जसे सुशांतसिंह प्रकरण बाजूला पडले, तसेच हे ‘ड्रग्ज’ प्रकरणदेखील काही दिवस धूळ उडवून मागे पडेल. कारण, अवतीभवती चिखल इतका आहे, खड्डे इतके खोलवर आहेत की, काय काय साफ करणार? कुठे किती बुजवणार? आकाशच फाटले आहे, तर डागडुजी कुठे किती करणार?
सध्या शाहरूख खानचा पुत्र आर्यन खानचे ‘ड्रग्ज’संबंधी अटक प्रकरण गाजते आहे. यानिमित्ताने शाहरूखच्या जुन्या मुलाखतीची क्लिप समाजमाध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवरही आपण पाहिली असेलच. त्यात अनेक वर्षांपूर्वीच या महाशयांनी ‘माझ्या मुलाने असे सर्व धंदे करावेत,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. म्हणजे मुलाच्या वागण्याचे समर्थन केले आहे! काही वर्षांपूर्वी हेच शाहरूख महाशय ‘आयपीएल’चा सामना संपल्यानंतर सगळे नीतिनियम तोडून क्रिकेट मैदानावर धावत गेले होते. बहुधा, याच बाळाला बरोबर घेऊन! त्यामुळे त्याच्यावर बंदीही घातल्याचे आठवते.स्वतःला ‘सेलिब्रिटी’ म्हणविणारे हे महाभाग आपल्याला कसलेही धरबंध नाहीत, वाटेल ते करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे वागतात. सलमान खानने तर आपल्या भरधाव गाडीने फुटपाथवरवरील माणसाचा जीव घेतला. खटला झाला. पण, महाशय बाहेर आहेत. सैफ आणि कंपनी यांच्यावरदेखील अवैध शिकारीचा आरोप होता आणि आहे. पण, त्याचे काय झाले शेवटी? संजय दत्त प्रकरण तर बरेच गाजले! पण, यापासून ना ही मंडळी काही शिकतात, ना आपण किंवा सरकार काही शिकते. कारण, कुठेही कडक कारवाई, कडक म्हणजे जन्मभराची अद्दल घडविण्यासाठी शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही! पैशांच्या जोरावर सगळे सुटतात सहिसलामत. कारण, कायद्यातदेखील अनेक पळवाटा असतात. त्या मातब्बर वकिलांना माहिती असतात. सगळे लागेबांधे असतात. या सेलिब्रिटीजकडे वकिलांच्या शुल्कासाठी धो-धो नळ वाहत असल्यासारखा पैसा असतो. त्यामुळेही निबर कातडीची मंडळी निर्धास्त असतात.शाहरूखच्या बाबतीत आणखीन एक विरोधाभास अन् विनोद म्हणजे हे महाशय एका शिक्षणविषयक अॅपची जाहिरात करतात. त्यात ते पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी कसे जागरूक राहिले पाहिजे, याचे दोन क्षणाचे डोस पाजतात! त्यासाठी लाखो-कोट्यवधींचे मानधन घेतात.
त्या मानधनाच्या छोट्याशा हिश्शातून (जो तुमच्या- आमच्याच खिशातून अप्रत्यक्षपणे गेला असतो) त्याचे सुपुत्र ‘ड्रग्ज’, पार्ट्या अशी चैन करतात.वर्षभरापूर्वी जेव्हा सुशांतसिंह प्रकरणाचा बोलबाला सुरू होता, तेव्हादेखील हे ‘ड्रग्ज’ प्रकरण तात्पुरते गाजले होते. अनेकांना अटकदेखील झाली. त्याचे धागेदोरे अनेक बड्या नायक-नायिका, निर्माते, दिग्दर्शक यांच्यापर्यंत पोहोचतात, अशी हवा निर्माण केली गेली. ‘छोट्या माशांनंतर बडे मासे’ अशा बातम्या आल्या. पण, जसे बंगालच्या उपसागरात वादळ येते अन् जाते, तसे तिथेही झाले. त्यावेळी तर बॉलीवूड विनाकारण बदनाम केले जाते आहे, असाही कांगावा झाला. पण, ‘ड्रग्ज’ पार्ट्या, ‘मी टू’प्रकरण, लैंगिक शोषण हा या फिल्म इंडस्ट्रीचा अविभाज्य भाग आहे, हे सामान्य माणसाला (शेंबड्या पोराला) देखील आता कळते. काळा पैसा, करचुकवेगिरी, हवाला रॅकेट, दादा भाईगिरी, खून, आत्महत्या ही प्रकरणे या क्षेत्रासाठी इतकी ‘कॉमन’ झाली आहेत की, कुणाला त्याचे काही वाटतही नाही. या सगळ्या भानगडी पोलिसांतील काही जणांचा, सरकारमधील काही मंत्री पुढार्यांचा वरदहस्त असल्याशिवाय उघडपणे चालू शकत नाहीत, हेही आपल्याला समजले आहे. पण, पोलिसांना म्हणा, सरकारला म्हणा, हे गहनगंभीर प्रश्न सोडविण्यात रस नसतो. कारण, प्रश्न सुटले, ‘अॅक्शन’ झाली की, त्यांची रसद बंद होणार. