४ मे पासून कोरोनावरील नवीन मार्गदर्शक सूचना; काही सवलतींसह लॉकडाउन वाढू शकेल!
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी प्रथम देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. नंतर ही मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली. आता तो कालावधीही संपत आलेले आहे. हा लॉकडाऊन संपणार की नाही नाही? असा प्रश्न सामान्यांना पडत असतानाचा गृह मंत्रालयाकडून एक नवीन सूचना जारी करण्यात आली. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, ४ मेपासून कोरोनावरील नवीन मार्गदर्शक तत्त्वे अंमलात येतील. याचा अर्थ असा की, ३ मे नंतरही लॉकडाउनमधून पूर्णपणे सुट दिली जाणार नाहीय. मात्र लॉकडाऊन काही सवलतींसह वाढविला जाऊ शकतो.
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोविड १९ लढा देण्यासाठीचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे ४ मेपासून अंमलात येतील ज्यामुळे अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील तपशील येत्या काही दिवसांत कळविला जाईल.’ एमओएचएने लॉकडाऊन परिस्थितीबाबत सर्वसमावेशक आढावा बैठक घेतली असून, आतापर्यंत लॉकडाऊनमुळे परिस्थितीत प्रचंड फायदा झाला असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे गृह मंत्रालयाने म्हंटले आहे.
बुधवारी संध्याकाळी गृह मंत्रालयाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटकांना आपापल्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली. परंतु यासाठी यासाठी राज्याची संमती आवश्यक असल्याचेही गृहमंत्रालयाने म्हंटले आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, केवळ बसेसद्वारे इतर राज्यांत जाण्याची परवानगी देण्यात येईल आणि घरी पोहोचल्यानंतर प्रवाशांना अलगीकरणात राहणे बंधन कारक असणार आहे.