‘अंधाराचं बेट’, ‘परवाना’, ‘न मिळालेली पत्रे’ अशा प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांतून स्वत:चा ठसा उमटवून विविध कलाप्रकारांमध्ये नवीन प्रयोग करणारा अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार श्रीकांत प्रभाकर भिडे यांच्याविषयी...
काही माणसं जीवनाच्या पहिल्या टप्प्यावरच आयुष्यभराचं ध्येय ठरवितात, तर काहींना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःची ओळख होत जाते. स्वतःचेच चित्र अगदी स्पष्ट होऊन आपणांस नेमके काय करायचे आहे, हे मग ठरते. आजूबाजूला असणारी माणसं, निसर्ग माणसाच्या जीवनावर बरावाईट परिणाम करतो. माणसाची जडणघडणच मुळात त्या प्रक्रियेचा एक भाग असते.
कोकणातील कुडाळसारख्या निसर्गाच्या सान्निध्यात बालपण, वडिलांना नाटक, लेखन आणि अभिनयाची आवड, आईला सृजनशील कलेची आवड, अवतीभवती निसर्गाचे निरीक्षण करून प्राणी, पक्षी यांच्या भावभावना चित्रांतून रेखाटत त्याने प्रत्येक कलेला अगदी आजमावून पाहिले. नाटककार,चित्रकार, छायाचित्रकार, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत, आज एक अभिनेता आणि नाटककार म्हणून आपला ठसा उमटविलेल्या श्रीकांत प्रभाकर भिडे याच्याविषयी...
श्रीकांतचा जन्म दि. २१ डिसेंबर, १९८५ रोजी कुडाळमध्ये झाला. वडील प्रभाकर भिडे पेशाने शिक्षक. आई वैजयंती भिडे घरकाम करायच्या. वडिलांना नाटक, लेखनाची आवडी. सोबतच हौशी रंगभूमीवर काम करणारे ते कलाकार. हा कलेचा वारसा लाभल्याने श्रीकांतला घरातून कलेचे बाळकडू मिळाले. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण कुडाळ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे पूर्ण केले. स्थापत्त्यकलेची आवड असल्याने पुढे त्याच क्षेत्रात पदवी घ्यायची, या उद्देशाने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. बारावीनंतर पुण्यामध्ये अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. “शालेय जीवनामध्ये विविध चित्रकला स्पर्धांमधून मिळालेली बक्षिसे आयुष्याची वाट निवडण्यासाठी मदत करीत गेली,” असे श्रीकांत या प्रवासाविषयी आवर्जून सांगतो.
श्रीकांतचे मामा हेमंत देशपांडे हे मूर्तिकार, चित्रकार असल्याने कलेचा संस्कार घरात होताच. पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने राज्यनाट्य स्पर्धांमधून श्रीकांतने भाग घेण्यास सुरुवात केली. एकांकिका, नाटकांना विविध बक्षिसे मिळत गेली. अभिनयाची आवड असलेला श्रीकांत महाविद्यालयात असताना वेगवेगळे प्रयोग करू लागला. तो म्हणतो, “विज्ञान शाखेमध्ये आकृत्या काढाव्या लागतात म्हणून मला विज्ञान शाखेची आवड निर्माण झाली.” पुढे जाऊन कलाकार बनायचे, असेही त्याने ठरविले नव्हते. अभिनयाची आवड असलेला श्रीकांत नृत्यकलेतील बारकावेही शिकला. तो म्हणतो, “जसे जसे आपण काही बाबी शिकत जातो, तसे तसे अनुभव येत जातात आणि त्या त्या टप्प्यांवर मिळालेले कौतुक, आलेले अपयश तुम्हाला हे त्या परिस्थितीमध्ये निर्णय घेण्यास भाग पाडतात.”
याचप्रमाणे श्रीकांतनेही अभिनयासोबत नृत्य,चित्रकला, छायाचित्रकला, दिग्दर्शनातील बारकावे जाणून घेतले. त्याने पदवीनंतरच्या काळात २००८ मध्ये जाहिरात कंपनीमध्ये ‘ग्राफिक्स डिझायनर’ म्हणून काही काळ काम केले. परंतु, आर्थिक मंदीच्या काळामध्ये ते काम टिकू शकले नाही. “तुमच्या आयुष्यातील अपघाताच तुम्हाला ध्येयाचा रस्ता दाखवितात,” असं तो आवर्जून सांगतो. श्रीकांतने स्वत:मधील क्षमता ओळखून २०१० मध्ये ‘ध्यास परफॉरमिंग आर्ट्स’ नावाची संस्था सुरू केली. त्याच्या संस्थेने ‘पिंजरा’, ‘एक रिकामी बाजू’, ‘परवाना’, ‘अंधाराचे बेट’, ‘न मिळालेली पत्रे’, ‘शौझिया’, ‘गायीच्या शापाने’ अशा एकांकिका, दोन अंकी नाटके राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर केली. त्या नाटकांना विविध वर्षी ‘राज्यनाट्य पुरस्कारा’ने गौरविण्यातही आले आहे. नाटकांसोबत ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ या चित्रपटातून त्याने प्रमुख भूमिका साकारली असून ‘मुळशी पॅटर्न’मधून पाहुणा कलाकार म्हणून त्याने स्वतःची छाप पाडली.
“प्रायोगिक रंगभूमी किंवा चित्रपट, अशा दोन्ही क्षेत्रांमधील ज्यामध्ये कलेचा कस लागणारा अभिनय असेल, ते क्षेत्र माझ्या आवडीचे आहे,” असे तो आवर्जून सांगतो. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथे सादर केलेल्या दोन नाटकांपैकी ‘अंधाराचे बेट’ हे नाटक महाराष्ट्रातून अनेक नाटकांमधून निवडले गेले. “कलेच्या क्षेत्रामध्ये येताना कलेचा आत्मा जाणून घेऊन नवकलाकारांनी कलेचे क्षेत्र निवडावे,” असे सल्ला देताना श्रीकांत सांगतो की, “कलेच्या क्षेत्रामध्ये स्वत:ला आजमावताना क्षमता, उपलब्धता आणि अनुकूलता याचा विचार करूनच या क्षेत्राकडे वळावे.”
नाटक आणि एकांकिकांमध्ये नवनवे प्रयोग करताना ‘फिजिकल थिएटर’मध्येसुद्धा त्याने स्वत:चा ठसा उमटविला आहे. नाटक, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये येणार्या मुलांसाठी श्रीकांत कार्यशाळाही आयोजित करतो. चित्र, छायाचित्र, नाटक, अभिनय यांमधून रंगछटा, नावीन्य, कलात्मकता प्रदान करणारा श्रीकांत स्वत:ला एक अभिनेता आणि नाटककार म्हणून घडवित आहे. तो सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकातून एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतो. “कलेचा आत्मा समजून घेऊन कला आत्मसात केली पाहिजे,” असे सांगणार्या या नव्या दमाच्या अभिनेत्याला आणि नाटककाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!
- स्वप्निल करळे