काँग्रेस पाकिस्तानच्या भूमिकेत

    14-Jun-2021
Total Views | 175

370 _1  H x W:



जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसच्या मालकांपासून ते अनेक नेत्यांपर्यंत प्रत्येकाचीच भूमिका देशाला विघातक आणि पाकिस्तानला पूरक ठरेल, अशीच असल्याचे दिसते. आताही आपल्याच नेत्यांचा विरोधाचा वारसा दिग्विजय सिंह यांनी पुढे चालवला आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘कलम ३७०’ लागू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.


 
सत्तेत येताच जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘कलम ३७०’ लागू करु, असे आपल्या पक्षाधोरणाला साजेसे विधान काँग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केल्याचे नुकतेच समोर आले. पक्षधोरणाला साजेसे विधान म्हणण्यामागे अनेक कारणे आहेत, काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिका आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७0’ निष्प्रभ केल्यापासूनच पाकिस्तानने व काँग्रेसने त्यावर निरनिराळ्या प्रकारे आक्षेप घेतला. संयुक्त राष्ट्रांना पाठवलेल्या पत्रात पाकिस्तानने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हवाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना घडत असल्याचे लिहिले.
 
 
अर्थात, राहुल गांधी पाकिस्तानसाठी ‘पोस्टर बॉय’ ठरले, तर काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही ‘कलम ३७0’ पुन्हा लागू करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांनी केलेली आघाडी स्वागतार्ह असल्याचे म्हटले होते. देशाच्या माजी गृहमंत्र्याचे जम्मू-काश्मीर व ‘कलम ३७०’ बद्दलचे हे मत होते, त्याने आपल्या अधिकारपदाच्या काळात तिथे काय काय उद्योग केले असतील, याची कल्पनाही करता येत नाही. तत्पूर्वी काँग्रेसचेच वरिष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी तर मोदी सरकारला हटवण्यासाठी पाकिस्तानकडे मदतीची मागणी केली होती.
 
म्हणजेच जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसच्या मालकांपासून-राहुल गांधींपासून ते अनेक नेत्यांपर्यंत प्रत्येकाचीच भूमिका देशाला विघातक आणि पाकिस्तानला पूरक ठरेल, अशीच असल्याचे यावरुन दिसते. आताही आपल्याच नेत्यांचा विरोधाचा वारसा दिग्विजय सिंह यांनी पुढे चालवला आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा ‘कलम ३७0’ लागू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
 
वस्तुतः जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ निष्प्रभ केल्यानंतर लावलेले निर्बंध जवळपास हटवण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीतही उत्तम सुधारणा होत आहे. तथापि, भारताने ‘कलम ३७0’ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याविरोधात घसा कोरडा केला. परंतु, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपासून ‘जी-७’ गटांच्या परिषदेपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान तोंडावर आपटला.
 
सर्वच आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांनी जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हणत पाकिस्तानच्या चर्चेच्या व हस्तक्षेपाच्या मागणीला कचर्‍याच्या कुंडीत फेकून दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे वरिष्ठ सहकारी दिग्विजय सिंह यांनी क्लब हाऊस समाज माध्यमावर देश-विदेशातील व विशेषतः पाकिस्तानी पत्रकारासमोर ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करण्याची भूमिका मांडली आणि पाकिस्तानलाही तेच हवे आहे. म्हणूनच काँग्रेस नेते व पाकिस्तान दोघांचीही भाषा एकच आहे, काँग्रेस नेते पाकिस्तानच्या इशार्‍यावर तोंड उघडत आहेत की, काँग्रेस आणि पाकिस्तान हातात हात घालून काम करत आहेत, असे अनेक मुद्दे उपस्थित होतात.
 
