आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांस...

    18-Nov-2021
Total Views | 106

Babasaheb Purandare _1&nb



प्रति,
 
 
 
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 
 
 

साष्टांग दंडवत.
 
जी वार्ता कधीच ऐकायची इच्छा नव्हती,ती अखेर आली;आपण साकाररुपात आमच्यामध्ये नसल्याची. काहीच सुचत नाहीये. 'काय लिहू, शब्दच संपले' अशीच अवस्था तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची झाली आहे. पण तरीही थोडा धीर करून, सतत वाहणाऱ्या अश्रूंना रोखण्याचा विफल प्रयत्न करत,डोळ्यांसमोर तयार झालेल्या अश्रूंच्या पडद्यातून कशीबशी वाट काढत,थरथरत्या हातानेच मी तुम्हाला हे पत्र लिहितेय.

 
 
चौथीत असताना दूरदर्शनवरच्या जाहिरातीत 'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ आणि त्याचे लेखक असलेले एक आजोबा मी पाहिले होते. हे आजोबा कोण ते तेव्हा माहीत नव्हतं.पण मोठे शिवभक्त आहेत,एवढी एकच गोष्ट मनात त्या आजोबांविषयी आदर निर्माण करुन गेली. पुढच्या २-४ दिवसांतच बाबांनी हा ग्रंथ मला भेट दिला. लगोलग मी तो चरित्रग्रंथ काही दिवसांतच वाचून पूर्ण केला. बऱ्याच काळ भारावलेल्या अवस्थेत होते. ते शिवचरित्र वाचल्यावर मी भक्तच झाले- शिवप्रभूंची आणि शिवचरित्र लिहिणाऱ्या त्या आजोबांचीही! तेव्हा आजोबारुपी तुमच्याशी माझं मनाने जे घट्ट नातं जोडलं‌ गेलं ते जन्मोजन्मीकरिता! तेव्हापासून आजतागायत आवडतं पुस्तक आणि आवडता लेखक कोण? या प्रश्नाला माझं उत्तर एकच- राजा शिवछत्रपती आणि त्याचे लेखक
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!
 
 
त्यानंतर या ग्रंथाची, तुमच्या व्याख्यानांची आणि मुलाखतींची पारायणंच केली मी! प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं नाही. पण गेल्या चार पिढ्यांमधल्या माझ्यासारख्या असंख्य सामान्य माणसांना तुम्ही महाराज दाखवलेत- तुमच्या प्रत्येक कलाकृतीतून!वर स्वतःच महाराज असल्याचा आव न आणता आणि तसा दावा न करता ' सेवेचे ठायी तत्पर- बळवंत मोरेश्वर पुरंदरे निरंतर' अशा भक्तिभावाने आपण शिवपूजा केलीत.


तुमचा तो धीरगंभीर व खडा आवाज, 'महाराष्ट्र रसा'ने ओथंबलेल्या तुमच्या लेखणीतून पाझरलेलं ऐतिहासिक बखरीच्या शैलीतलं लेखन, शिवकल्याण राजा या ध्वनीमुद्रिकेतील चित्रमय निवेदन, 'जाणता राजा' सारखं जगात दुसऱ्या क्रमांकाने गौरवलेलं महानाट्य,....किती उदाहरणं द्यावीत! हे सगळं अनुभवताना ज्याची छाती अभिमानाने फुलून आली नाही,अंगावर रोमावळी उठल्या नाहीत, डोळ्यांतून अश्रूधारा वाहिल्या नाहीत,तो मराठी माणूसच नव्हे!

आपण शिवचरित्र नुसतं सांगितलं नाही,तर ते स्वतः जगलात! इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपण किती प्रदेश पालथे घातले त्याला तर गणतीच नाही! फक्त कागदपत्रांचाच अभ्यास केला नाहीत,तर छत्रपती शिवाजी महाराजांची पाऊले जिथे जिथे उमटली,तिथे तिथे आपण प्रत्यक्ष जाऊन आलात! 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात!' हे आपलं वाक्य आपणच किती सार्थ ठरवलंत! शिवप्रेम म्हणजे काय,भक्ती काय असते,ध्यास म्हणजे काय,हे तुम्ही शिकवलंत. या देशीचा दैदिप्यमान इतिहास इथल्या मातीच्या कणाकणांत आणि मनामनांत रुजवून तुम्हीही नवा इतिहासच घडविलात!
 


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटलं की माझ्यासमोर उभी राहते ती एका आधुनिक महर्षीची प्रतिमा! आपणास भेटण्याचं भाग्य मला पाच वर्षांपूर्वी १३ एप्रिल २०१६ रोजी लाभलं आणि जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं! एवढं कर्तृत्व पण अहंकाराचा लवलेशही नसलेलं आपलं ते शांत आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व बघून मी भारावून गेले. मनात आलं की,ऋजुता,प्रसन्नता आणि शालीनतेला जर मूर्त स्वरूप असतं तर ते आपणासारखं दिसलं असतं!

