उत्तर महाराष्ट्रातील मानसिक दिव्यांग असलेल्या मुली व महिलांची आईच्या मायेने काळजी घेणारी, त्यांचे घराबाहेरचे घर असणारी पहिली संस्था अशी ओळख असलेल्या नाशिक येथील ‘घरकुल’ संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
घर हे आपल्या सर्वांसाठीच हक्काचे आणि मायेचे आलय. मात्र, काही जणांना मानसिक दिव्यांगत्वाचा सामना करावा लागतो. रक्ताची नातीदेखील आपल्या पश्चात आपल्या या अवस्थेतील पाल्यांचे काय होणार, या प्रश्नाने विचारात पडतात. त्यात जर आपली मुलगी ही मानसिक दिव्यांग असेल, तर प्रश्न अजूनच जिकरीचा. अशावेळी नाशिकमधील एक संस्था मात्र अगदी ममत्वाने या मुलींचा सांभाळ करते.नाशिकजवळील पिंपळगाव बहुला येथील ‘घरकुल’ ही संस्था म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील मानसिक दिव्यांग मुली व महिलांची आईच्या मायेने काळजी घेणारी, त्यांचे घराबाहेरचे घर असणारी पहिली संस्था. या संस्थेच्या सचिव व संस्थापिका विद्याताई फडके यांनी या संस्थेच्या कार्याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’शी मनमोकळा संवाद साधला.
संवाद साधताना भावनिक होणार्या विद्याताईंच्या डोळ्यांतून, चेहर्यावरून त्यांची व त्यांच्या संस्थेच्या कार्याची पारदर्शकता अगदी सहज अनुभवायला मिळाली. खरंतर ‘घरकुल’सारखी संस्था सुरु करावी, असे विद्याताईंचे स्वप्न नव्हते. त्या ‘प्रबोधनी’ संस्थेच्या ‘व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर’च्या प्राचार्या म्हणून १९७८ ते २०११ या काळात काम करत होत्या. ही संस्थादेखील मानसिक दिव्यांग मुलींसाठी काम करणारी संस्था आहे. तिथे काम करताना वय वर्षे १८ च्या पुढील महिला व मुलींचाही प्रश्न होताच. या कार्यादरम्यान मानसिक दिव्यांग अवस्थेतील प्रौढ वयातील महिलांचे वर्तन याबाबत विद्याताईंचा चांगला परिचय झाला. तसेच, या मुलींच्या पालकांशीदेखील त्यांची ओळख झाली. त्यामुळे काही मुलींच्या पालकांनी “आमच्यानंतर या मुलींना कोण सांभाळणार? यासाठी आपण काही करावे,” अशी मागणी विद्याताईंकडे केली. त्यांची व्यथा पाहून विद्याताईंचे मन अस्वस्थ झाले. त्यामुळे या मुलींसाठी आपण काही करावे, ही भावना त्यांच्या मनात होती. ही इच्छा त्यांनी डॉ. शिरीष सुळे यांना बोलूनही दाखविली आणि डॉ. सुळे यांनाही ती योग्य वाटली.पण, संस्था उभी करणे तेवढे सोपे नव्हते. ना जागा होती, ना पैसा. जुने स्नेही ‘शिवानंद इलेक्ट्रिक्स’चे महाराजजी बिरमानी यांच्याकडे विद्याताई व सहकार्यांनी संस्थेचा प्रकल्प अहवाल सादर केला. त्यांना गरज सांगितली. ते ऐकून एकदम तयार झाले. त्यांचा पाठिंबा मिळाला. मग जागेचा शोध घेताना उपनगर येथे कर्नल गडकरी यांनी स्वतः बंगला भाड्याने उपलब्ध करुन दिला. तीन वर्षे महाराज बिरमानी यांनी या वास्तूचे भाडे दिले. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटला. तिथे चार मुलींना घेऊन ‘घरकुल’ सुरू केले. पालक मदतीला आले. घरातील घरगुती सामान घेत कार्यारंभ झाला. विद्याताईंच्या कार्याची ‘माऊथ पब्लिसिटी’ होत गेली. त्यामुळे मुलींची संख्या वाढत गेली. यातच त्यांनी एक महिना उन्हाळी शिबीर आयोजित केले. ज्यामुळे आगामी कार्यातील आव्हानांचा परिचय विद्याताईंना झाला. पालकांचा पाठिंबा व आग्रह सुरूच होता. तेव्हा विद्याताई नोकरी करत होत्या. सकाळी १० ते ६ नोकरी करत. ६ नंतर ‘घरकुल’ला जात असे आणि ९ ला घर गाठत. असाच त्यांचा दिनक्रम.
