‘आयपीएल’मुळे नवे पर्याय

वेध - ‘आयपीएल’मुळे नवे पर्याय

    19-Oct-2021
Total Views | 114

IPL_1  H x W: 0
 
 
 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धा नुकतीच पार पडली. ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडून (बीसीसीआय) दरवर्षी भरविण्यात येणारी ‘आयपीएल’ स्पर्धा भारतीय क्रिकेटला आणखीन बलाढ्य करते, असे मत क्रिकेटतज्ज्ञांचे आहे. ‘आयपीएल’च्या आयोजनानंतर यंदाच्या वर्षी किती हजार कोटींचा आर्थिक लाभ झाला, याची आकडेवारी ‘बीसीसीआय’ लवकरच जाहीर करेल. परंतु, या ‘आयपीएल’ स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक युवा आणि प्रतिभावंत नवे खेळाडू मिळवून दिले असून, आगामी काळात भारतीय संघाला याचा मोठा फायदा मिळणार, यात काही शंका नाही. २००८ सालापासून या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर ‘आयपीएल’ने भारताला अनेक युवा आणि प्रतिभावंत नवे खेळाडू मिळवून दिल्याचा इतिहास आहे. यंदाही ‘आयपीएल’ने आपली ती परंपरा कायम राखण्यात यश मिळवल्याचे क्रिकेटमधील जाणकारांचे म्हणणे आहे. ‘आयपीएल’चे जेतेपद पटकाविणाऱ्या ‘चेन्नई सुपर किंग्ज’ संघातील सलामीवीर खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या रूपात भारतीय संघाला सलामीसाठी एका उत्तम नवख्या खेळाडूचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ऋतुराजने १६ सामन्यांमध्ये ४५.३५च्या सरासरीने ६३५ धावा काढल्या असून, या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ‘ऑरेंज कॅप’चा तो मानकरी ठरला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील हर्षल पटेलने स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवित ‘पर्पल कॅप’ पटकाविली. हर्षल पटेलने १५ सामन्यांत ३२ बळी मिळविले. ‘आयपीएल’च्या स्पर्धेत सर्व संघातील बलाढ्य खेळाडू आपले शक्तिप्रदर्शन करत होते. विविध देशांतील नामवंत खेळाडूंचा समावेश असतानाही भारताच्या या दोन्ही नवख्या खेळाडूंचे वर्चस्व या स्पर्धेत पाहायला मिळाले. केवळ ऋतुराज गायकवाड आणि हर्षल पटेलच नव्हे, तर व्यंकटेश अय्यर, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, के. एस. भरत आणि यशस्वी जयस्वाल या नवख्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या शर्यतीत आपणही असल्याचे सिद्ध केले. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळविण्यासाठी अनेक खेळाडू सध्या शर्यतीत आहेत. ‘आयपीएल’नंतर त्यात आणखीन भर पडली असून, आगामी काळात भारतीय संघाच्या निवड समितीपुढे यामुळे अनेक खेळाडूंचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
 

एक नव्हे अनेक...

 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मालामाल करणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मात्र, केवळ आर्थिक बाबतीतच नव्हे, तर अन्य बर्याच बाबतीत ही स्पर्धा भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाची स्पर्धा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या स्पर्धेत प्रत्येक संघाला एका सामन्यादरम्यान केवळ चारच परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी आहे. संघातील इतर सर्व खेळाडू हे भारतीय असण्याची अट बंधनकारक आहे. संघातली ११ पैकी सात खेळाडू हे भारतीय असतात. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान भारतातील अनेक प्रतिभावंत नवख्या खेळाडूंनाही संधी मिळते. नव्या खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केल्यानंतर निवड समितीकडून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात येते. येथे उत्तम प्रदर्शन केल्यानंतर त्यांचे करिअर घडते. असे अनेक खेळाडू आहेत की, ज्यांनी ‘आयपीएल’मध्ये आधी उत्तम प्रदर्शन केले आणि त्यानंतर त्यांना भारतीय क्रिकेट संघाची द्वारे खुली झाली. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन याचे उदाहरण यासाठी घेता येईल. चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळण्यास अश्विनने सुरुवात केली. आपल्या पहिल्याच स्पर्धेदरम्यान अश्विनने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संघात त्याची निवड झाली आणि एकेकाळी कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू म्हणूनही तो ओळखला जाऊ लागला. केवळ अश्विनच नव्हे, तर हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, युझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आदी बर्याच क्रिकेटपटूंसाठी ‘आयपीएल’मध्ये उत्तम कामगिरी केल्याने त्यांना आंतरराष्टीय क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळाली. त्यामुळे ‘आयपीएल’ केवळ आर्थिक बाबतीतच नव्हे, तर नवख्या खेळाडूंना आपले करिअर घडविण्यासाठी या माध्यमातून एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ खेळाडूच नव्हे, तर कर्णधार, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, टीम मेंटॉर आदींच्या बाबतीतही ‘आयपीएल’मुळे आजच्या घडीला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’ हे भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे असून, याकडे केवळ आर्थिक बाबीतून नव्हे, तर इतरही बाबींतून डोळसपणे पाहण्याची गरज असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांनी मांडले आहे.
 
- रामचंद्र नाईक 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121