आपल्या या शंभर वर्षांच्या साऱ्या जीवनप्रवासात आपण अनेक चढउतार पाहिलेत. भरभरून प्रेम करणारी असंख्य माणसे मिळवलीत,तसे काही अपमानही पचवलेत. पण कोणाविषयीही मनात राग न धरता प्रेम देणाऱ्या प्रत्येकाविषयी कृतज्ञ राहिलात. जवळ होतं-नव्हतं ते सारं आपण 'इदं न मम, राष्ट्राय स्वाहा' या निस्पृह वृत्तीने मुक्तहस्ते अर्पण केलंत. शिवयोगी झालात. तुमची शताब्दी ही केवळ एका व्यक्तीची नाही ,तर एका थोर परंपरेची ,जाज्वल्य अभिमानाची,मराठी अस्मितेची शताब्दी आहे याची जाणीव ठेवून, ती तुमच्याविषयी पराकोटीचं प्रेम आणि आदर असणाऱ्या सुजनांनी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली! शिवचरित्र घराघरांत पोहोचवण्याचं एवढं अलौकिक कार्य करूनही शेवटपर्यंत आपला उत्साह आम्हां तरुणांनाही लाजवेल असा होता! शिवसृष्टी उभारणीचं भव्यदिव्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र झटत होतात.
 


आपल्या या शिवप्रेमाला,जिद्दीला,शक्तीला, राष्ट्रनिष्ठेला त्रिवार मानाचा मुजरा! तुम्ही आम्हाला इतकं भरभरून देत राहिलात की,आज आपणास द्यायला माझ्यापाशी काहीही नाही. ज्यांच्यापुढे लोटांगण घालावं असे चरण लाभले की, आम्ही नतमस्तक व्हावं फक्त!
 
 


पण आता पुन्हा तुमचे हे चरण दिसणार नाहीत. तुमच्या तोंडून 'सा मां पातु सरस्वती भगवती...' हे पुन्हा आम्ही ऐकू शकणार नाही. आपल्या वीजेसारख्या कडाडणाऱ्या आणि अतिशय रसाळ अशा वाणीतून शिवचरित्रातले एकेक प्रसंग आम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. तुमचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी उसळलेला जनसागर आणि आपापल्या घरुन दूरचित्रवाणीवरुन तुमच्या पार्थिवाला अखेरचा मुजरा करणाऱ्या लाखो सामान्य लोकांच्या डोळ्यांतील जलधारा,तुम्ही आम्हांला किती भरभरून दिलेलं आहे हेच सांगत होत्या. तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे याची जाणीव करुन देणारी वातावरणातील एक प्रकारची स्तब्धता, प्रत्येकालाच जाणवणारं रितेपण बरंच काही सांगून पाहात होते. तुमच्या असण्याला अर्थ होता,म्हणूनच तुमच्या नसण्याची उणीव जाणवणार आहे. आपण आयुष्यभर सह्याद्रीच्या वाऱ्या केल्यात आणि स्वर्गारोहणाचा मुहूर्तही एकादशीचाच निवडलात. 'संतमाळेतील मणी शेवटला,आज ओघळला,एकाएकी'अशी आमची स्थिती झाली.

पण अप्रसन्नता, कंटाळा, नकारात्मकता हे तुमच्याठायी नव्हतंच. त्यामुळे तुम्ही लिहिलेले शिवचरित्रग्रंथ, तुमची ध्वनिमुद्रित केलेली व्याख्याने, मुलाखती, महानाट्य जाणता राजा, शिवसृष्टी, तुम्ही घडवलेले शिष्य आणि तुमच्या कलाकृतींतून शिवचरित्राविषयी ओढ निर्माण झालेले असंख्य शिवप्रेमी या सगळ्यांतून तुम्ही आमच्यात आहातच. जिथे जिथे शिवचरित्र गायलं जाईल, तिथे तिथे तुम्ही आशीर्वादरुपी असालच. आम्हां कोट्यवधी मनांवर बालपणी रुजलेल्या पहिल्यावहिल्या शिवसंस्कारांचं श्रेय आणि मान सदैव तुमचाच राहील!

भक्त आणि परमेश्वरात असलेल्या अव्दैताविषयी ऐकलं,वाचलं होतं‌. पण खऱ्या आयुष्यात असं अव्दैत मी पाहिलं ते एकमेवच- तुम्ही आणि शिवराय! आपल्या सर्वांचे लाडके पुलं म्हणाले होते, जिथे महाराज गेले,पण तुम्ही गेला नाहीत अशी एकच जागा होती. आता तुम्ही तिथेही पोहोचला आहात. तुम्हाला शिवरायचरणी सर्वोच्च स्थान लाभो हेच त्या महाराष्ट्रधर्मरक्षिका आदिशक्ती तुळजाभवानीचरणी साकडं आहे! ती ते पूर्ण करेल यदर्थे संशयो नाही. आपणाकडेही माझं एक मागणं आहे, वेडा हट्ट समजा हवं तर! या जन्मात माझ्या आजोबांचं प्रेम मला खूप मिळालं. आता पुढच्या जन्मी तरी आपण माझे आजोबा व्हाल का हो?
बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.

आपली एक भक्त,

मधुरा...
- मधुरा विवेक घोलप, नाशिक.
अग्रलेख
जरुर वाचा
कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई ..

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121