त्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाने लवकरात लवकर उत्तर द्यायला हवे, अन्यथा, त्यांच्या मौनातून दिग्विजय सिंह यांच्या विधानाला अनुमोदनच मिळत राहील. दरम्यान, जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला नेहमीच भारताचा अंतर्गत मुद्दा म्हटले गेले. तरीही काँग्रेस नेत्यांकडून जम्मू-काश्मीरविषयी सदानकदा वादग्रस्त विधाने करण्यात आली. काँग्रेस तर भारतातील सर्वाधिक जुना राजकीय पक्ष आहे, तरीही त्याने मतपेटीच्या राजकारणापायी, लांगुलचालनापायी जम्मू-काश्मिरच्या मुद्द्याला वापरुन घेण्याचेच काम केले. मात्र, यामुळे काँग्रेस पाकिस्तानच्या विचारांच्या बरोबरीने उभी असल्याचेच नव्हे तर दोघांचेही विचार मिळते-जुळते असल्याचेच दिसून येते.
 
हे पाहता, काँग्रेसमध्ये जम्मू-काश्मीरला ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करण्याचा मनसुबा बाळगणारे फक्त दिग्विजय सिंहच आहेत की त्या मताच्या नेत्यांचा एक गटच्या गट आहे, असेही विचारावेसे वाटते. सोबतच आपल्या नेत्यांच्या विधानांमुळे काँग्रेस पाकिस्तानच्या साथीने उभी असल्याचे दिसते, त्यातही त्या पक्षाच्या नेतृत्वाला काहीही आक्षेप नाही का, हाही प्रश्न उपस्थित होतो. पण सोनिया गांधी वा राहुल गांधी या सर्वच प्रश्नांवर उत्तरे देतीलच असे नाही. कारण, त्यांना जम्मू-काश्मीरचे भारतात पूर्ण विलीनीकरण व्हावे, असे वाटत नाही, उलट त्या मुद्द्यावर राजकारण चिघळत राहावे, असेच वाटते.
 
 
दरम्यान, आपले संभाषण सार्वजनिक झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ते फसले. दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले की, अडाणी लोकांच्या जमातीला शाल आणि ‘कन्सीडर’मधील फरक समजला नाही. मात्र, त्यांच्या या ट्विटवरुन त्यांनी आपल्या संभाषणाच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब केल्याचेच सिद्ध होते. त्यांचा आक्षेप फक्त शाल आणि ‘कन्सीडर’ शब्दांतील फरक समजून घेतला नाही, यावरच आहे. काँग्रेस सत्तेत आली तर ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करण्यावर विचार केला जाईल, असे आपले म्हणणे होते, ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करणारच, असे नव्हे, हे दिग्विजय सिंह यांना वरील दोन शब्दांच्या फरकातून सांगायचे आहे.
 
 
 
 
मात्र, दिग्विजय सिंहांच्या स्पष्टीकरणानुसार, विचार केला जाईल आणि लागू करणारच, यात तत्त्वतः काय फरक आहे? ‘कलम ३७०’ लागू करण्याबाबत फेरविचाराची तरी काँग्रेसची तयारी का आहे? तसेच त्यांना एका पाकिस्तानी पत्रकारासमोर भारताच्या अंतर्गत विषयावर चर्चा करण्याची गरज का वाटली? पाकिस्तानला तर तेच पाहिजे असते. त्याचा आधार घेऊनच पाकिस्तान भारताविरोधात कारस्थाने रचत असतो, याचे भान तरी दिग्विजय सिंह यांनी बाळगायला हवे होते. पण सल्तनत बुडाली तरी स्वतःला बादशहा समजणारे आपल्याच धुंदीत वावरत असतात, राहुल गांधी त्यांचे म्होरके आणि दिग्विजय सिंहही त्यापैकीच एक.
 
दरम्यान, दिग्विजय सिंह किंवा काँग्रेसनेही दिवास्वप्नात वावरणे सोडून दिलेले बरे. कारण, केंद्रात आता भाजपचे सरकार आहे, जम्मू-काश्मीरसाठी बलिदान दिलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे वारस सत्तेत आहेत, जनतेचाही त्यांना अफाट पाठिंबा आहे आणि अशा परिस्थितीत देशहिताच्या विरोधात भूमिका घेणार्‍या काँग्रेसची केंद्रातील सत्तावापसी कदापि शक्य नाही. उलट पाकिस्तानला पूरक ठरणारी विधाने केल्याने आज जितकी काँग्रेस उरल्याचे दिसते, तीदेखील नजीकच्या काळात शिल्लक उरणार नाही, हे त्या पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121