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या न्यायाने डोळेझाक केली जाते. एक पोलीस अधिकारी, एक मंत्री, एक अधिकारी ठरवूनदेखील काही करू शकत नाहीत. कारण, अवतीभोवतीच्या सर्वांना हे असेच मागील अंकावरून पुढे चालू ठेवण्यात रस असतो.माणूस एकदा सेलिब्रिटी झाला की, त्याचे पाय जमिनीवर नसतात. एकतर पैशांच्या किंवा सत्तेच्या भरवशावर आपण कसेही वागू शकतो, कितीही अपहार, अत्याचार करू शकतो, कायदे धाब्यावर बसवून वाटेल तसे वागू शकतो, अशी या मस्तवाल महाभागाची धारणा झाली असते. ‘तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे,’ असा त्याचा रोखठोक सवाल असतो. मग तो आजी-माजी नगरसेवक असो की, पक्षाने छोटे-मोठे पद, अधिकार दिलेला गल्लीतला दादा-भैय्या असो, दहशतीच्या जोरावर आपल्याला वाटेल तसे वागण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी यांची धारणा झालेली असते. तुमच्या आमच्या-सारखा सामान्य माणूस मोठा नट (नटी) झाल्यावर त्याला पंख फुटतात. तो हवेतच तरंगायला लागतो.प्रश्न असा आहे की, यांना ‘सेलिब्रिटी’ करतं कोण? यांना ‘महानायक’, ‘किंग खान’, ‘हिरो’ या पदव्या देतं कोण? तुम्ही-आम्हीच ना? ज्याच्यावर कोर्ट केसेस चालू आहेत, त्या ‘खान ब्रदर्स’चे चित्रपट बघणे आपण बंद केले आहे का किंवा आता या ताजा प्रकरणानंतर शाहरूखचेपिक्चर्स पाहणे प्रेक्षक थांबविणार आहेत का? मुळीच नाही! उलट तो त्यांचा निजीमामला आहे अन् कलाकार म्हणून आम्ही डोक्यावर घेतलेला ‘किंग खान’ वेगळा आहे, असा आमचा युक्तिवाद असणार! आताशा १०० हजार कोटींचे धनी झालेले; पण एकेकाळी तुमच्या-आमच्यासारखेच गरीब-मध्यमवर्गीय असलेले नेते कुणी निवडून दिले? तुम्ही-आम्हीच ना? आश्चर्य म्हणजे ज्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली, सिद्ध झाली, तेदेखील जेलमधून बाहेर आल्यावर मंत्री होतात. लोक त्यांच्या मोर्चात मागे-पुढे असतात. आजच्या तरुण पिढी समोर हे अशा प्रकारची ‘रोल मॉडेल’ असताना, त्यांच्याकडून चांगल्या संस्काराची अपेक्षा कशी करायची? आम्ही सत्याचा मार्ग का स्वीकारायचा, असा मलाच प्रश्न विचारणार्या विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक या नात्याने काय उत्तर द्यायचे?आपल्याला सगळी कामे, सर्व साफसफाई आपण सोडून इतरांनी करावी, असे वाटते. खरेतर या अशा सेलिब्रिटींना धडा शिकवणे तुमच्या-आमच्या हातात आहे. या नायकाचे पिक्चर बघू नका, अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांना, पुढार्यांना निवडून आणू नका.
या हिरोच्या जाहिरातीवर, त्या प्रॉडक्ट्सवर बंदी घाला. त्यामुळे ते उद्योजक शहाणे होतील.जसे सुशांतसिंह प्रकरण बाजूला पडले, तसेच हे ‘ड्रग्ज’ प्रकरणदेखील काही दिवस धूळ उडवून मागे पडेल. कारण, अवतीभवती चिखल इतका आहे, खड्डे इतके खोलवर आहेत की, काय काय साफ करणार? कुठे किती बुजवणार? आकाशच फाटले आहे, तर डागडुजी कुठे किती करणार?डॉ अभय बंग, डॉ. अनिल अवचट यांच्यासारख्यांनी दारू, नशाबंदीसाठी सर्व पातळीवर प्रयत्न करूनही, महाराष्ट्रात होती ती दारुबंदी उठवली गेली. पंजाबसारख्या राज्यात ‘ड्रग्ज’ने तरुण पिढी बरबाद केली. चित्रपटसृष्टीतले अवैध धंदे, आर्थिक गैरव्यवहार, ‘ड्रग्ज’माफियांचा शिरकाव, हे सगळे पोलीस, सरकार सर्वांनाच ज्ञात असते. सरकार बदलते, कमिश्नर बदलतात. पण, कुणीच काही करू शकत नाही. अपवाद फक्त एखाददुसर्या टी. एन. शेषनसारख्या अधिकार्यांचा! पण, अशी माणसे अल्पसंख्याक. तीही खड्यासारखी बाजूला फेकली जातात. आता जाता जाता राहिला तुमचा-आमचा प्रश्न! खरेतर आपल्या हातात बरेच काही आहे. आपणच सगळे मिळून चळवळ उभारून, ज्याला क्रांती वगैरे म्हणतात ती करून, धडा शिकवू शकतो, या ‘सेलिब्रिटीं’ना, पण आपल्याला कुठे काय करायचे आहे? आम्ही लिहून स्वस्थ बसणार, तुम्ही वाचून स्वस्थ बसणार. हे असेच चालायचे?
- डॉ. विजय पांढरीपांडे