव, निफाड, जळगाव, पुणे येथील अनेक नागरिकांपर्यंत वेढणे यांचा मदतीचा अश्वमेध पूर्ण वर्षभराच्या काळात दौडला. वेढणे यांना त्यांच्या या कार्याबद्दल ‘अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ’ आणि ‘विश्वात्मक मराठी साहित्य परिषद’ यांच्या राज्यस्तरीय ‘कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान-२०२१’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘प्लाझ्मा’दानबाबत असणारे अनेक गैरसमज, ‘प्लाझ्मा’दान केल्याने आपणास पुन्हा कोरोना होईल, अशी असणारी शंका, ‘प्लाझ्मा’दानाच्या बदल्यात होणारी पैशांची मागणी, काही ‘प्लाझ्मा’दात्यांनी आर्थिक अपेक्षा ठेवली, अशा ‘प्लाझ्मा’दात्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अशा विविध समस्यांचा सामना वेढणे यांना या काळात करावा लागला. यावर संवाद साधत आणि आपल्या कार्याचा नेमका हेतू स्पष्ट करत, वेढणे यांनी या आव्हानांवर यशस्वी मात केली. कळवण तालुक्यातील एका रुग्णास ‘ऑक्सिजन’ बेडची नितांत गरज होती. दोन दिवस प्रयत्न केल्यावर तिसर्या दिवशी त्याला बेड मिळाला. मात्र, उपचारास विलंब झाल्याने तो रुग्ण वाचू शकला नाही. हा क्षण वेढणे यांच्यासाठी आजही हृद्य असाच आहे.
वेढणे यांनी आजवर ५२ वेळा रक्तदान केले असून, ३२ वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रा. स्व. संघाचे कार्य हे त्यांच्यासाठी प्रेरणास्थान आहे. तसेच वेढणे यांना याकामी पत्नी मनीषा, वडील, मुले यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला. विविधांगी सामाजिक उपक्रम राबवत वेढणे यांनी केलेली समाजसेवा निश्चितच वाखाणण्याजोगी अशीच आहे.