शांतिदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

nitin sonavne_1 &nbs




राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार नव्या पिढीला समजेल आणि रुजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालत जगभ्रमंती करणार्‍या शांतिदूत नितीन सोनवणे या तरुणाबद्दल..


गेल्यावर्षी भारताने राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी केली. जगभरातील अनेक विद्यापीठात ’गांधी विचारां’चा अभ्यास केले जात आहे. ’गांधी विचारा’चे महत्त्व नवीन पिढीला रुजेल आणि समजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून ते पोहचवले जात आहेत. गांधीजींनी नुसते विचार मांडले नाही तर ते स्वत: अंगिकारले. त्यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’हे त्यांनी प्रथम स्वत:वर केले. सेवाग्राम आश्रमात आजही त्याची प्रचिती येते. आजही असंख्य तरुण त्यांच्या शांती व अहिंसा या संदेशाचे आचरण करत जगभरात त्यांचा प्रसार करण्यात गुंतले आहे. अशाच एका नितीन सोनवणे या तरुणाबद्दल.



अवघ्या २९ वर्षीय नितीन सोनवणे गेल्या ३ वर्षांपासून महात्मा गांधींच्या शांततेचा संदेश जगभरात पोहोचविण्याचे काम करत आहे. नितीन मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गावचा. नितीनचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण कर्जत येथील हे महात्मा गांधी महाविद्यालयीत झाले. नितीनच्या घरची परिस्थिती बेताचीच, वडिलांच्या निधनानंतर घरचा सर्व भार एकट्या आईवर होता. घरची परिस्थिती पाहता नितीनच्या दोन्ही भावांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले. नितीनने मात्र शिकून समाजासाठी काहीतरी करायचे असा निश्चय सुरुवातीपासूनच केला होता. पुढे पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच त्याला नोकरीही लागली; परंतु यात तो अधिक रमला नाही. सामाजिक कार्याचा उदात्त हेतू बाळगून एका नव्या जीवशैलीच्या शोधात नितीन निघाला. यादरम्यान त्याचा परिचय 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' या संस्थेशी झाला. या संस्थेच्या माध्यमातून अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहवासात नितीनमध्ये महात्मा गांधींच्या विचारांची प्रेरणा रुजली. याच प्रेरणेने भारावून त्याने महात्मा गांधींचा अहिंसेचा व शांतीचा संदेश जगभरात पोहोचविण्याचा निर्णय घेतला. खरंतर घरची हलाखीची परिस्थिती बघता नितीन अभियंता झाल्यावर आपल्याला घराला हातभार लावेल, अशी नितीनच्या आईची आशा होती. परंतु नितीनचा हा निर्णय व त्यामागची प्रेरणा लक्षात घेता मोठ्या धीराने त्याच्या आईनेही त्याला या कार्यासाठी परवानगी दिली. गरिबीत जगणार्‍या या आईला आपला मुलगा थोर महात्म्याच्या विचारांचा जगभरात प्रचार करत आहे याचे कौतुक आहे. आणि येथूनच नितीनच्या प्रेरणादायी प्रवासास सुरुवात झाली.




nitin sonawane_1 &nb



नितीन म्हणतो की, आपल्याला महाविद्यालये, शाळा व विद्यापीठांतून महात्मा गांधींचे जीवनकार्य शिकविले जाते. परंतु ते इतके प्रभावी आणि पुरेसे नाहीत. आपल्याला गांधीजींबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे आणि ती इतरांना देणे गरजेचे आहे. २ऑक्टोबर २०१६ला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून नितीनने या प्रवासाला सुरुवात केली. पुढे संपूर्ण महाराष्ट्र, मग देश असं मजल दरमजल करत त्याने देशाच्या सीमा ओलांडल्या. हा संपूर्ण प्रवास तो काही ठिकाणी सायकलवरून तर काही ठिकाणी चालत करतो. आजपर्यंत त्याने 38 देशांची सफर करत हा शांतीचा संदेश जगभरात पोहोचवला आहे. भारत, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, हाँगकाँग, मकाऊ, जपान (२महिने टोक्यो ते हिरोशिमा), दक्षिण आफ्रिका, अमेरिका, मेक्सिओ, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टारिका, पनामा, कोलंबिया, इक्वाडोर, पेरू आदी अनेक देशांत त्याने सायकलवरून प्रवास केला. तर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रुवांडा, युगांडा, केनिया इथिओपिया, सुदान, इजिप्त, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन आणि सध्या जॉर्जियात त्याने पायी चालत गांधीजींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. या प्रवासात तो दररोज २५ ते 30 किलोमीटर पायी प्रवास करतो.




nitin sonawane_2 &nb



महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांच्या विचारसरणीचा प्रभाव असणार्‍या या तरुणाला जगभरात फिरत असताना आजपर्यंत असंख्य लोक भेटले. या लोकांवर त्यांच्या जीवनशैलीवर महात्मा गांधींच्या व गौतम बुद्धांच्या विचारांचा असणारा प्रभाव पाहता मला भारतीय असण्याचा अभिमान वाटल्याचे नितीन सांगतो. जपानमध्ये महात्मा गांधींची पुस्तके टेलिव्हिजनवर वाचली जातात. त्यांना शांततेचे महत्व पटवून दिले जातात. मी निप्पोंझन मायहोजी येथे वास्तव्यास असताना तेथील बौद्ध भिक्कूच्या डोळ्यात मला तो आदर दिसला. निप्पोंझन मायहोजी हे जपानमधील बौद्ध पंथ आहेत. त्यांचे संस्थापक फुजी गुरुजी गांधीजींचे मित्र होते. तेथील भिक्खूसोबत नितीन फिरला तसेच जपानी बौद्ध मंदिरामध्येच राहला. या भिक्खू आणि मंदिरातील लोकांनी त्याला आदर दिला. तसेच आयर्लंडमध्ये एका वयस्कर आजींनी गांधींच्या हत्येची बातमी लहानपणी ऐकल्याची घटना सांगताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू नितीनला आजही स्मरणात आहे.



nitin sonawane_1 &nb


परदेशात जेव्हा नितीन विद्यापीठांमध्ये ’शांती संदेश’ देण्यासाठी जातो, तेव्हा तेथील विद्यार्थ्यांमध्ये त्याला गांधीजींच्या विचारांबाबत जाणून घेण्याची प्रचंड इच्छाशक्ती दिसली. आफ्रिकेत नितीनने ११महिने पदयात्रा केली. दक्षिण आफ्रिकेत २०१८-१९ मध्ये गांधींची १५०वी; तर नेल्सन मंडेलांची १००वी जयंतीच्या निमित्ताने त्याने पदयात्रा केली. आजही तेथे महात्मा गांधींचे अस्तित्व असल्याचे नितीन सांगतो. गांधीजींनी अनेक वर्षांपूर्वीच पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाबाबत महत्त्व समजून याबाबत मौलिक विचार मांडले. याच विचारांनी प्रेरित होऊन ’जागतिक शांतता आणि मैत्री आंदोलन’च्या माध्यमातून हा संदेश जगभरात पोहोचविणार्‍या नितीन सोनवणे या तरुणाला दै. मुंबई तरुण भारतचा सलाम!


@@AUTHORINFO_V1@@