प्रत्यक्षात काम सुरू झाले तेव्हा मुलींची संख्या वाढत असल्याचे व काम उत्तम असल्याचे लक्षात आल्यावर महाराज बिरमानी यांनी कर्नल गडकरी यांच्याकडून बंगला विकत घेत ‘घरकुल’ला विनामूल्य देऊ केला. त्यावेळी त्या सोसायटीमधील ठराविक एक ते दोन लोकांनी ‘अशा मुलींचा’ शेजार नको म्हणून ‘एनओसी’ देण्यास नकारही दिला. इतर रहिवाशांचा मात्र पाठिंबा होता. आपला शेजार नको असेल, तर आपण इथे राहायचे नाही असेच विद्याताई व त्यांच्या चमूने ठरविले व हक्काची जागा सोडली. दुसर्या बंगल्याचा शोध घेत पाथर्डी गावात ‘घरकुल’चे कार्य सुरू झाले. पण, म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठीच! तसेच विद्याताईंच्या बाबतीतही घडले. कारण, पुढे जागेच्या शोधात असताना ‘घरकुल’ची आजची इमारत उभी राहिली. पिंपळगाव बहुला येथे बिल्डर राजेंद्र गोठी यांनी इमारत बांधून भाडे तत्त्वावर वापरायला दिली. या दरम्यान मुलींची संख्या 40 पेक्षा जास्त झाली होती. आता ‘घरकुल’चे स्वतःचे हक्काचे एक ‘घरकुल’ होते आणि यासाठी उद्योजक, व्यापारी, डॉक्टर याचे आर्थिक सहकार्य विद्याताईंना लाभले आणि इमारत उभी राहिली.‘घरकुल’मध्ये प्रौढ, मानसिक, दिव्यांग मुली व महिला आहेत. अशा अवस्थेतील मुली व महिलांसाठी काम करणारी उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली संस्था. संस्थेला सरकार मान्यता आहे. मात्र, अनुदान नाही. ‘घरकुल’नेदेखील कधी सरकारकडे अनुदान मागितले नाही. पूर्णतः समाजाच्या सहयोगावर ही संस्था चालते. मुली दत्तक घेणे, वाढदिवस योजना, अन्नधान्य, फर्निचरसाठी लोक अनुदान देतात. कामात प्रामाणिकपणा, समर्पित वृत्ती, पारदर्शकता असेल आणि सत्पात्रीदानाचा विश्वास असेल, तर लोक मदत करतात, हा विश्वास संस्थेने कमावला असल्याचे विद्याताई सांगतात.
