नोकरी-धंदा गेल्याने नैराश्य; तर बरे झालेले रुग्णही औषधोपचाराअभावी पुन्हा मनोरुग्णालयात
ठाणे: राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयापैकी सर्वात जुने अशी ओळख ठाणे मनोरुग्णालयाची आहे. ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे ठाण्यात राहतो, असे म्हटल्यावर लागलीच संशयी नजरेने पाहत जणू ठाणे म्हणजे वेड्यांचे शहर, असेही गंमतीने म्हटले जात असे. कोरोनामुळे लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’काळात या मनोरुग्णालयात मनोरुग्ण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाआधी ७०० रुग्ण होते, तर आता ९७४ रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदडे यांनी दिली आहे. कोरोनाकाळात नोकरी-धंदा गमावल्यामुळे आलेले नैराश्य, तसेच ‘लॉकडाऊन’मुळे औषधोपचार मिळू न शकल्याने बरे झालेले रुग्णही पुन्हा रुग्णालयात दाखल झाले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधून गेल्या वर्षी बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. कोरोनाकाळात ‘लॉकडाऊन’ असल्याने बरे झालेल्या रुग्णांना नातेवाईक आपल्या घरी घेऊन गेले होते. मात्र, पुन्हा या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ‘लॉकडाऊन’चा गंभीर परिणाम रुग्णांवर झाला आहे.
कोरोना येण्याच्या आधी एकूण ७०० रुग्ण होते, त्यामधील १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, यामधील काही रुग्ण पुन्हा अमली पदार्थांच्या आहारी गेले होते. त्यांना ‘लॉकडाऊन’मध्ये नशेचे पदार्थ न मिळाल्याने त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे निरीक्षण मनोरुग्णालयातीत डॉक्टरांनी नोंदविले आहे, तसेच ‘लॉकडाऊन’मुळे वाहतुकीची साधने नसल्याने औषधोपचाराअभावी अनेक जण पुन्हा मनोरुग्ण अवस्थेत परतले. दुसरीकडे ‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांच्या नोकर्या गेल्या. हाताला काम नसल्याने नैराश्य येऊन अनेकांवर परिणाम झाला. ‘अनलॉक’नंतर अशांना मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
‘लॉकडाऊन’चा परिणाम
कोरोनाच्या आधी रुग्णाची परिस्थिती उत्तम होती. मात्र, पुन्हा ‘अनलॉक’च्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यानंतर रुग्णालयात पुन्हा रुग्णांचा ओघ वाढला आहे. कोरोनाआधी ७०० रुग्ण होते, त्यापैकी १५० रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, आता पुरुष रुग्ण ५९३ आणि स्त्री रुग्ण ३८१ असे एकूण ९७४रुग्ण वाढले आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या रुग्णांना अमली पदार्थ न मिळाल्याने संतप्त झाल्याचे दिसून आले आहे. नोकर्या गेल्याने आत्महत्येची वृत्ती अनेकांमध्ये वाढली हे चिंताजनक आहे. -डॉ. संजय बोदडे, वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णालय, ठाणे