दामासिन नावाच्या त्या युवकाला हिंसक जमावाने घेरले आणि दामासिनला म्हणू लागले, “तू गावात एकटाच मास्टर्सची डिग्री घेतली आहेस, बघू तुझा मेंदू कसा आहे,” असे म्हणत त्या कू्रर जमावातील एकाने कुर्हाडीचा घाव डोक्यात घातला. तो युवक खाली कोसळल्यावर त्याच्या भोवती फेर धरून त्याचे हात तोडण्यात आले. तो तडफडत होता. त्याच्यासमोर ते आनंदाने चित्कारत म्हणत होते की, “अजून काय बरं केल्यावर याला जास्त यातना होतील?” दुसरीकडे त्याच्या आई-वडिलांचा आणि भावाचाही असाच क्रूरपणे खून करण्यात आला. त्याची बहीण इमाकुल्ली सहा महिलांसोबत एका पाद्य्राच्या घरात लपली. त्यावेळी हा हिंसक जमाव तिथे पोहोचला. जमावातले युवक उन्मादाने ओरडत होते, “इमाकुल्ली बाहेर निघ. कुठे लपली आहेस? आजपर्यंत तुझ्यासारख्या ३९९ झुरळांना मस्त चिरडलं. आता तू! तुझा ४००वा नंबर आहे.” इमाकुल्लीच्या नावाने ओरडणार्यांना इमाकुल्लीच्या वडिलांनी जगण्यासाठी, शिकण्यासाठी मदत केली होती. या सगळ्या जमावाचे ते शिक्षकच होते. पण तरीही...
इमाकुल्ली इनिबागीझा यांच्या ‘लेफ्ट टू टेल’ या आत्मचरित्राचा ज्योत्सना लेले यांनी मराठी अनुवाद केलेल्या पुस्तकातला हा काही भाग. रवांडा या देशात १९९४ साली प्रचंड नरसंहार झाला. आठ लाख लोकांची हत्या झाली आणि चार ते पाच लाख महिलांवर सामुदायिक बलात्कार झाला. रवांडातील बहुसंख्य हुतू समाजाने अल्पसंख्याक तुत्सी समाजावर हल्ला केला. या वेळी महिलांची स्थिती काय असेल, याबाबतची सत्यघटना सध्या प्रसारमाध्यमांवर चर्चेत आहे. एका तुत्सी युवकाला लोक लहानपणापासून वेगवगळ्या नावाने चिडवत असत. आपल्याला वडील नाहीत, आईनेच कष्टाने आपल्याला वाढवले हे त्याला महिती आहे. पण, आपले वडील कोण याचा त्याला शोध घ्यायचा होता. तसा शोध घेताना त्याला रवांडामधील नरसंहारापर्यंतचे धागेदोरे मिळतात. त्यावेळी या युवकाची आई तरुण कुमारिका होती. पहिल्यांदा तिच्या चेहर्यावर दोन्ही गालांवर तीक्ष्ण हत्याराने जखमा करण्यात आल्या. तिच्या गालावरच्या जखमांत पू भरून राहिला असतानाही त्या चार-पाच दिवसांत तिच्यावर १००पेक्षा जास्त लोकांनी बलात्कार केला. तिला शुद्धही नव्हती. काही काळाने हे यादवी युद्घ थांबले. मात्र, काही महिन्यांतच या महिलेला कळाले की, ती गरोदर आहे. त्यामुळे ती सांगू शकत नाही की, मुलाचा पिता कोण आहे... या सत्यघटनेने रवांडातील त्या भयंकर नरसंहाराची क्रूरता समजू शकते. आता हे आठवण्याचे कारण की, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन हे रवांडामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी रवांडातील नरसंहारात मारल्या गेलेल्या, बलात्कार झालेल्या सगळ्यांची क्षमा मागितली. कारण, आता सत्य समोर आले. फ्रान्समध्ये राहणारा पण मूळचा हुतू असलेला फिलिसीया काबुगा या उद्योगपतीने त्या नरसंहारामध्ये रवांडातील हुतूना आर्थिक आणि इतर मदत केली. रवांडामध्ये फे्रंच भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. मात्र, जर्मनी आणि बेल्जियम यांचा रवांडावर प्रभाव होता. बेल्जियम रवांडातील तुत्सी समुदायाच्या सोबत होता. अल्पसंख्याक असूनही तुत्सी यांची रवांडावर नेहमी सत्ता राहिली. पुढे हुतू समुदाय सत्तेवर आला. त्यावेळी बहुतेक तुत्सी युगांडाला पळून गेले. एक हिंसात्मक गट बनवून ते रवांडात दहशतवाद पसरवू लागले. प्राचीन काळापासून असलेली आपली सत्ता गेली म्हणून ते हुतूना त्रास देऊ लागले. त्याचवेळी सत्तेत असलेल्या हुतूंना बहुसंख्य असूनही कायम आपण उपेक्षित राहिलो, असे वाटत होते. दुसरीकडे फ्रान्सला वाटत होते की, हुतूंना समर्थन केले, तर बेल्जियमचा प्रभाव मानणारे तुत्सी सत्तेत येणार नाही. फ्रेंच भाषा बोलणारा आणखी एक देश जगात मान्यता पावेल. फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रॉन्सवा मितेहॉन यांनी हुतूंना जाहीर समर्थन केले. रवांडात हुतू आणि तुत्सी जमातीतील यादवी थांबवण्यासाठी फ्रान्सने सैन्यही पाठवले. पण, त्यावेळी फ्रान्स सैन्याने तुत्सींच्या नरसंहारास हुतूंना मदत केली, असे चित्र समोर आले.
मात्र, आता फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी त्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. गेल्या काही काळात फ्रान्सला इस्लामच्या नावावर चालणार्या दहशतवादाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दहशतवाद आणि हिंसा काय असते, हेे फ्रान्सला चांगले कळून चुकले असावे. दहशतवादी हिसेंचे जगही गोलच आहे, हे मात्र खरे.