अहमदनगर : महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला असून अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोघे परदेशी नागरिक असून दिल्लीतील 'मरकज'मध्ये सहभागी झाले होते.
नगरच्या आरोग्य विभागाने काही संशयित रुग्णाच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ५१ रुग्णांचे अहवाल मिळाले असून सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या नव्या सहा कोरोना रुग्णांपैकी दोघे परदेशी असून एक इंडोनेशिया व दुसरा जिबुटीचा नागरिक आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्या मुकुंदनगर भागातील दोन व संगमनेर येथील दोन, अशा स्थानिक असणाऱ्या चार नागरिकांचा अहवाल सुद्धा ‘करोना पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.नगरमधील सहा नव्या रुग्णांचा समावेश झाल्याने राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३४१ वर पोहोचला आहे.