बंगालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो काही हिंसक हैदोस घातला, तो लोकशाहीला काळिमा फासणाराच होता. तिथे अगदी राजरोसपणे हिंदूंची हत्या करण्यात आली. याआधी बंगालमध्ये मोहम्मद अली जिना यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिमांनी ‘डायरेक्ट अॅक्शन’ पुकारून हिंदूंचा अनन्वित छळ केला होता, आई-बहिणींची अब्रू लुटली होती, बकर्या कापतात त्याप्रमाणे हिंदू पुरुषांना कापून काढलं होतं. बालकांवरही दया दाखवण्यात आली नाही. ममतादीदी काय वेगळं करतेय म्हणा? या न्यायाने ममतादीदीला लेडी जिना म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही! स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या फाळणीची जी काही मुख्य कारणे ठरली, त्यातील ‘मुस्लीम तुष्टीकरण’ हे एक महत्त्वाचं कारण होतं, ज्यामुळे त्यांच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होऊन एका वेगळ्या देशाच्या मागणीपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला होता. त्या प्रवासाचे मुख्य संचालक, जनक मोहम्मद अली जिना यांना मानले जाते. बंगालमध्ये आज जे घडतंय ते पाहता, विलगीकरणाची भावना निर्माण करण्याची तयारी ‘लेडी जिना’ म्हणजेच ममतादीदींकडून करण्यात येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!
विद्रूप राजकारणाचा रक्तरंजित प्रयोग
डाव्यांच्या हातातून बंगाल हिसकावून घेतल्यानंतर ममतादीदी उत्तम शासन करतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु, ममतादीदी तर डाव्यांपेक्षाही भयानक निघाल्या. ममतादीदींनी बंगालमध्ये रक्तरंजित खेळ सुरू केला. दीदींना कळलं की, हिंदूंची मते विभागलेली आहेत. पण, मुस्लिमांची मते एकगठ्ठा मिळतात, म्हणून दीदींनी आपलं लक्ष मुस्लिमांवर केंद्रित केलं आणि त्यांना जितकं आक्रमक होता येईल तितकं होऊ दिलं. आता नुकत्याच लागलेल्या बंगालच्या विधानसभा निकालातून आपल्याला हेच समजतं की, मुस्लिमांनी दीदींना भरघोस मतदान केले. परंतु, हिंदूंची मते मात्र विभागली गेली आणि त्याचा राजकीय फटका भाजपला बसला. निवडणूक सुरू असताना एका युट्यूब चॅनेलवर (ज्या चर्चेत मराठी पत्रकार भाऊ तोरसेकरसुद्धा सहभागी झाले होते.), एका पत्रकाराने सांगितलं की, निवडणूक झाल्यावर बंगालमध्ये प्रचंड हिंसा होणार आहे. जर ममतादीदी जिंकल्या, तर तृणमूलचे गुंड उघडपणे दंगली करतील आणि दीदी पराभूत झाल्या तर लोकांमध्ये असंतोष पसरवून एकमेकांशी लढायला लावतील. निवडणूक झाल्यानंतर अगदी तेच घडलं. भारताच्या दुर्दैवाने ममतादीदींनी ही निवडणूक जिंकली आणि आपलं विद्रूप रूप दाखवलं. भाजपचं कार्यालय जाळून टाकण्यात आलं, हिंदूंना किड्या-मुंग्यांप्रमाणे मारहाण करण्यात आली. या हिंसेला घाबरून अंदाजे एक लाख लोकांनी आसाममध्ये पलायन केल्याची बातमी आली आहे. याविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोपदेखील लावण्यात आला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हिंसेला घाबरून बंगालच्या लोकांनी असं पलायन करणं, हा एक गंभीर मुद्दा आहे. या लोकांना दयनीय परिस्थितीत राहण्यास सक्ती केली जात आहे. संविधानाच्या ‘अनुच्छेद-२१’ नुसार नागरिकांना मिळालेल्या मूलभूत अधिकाराचे हे उल्लंघन आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. यावरुन ही बाब किती गंभीर आहे, हे आपल्याला लक्षात येईल.