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोलाचे योगदान संस्थेला लाभले. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रानेही सहकार्य केले. सर्व उद्योजक संस्थेचे आधारस्तंभच. त्यामुळे उद्योजक व ‘घरकुल’ एक परिवारच झाला आहे.‘घरकुल’मधील मुलींना सामान्य शिक्षण दिले जात नाही. येथे १८ ते ६२ वयाच्या मुली व महिला राज्यभरातून येत असतात. काम करणार्यादेखील सर्वच महिला असून मुलींच्या सुरक्षिततेला येथे सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. या मुलींना ‘व्होकेशनल ट्रेनिंग’ दिले जाते. या मुलींना एखादे कौशल्य संपादित करायला साधारण तीन ते चार महिने लागतात. येथील शिक्षक हे संयमी, संवेदनशील, प्रेमळ, कल्पक आणि तितकेच प्रयोगशील. शिक्षकांचेदेखील प्रशिक्षण घेत त्यांची मानसिकता तयार केली जात असल्याचे विद्याताई सांगतात.‘घरकुल’मधील मुली व महिला या मेणबत्ती बनवणे, शिवणकाम, ‘फाईल फोल्डर’ तयार करणे, राख्या तयार करणे, चिवडा, पापड, शंकरपाळे तयार करणे, कागदी-कापडी पिशव्या तयार करणे आदी कामे करतात. त्यांनी तयार केलेले साहित्य बाजारात विकले जाते. ‘कृष्णा रायटिंग’ कंपनीच्या ‘जॉब वर्क’ अंतर्गत या मुली रोज आठ हजार बॉल पेन्सचा या कंपनीला मागील दहा वर्षांपासून सातत्याने पुरवठा करीत आहेत. समाजातील उपयोजिता वाढविणे, वर्तन समस्या कमी करणे, आनंदी ठेवणे, यासाठी या मुलींना सतत चांगल्या कामात कार्यमग्न ठेवणे आवश्यक असल्याचे फडके सांगतात. तसेच येथे उत्पादित माल हा प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवला जातो, ज्याला प्रचंड मागणी असते. कारण, या मालाचा उत्तम दर्जा!चार मुलींपासून सुरू झालेले ‘घरकुल’ आज ५८ मुलींच्या मायेचे छत्र आहे. यात एकूण ३० महिला कर्मचारी कार्यरत आहेत, तर १३ जणांची ‘मॅनेजिंग कमिटी’ आहे. संस्थेला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून २०१९ मध्ये शासनाचा शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कारदेखील संस्थेला प्राप्त झाला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे, ‘घरकुल’ ही संस्था कुठल्याही राजकीय पक्ष व नेतेमंडळींशी जोडलेली संस्था नाही.मुलींचे स्वच्छतेचे प्रश्न, आरोग्य प्रश्न साहजिकच उपस्थित होतात. म्हणूनच ‘घरकुल’मधील मुलींना पौष्टिक आहार दिला जातो. तसेच डॉ. विशाल कुरकुरे यांच्या माध्यमातून रोज मुलींची सुश्रुषा केली जाते. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. विजया गणोरकर, डॉ. विजया सुळे, डॉ. मृणाल केळकर या मुलींची देखभाल करत असतात. येथे मुलींच्या वर्तन समस्यादेखील निदर्शनास येतात. कारण, मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या या मुली इतर मुलींपेक्षा अधिक संवेदनशील व भावनिक आहेत.
आठ हजार रुपये महिन्यात जेवण, चहा, नाष्टा, कपडे आदी सर्व खर्चाचा समावेश ‘घरकुल’मध्ये आहे. काम करताना प्राप्त होणार्या समाधानाबाबत विद्याताई सांगतात की, “मला हे काम करताना लाखमोलाचे समाधान वाटते. या मुली वेड्या नसून प्रेमळ, सेवाभाव असणार्या आहेत. काळजी घेणार्या आहेत. रक्ताचे नातेवाईक करणार नाहीत, इतकी काळजी येथील मुली घेताना दिसतात.”