नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामींवर बुधवारी रात्री झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात केंद्रीय गृहराज्य मंत्रालयानेदेखील याप्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला.
ते म्हणाले की, पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर हल्ला आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर काल रात्री हल्ला हा आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. भारतीय माध्यमाचे स्वातंत्र्य व अभिव्यक्तीवर झालेला हल्ला आहे. याचा तीव्र निषेध करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.
दरम्यान काल रात्रीच्या सुमारास रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर २ युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. अर्णब आणि त्यांची पत्नी स्टुडिओमधून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला केला गेला. गणपतराव कदम मार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी अर्णब गोस्वामी यांची गाडी अडवत हा हल्ला केला. यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न देखील केला गेला. शिवीगाळ करत हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकून मारल्या. यामुळे संपूर्ण देशभरातून कॉंग्रेसच्या या गुंडशाहीबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.