मुख्यमंत्री पुरस्कृत अराजकता
‘नारदा स्टिंग’ प्रकरणात ‘सीबीआय’ने तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम, मंत्री सुब्रत बॅनर्जी, मदन मित्रा यांना अटक केल्यानंतर तृणमूलच्या गुंडांनी ‘सीबीआय’ कार्यालयासमोर प्रदर्शन केलं. स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिथे सहा तास ठिय्या मांडून होत्या. ममतादीदींनी ‘सीबीआय’लाही आव्हान दिलं की, त्यांनी दीदींना अटक करुन दाखवावी. यादरम्यान, ममतादीदींच्या गुंडांनी ‘सीबीआय’ कार्यालयावर तुफान दगडफेक केली. दगडफेकीसह बाटल्या आणि इतर सामानसुद्धा फेकून मारले. या दगडफेकीनंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्विट केलं की, “‘सीबीआय’ कार्यालयाबाहेर दगडफेक केली जाते आहे. परंतु, कोलकाता पोलीस मूकदर्शक बनले आहेत.” हे प्रकरण लवकर हाताळण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले. राज्यपाल म्हणाले की, “ही अराजकता आहे, पोलीस आणि प्रशासन शांत राहून केवळ पाहतेय. ममतादीदी आपल्या गुंडांना तर आवर घालत नाहीत, तसेच त्यांचे नेते कल्याण बॅनर्जी राज्यपालांनाच धमक्या देत आहेत.” त्यावर कल्याण बॅनर्जी म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की, त्यांच्या विरोधात आम्ही खटला दाखल करू शकत नाही. आम्ही लोकांना आवाहन करतो की, त्यांनीच राज्यपालांविरोधात खटला दाखल करावा. कारण, राज्यपाल हिंसा आणि अपराधाला खतपाणी घालत आहेत.” ते पुढे म्हणाले की, “२०२४ नंतर भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील.” यावर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, He is senior functionary AITCofficial MamataOfficial. He is senior parliamentarian LokSabhaSectt. He is senior advocate bar council india bar and bench. Just stunned but leave the matter to sound discretion of cultured people of West Bengal and media PTINews IndEditorsGuild. आता मला सांगा बंगालमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का? ममतादीदी बंगालची मालक असल्यासारख्या वागत आहेत. तृणमूलच्या गुंडांचा उद्रेक पाहून तर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. बंगालमध्ये जे कोणी कायदा मोडत असतील, तर ममता बॅनर्जींसह त्यांच्या मंत्र्यांविरोधात ‘सीबीआय’ला त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मोकळीक आहे. हे सगळं प्रकरण पाहता बंगाल भयानकतेच्या दारात उभा आहे, हे स्पष्ट आहे. भारतातील सर्वसामान्य लोकं ममतादीदींवर नाराज आहेत. ममतादीदी लोकशाहीचा गळाच दाबत आहेत, अशी चर्चा भारतभर सुरू आहे.
तृणमूल शासनातील हिंसेचा इतिहास
एकेकाळी गुरू रवींद्रनाथ ठाकूर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने ओळखला जाणारा बंगाल आज ‘दंगलखोरांचं माहेरघर’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. बंगालमध्ये दीदींच्या राज्यातील ही हिंसा काही नवीन नाही. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी यंत्रणे’नुसार २०१३ मध्ये राजकीय दहशतवादामुळे २६ लोकांची हत्या करण्यात आली होती. २०१५ मध्ये अशा १३१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये १८४ जणांना हिंसेचा सामना करावा लागला. २०१६ मध्ये बंगालमध्ये राजकीय दहशतवादाच्या ९१ घटना घडल्या, ज्यामध्ये २०५ लोक हिंसेचे शिकार झाले. बंगालमध्ये चांगले उद्योगधंदे नाहीत, शेतीतून जास्त फायदा होत नाही, म्हणून बेरोजगार युवक राजकीय पक्षांकडे आकर्षित होतात आणि हिंसाचाराला बळी पडतात. हे बंगालचं सध्याचं विद्रूप चित्र आहे. डाव्यांच्या राज्यात ज्या हिंसा व्हायच्या, त्या लपून छपून व्हायच्या; परंतु ममतांचे गुंड मात्र उघडपणे हल्ले करत आहेत. हे कृत्य चेटकिणीसारखे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!
