नवी दिल्ली : भारतीय केंद्रीय मंत्रालयाने मेड इन चायनाचे तब्बल ५९ अॅपवर भारतात बंदी घातली. भारत-चीन तणावामधील हे भारताचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे पाऊल ठरले. यामध्ये ‘टिक-टॉक’सारख्या बहुचर्चित अॅपचादेखील समावेश होता. यावर आता चीनची पहिली प्रतिक्रिया जगासमोर आली आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजीयन यांनी याबद्दल सांगितले की, “भारताने उचललेल्या या पावलानंतर संपूर्ण चीन देश हा चिंतेत आहे. या सर्व घटनांच्या परिस्थितीची पडताळणी सुरू आहे.”
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असून ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे म्हणत चीनच्या ५९ अॅपवर देशामध्ये बंदी घालण्यात आली. वापरणाऱ्यांची माहितीचोरी, माहितीचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे ५९ अॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला दणका दिला. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय अॅप्सचाही समावेश आहे. याबाबत चीनची ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.