पालक जेव्हा वयाची पन्नाशी ओलांडतात तेव्हा ते मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या थकून जातात. आपल्या पश्चात मुलींचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. सख्खे भाऊ-बहीण यांनादेखील मर्यादा असतात. एका मुलीमुळे कुटुंबाच्या आयुष्याला त्रास होऊ नये म्हणून पालक संस्थेला पसंती देतात. पण, याचा अर्थ इथे मुलींना पालकांनी टाकून दिले, असा अजिबात नाही. इथे या मुलींना मैत्रिणी मिळतात. ‘पिअर ग्रुप’ मिळतो. त्यामुळे मुलींच्या विकासास चालना मिळते. संस्कार, शिस्तीचे धडे मुलींना येथे मिळतील, याची पालकांना जाणीव असते, असे विद्याताई या मुलींना कुटुंबापासून दूर ठेवणे योग्य आहे काय, याबाबत विचारले असताना सांगतात.कोरोना काळात येथील मुलींना घरी पाठविण्यात आले होते. मात्र, ज्यांना आई-वडील नाहीत अशा मुलींना ‘घरकुल’मध्येच आश्रय मिळाला. येथे मुलींच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत, योग, ‘हीलिंग थेरपी’देखील दिली जाते आणि या सर्व मुली ‘ऑनलाईन’ सेशन्सलादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
“मानसिक दिव्यांगत्व हा रोग नाही, तर ती स्थिती आहे. या मुलींची प्रगती होते याचा अर्थ त्यांचा ‘आयक्यू’ वाढत नाही, तर त्यांच्यातील कौशल्य वाढण्यास मदत होते,” असे विद्याताई सांगतात.पालकांनी विशेषत्व असलेल्या पाल्यांना नक्कीच आपल्या जवळील संस्थेत दाखल करावे. घरात ठेऊ नये, या मुलांची लाज बाळगू नये, त्यांचा स्वीकार करावा, प्रगती करण्यासाठी योग्य ते सर्व करावे, विशेष शिक्षणाचा लाभ द्यावा, असे कार्य करणार्या संस्थेत मनुष्यबळाची वानवा असते. येथे काम करताना ‘कॉर्पोरेट’सारखा पैसा नाही. मात्र, मानसिक समाधान आहे. त्यामुळे तरुणांनीदेखील त्यांच्यातील कौशल्य या संस्थेला मिळावे, यासाठी जमेल तसा वेळ द्यावा. वरिष्ठ नागरिकांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अशा संस्थांना जरूर द्यावा. मदतीचे हजारो हात मिळाल्यास कार्यास गती मिळणे सहज शक्य असल्याचे फडके सांगतात.फडके यांना या कार्यात त्यांचे यजमान व कुटुंबाचे मोलाचे सहकार्य मिळाले. न केवळ दुसरी, तर तिसरी पिढीदेखील फडके यांना या कार्यात मदत करत आहे.‘घरकुल’मधील आदिती जाधव या विद्यार्थिनीने सिंगापूर येथील भारतीय सांस्कृतिक संघ व ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्य स्पर्धेत सुवर्णपदकदेखील प्राप्त केले आहे. ‘घरकुल’ने यूट्युब चॅनेल सुरू केले असून मानसिक दिव्यांगत्व असणारी अदिती जाधव व कर्णबधिर असलेली अदिती यांना नृत्य शिकविण्याचे शिवधनुष्य ‘घरकुल’ने पेलले आहे.
जीवनात प्रत्येकाला संधी मिळाल्यास तो संधीचे सोने करू शकतो. मानसिक दिव्यांगत्व असणार्या मुली यादेखील या नियमाला अपवाद नाहीत, अशी विद्याताई फडके यांची धारणा आहे. येथील सर्वांच्या आई असणार्या विद्याताई व ‘घरकुल’चे कार्य हे निश्चितच शब्दातीत आहे.
मी येथे मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. संस्था म्हणजे काय, हे येथे आल्यावर कळले. संस्थेचा पारदर्शक व्यवहार आहे. येथे काम करताना माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझ्यातील कलागुणदेखील मला जोपासता येत आहे.
- योगिता सूर्यवंशी, लिपिक, घरकुलमी येथे मागील सहा वर्षांपासून काम करत आहे. काम करताना एकदम आनंद व समाधान मिळते. जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते, संस्थेच्या कामाची तुलना शब्दांत होऊ शकत नाही.
- जयश्री कुशारे, कलाशिक्षिका, घरकुल
- विद्याताई फडके
(अधिक माहितीसाठी संपर्क - विद्याताई फडके, ९८६०५५२३२४)