एवढंच नव्हे तर दीदींच्या राज्यात धार्मिक दंगलींनाही ऊत आलेला दिसतो. २०१६ साली धुलागढमध्ये धार्मिक दंगल उसळली. अनेक घरं उद्ध्वस्त करण्यात आली. २०१३ साली झालेल्या नलियाखली दंगलीत २०० पेक्षा जास्त हिंदूंची घरे जाळण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे, केवळ घरांचं नव्हे, तर मंदिरांचंही नुकसान करण्यात आलं होतं. जे पत्रकार या दंगलीचे वार्तांकन करायला गेले होते, त्यांना स्थानिक प्रशासनाने काम करू दिले नाही. कॅमेरा बंद करण्यात आले. तीन महिने कुणालाही तिथे फिरकू दिलं नाही. ज्या हिंदूंवर अत्याचार झाले, त्यांना आजही न्याय मिळालेला नाही. गुजरात दंगलीचा पाढा गिरवणार्या स्वतःला बळजबरीने ‘पुरोगामी’ म्हणवून घेणार्या पत्रकारांनी किंवा विचारवंतांनी या दंगलीचा साधा उल्लेखही केला नाही आणि ममतादीदी मात्र अशा अनेक धार्मिक दंगली, हत्याकांड, राजकीय हिंसा पचवून समाधानाने ढेकर देत आहेत. गीतरामायणामध्ये ग. दि. माडगूळकरांनी कैकेयीचं ‘माता न तू, वैरिणी’ अशा शब्दात वर्णन केलं आहे. बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांकडे पाहून, याचं गीताचा आधार घेऊन ममतादीदीचं वर्णन, ‘दीदी न तू, भक्षिणी’ अशा शब्दांत कोणी केलं, तर गैर ठरणार नाही. दीदीचं वर्णन ग. दि. माडगूळकरांच्य शैलीत उत्तर द्यायचं झालं तर,
भारतभूची नव्हेस कन्या, नव्हेस आमुची ताई
जाळपोळ नि हिंसा तू, सांग का करतेस बाई?
छळ हिंदूंचा करील मूढे, बहिणाई का कुणी?
दीदी न तू, भक्षिणी... दीदी न तू, भक्षिणी...
आपल्या भारतीय संस्कृतीत ‘दीदी’ या शब्दाला खरंतर खूप महत्त्व आहे. दीदी म्हणजे मोठी बहीण... मोठी बहीण कोण असते? जी लहान भावंडांवर मुलांप्रमाणे प्रेम करते, त्यांचं पालन-पोषण करते. इतिहासात अशी एक दीदी होऊन गेली आहे. तिचा आणि बंगालचा संबंधसुद्धा आहे. त्या दीदीचं नाव आहे भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंदांची शिष्या... लंडनमधील सर्व सुख-सुविधा सोडून ही दीदी भारतात आली आणि तिने भारतीय लोकांची सेवा केली. तिने आपलं सर्वस्व पणाला लावलं. पण, दुसरीकडे ही दीदी आहे, जीचं नाव ममता आहे. परंतु, ममतेचा लवलेशही तिच्यात नाही! उलट ‘दीदी’ या पवित्र शब्दाला काळिमा फासण्याचे कृत्य या स्त्रीकडून होतं आहे. स्त्रीचा आदर करावा हे आपल्या संस्कृतीने शिकवलं आहे. दीदी स्त्री आहे, म्हणून दीदीवर टीका करताना मलाही त्रास होतोय! परंतु, आता मात्र नाइलाज आहे. या राक्षसी कृत्याविरोधात उभं ठाकलंचं पाहिजे!
कथित पुरोगाम्यांचे ‘स्युडो सेक्युलॅरिझम’
निवडणुकीनंतर आजही किंवा त्यापूर्वी झालेल्या हिंसाचाराविरोधात एकाही पुरोगाम्याने तोंडातून शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी ‘स्युडो सेक्युलॅरिझम’ म्हणजे ‘छद्म धर्मनिरपेक्षता’ असा शब्द उच्चारला होता, तो किती समर्पक आहे, हे या घटना पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. ममतादीदी स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतात, आपण चंडिपाठ करतो असंही त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणाल्या. पण, दीदींसमोर निरपराध हिंदूंचा छळ होताना, मात्र दीदी आपले डोळे मिटून राजकीय मलईयुक्त दूध पित बसल्या आहेत. आज दीदींना घाबरून भाजपमध्ये आलेले काही लोकं पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करत आहेत. बंगालमध्ये दीदींच्या विरोधात निवडणूक लढवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे. पण, हे मृत्यूचं आमंत्रण स्वीकारून अनेक लोक भाजपमध्ये सहभागी झाले, सामान्य जनतेने भाजपला भरघोस प्रतिसाद दिला. आता या प्रतिसादाचं कटू फळ मात्र त्यांना भोगावं लागत आहे. ममतादीदी शासक म्हणून पूर्णपणे नापास ठरल्या आहेत. पण, त्यांच्या विजयामागचं खरं कारण मुस्लीम तुष्टीकरण आणि हिंदूंच्या मनातील भीती हेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचं संघटन केलं आणि देशद्रोही लोकांना धडा शिकवला, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. स्वराज्य स्थापन केलं! पण, भारताला गद्दारीचा शाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी उत्तम शासन केलं. पण, गद्दारीमुळे ते पकडले गेले आणि औरंगजेबाने इस्लामी मान्यतेनुसार संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली. हिंदू योद्धा पृथ्वीराज चौहान महम्मद घोरीशी दोन हात करत होते, तेव्हा जयचंद घोरीला मिळाला, त्याने पृथ्वीराजांसोबत गद्दारी केली, त्यामुळे पृथ्वीराजांची हत्या झाली. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतात एकात्मतेचं वातावरण निर्माण करत असताना काही राज्यांतील जयचंद, त्यांना पाडण्यासाठी सरसावले आहेत. भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काश्मीरमधून ‘३७०’ आणि ‘३५(ए)’ काढून भारत एकसंध केला. ‘तीन तलाक’, आता ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’... पुढे अजूनही देशहिताचे निर्णय ते अवश्य घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. परंतु, ममता बॅनर्जी मात्र जयचंद बनून दंगलखोर देशद्रोह्यांची साथ देते आहेत. एवढंच नाही, तर स्वतःच्या पक्षातील लोकांना दंगलखोर बनवून बंगाली तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.
संवैधानिक लोकशाहीच्या दीर्घाकालीन हितासाठी...
एक ना एक दिवस ममतादीदींची सत्ता जाईलच, असा माझा ठाम विश्वास आहे. कारण, कंस कितीही उपद्रवी झाला, तरी कृष्ण कधी ना कधी सूड उगवतोच! काळरात्र झाल्यानंतर आयुष्याची मशाल पुन्हा पेटतेच. तशाप्रकारे ममतादीदींचा हा अहंकार नक्कीच गळून पडेल. दीदींनी लोकशाहीची कितीही हत्या केली तरी आम्ही दीदींच्या विरोधात लोकशाही आणि संवैधानिक पद्धतीने लढा सुरूच ठेवणार आहोत. आमच्यामध्ये छत्रपतींचं रक्त सळसळतंय, आमच्यामध्ये सावरकरांचं रक्त सळसळतंय... त्यांनी मोठ्या निर्दयी सत्तेविरोधात लढा दिला, तर ही दीदी कोण आहे? आम्ही या दीदींचा अहंकार पाडून दाखवूच, तेही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सनदशीर मार्गाने... आज जर आपण दीदींच्या राक्षसी सत्तेविरोधात एकत्र नाही आलो, तर पुढे भारताची शकले उडतील. इतिहासाची पुनरावृत्ती होईल. ‘लेडी जिना’ भारताची पुन्हा एकदा फाळणी करू शकेल. बंगालमध्ये किती तरी बांगलादेशी मुस्लीम अवैधरीत्या राहत आहेत. बंगालचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मी भारतातल्या तमाम जनतेला आवाहन करतो की, दीदींच्या जुलमी सत्तेविरोधात आपण एकत्र येऊया आणि संवैधानिक मार्गाने प्रतिकार करून दीदींना धडा शिकवूया... हे जर आता रोखलं नाही, तर हे लोण वाढत जाईल आणि पुढे लोकशाही धोक्यात येईल. म्हणून लोकशाहीच्या हितासाठी, संविधानाच्या दीर्घकालीन रक्षणासाठी मी राष्ट्रपतींना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील जातीने लक्ष द्यावं आणि देशविरोधी, लोकशाहीला मारक असलेल्या बंगालमधील सत्ताधारी पक्षाने पुरस्कृत असलेल्या दहशतवादावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत.
- आ. अॅड. मंगलप्रभात लोढा
(लेखक मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत.)