सुधारित कृषी कायदे रद्द करू नका; हरियाणातील शेतकर्यांचे केंद्र सरकारला पत्र
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात ‘भारत बंद’ची हाक विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांनी दिलेली असतानाच लाखो शेतकरी या कायद्यांचे समर्थन करत असल्याचेही समोर आले आहे.
हरियाणातील १.२० लाख शेतकर्यांनी सुधारित कृषी कायदे रद्द न करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे. या शेतकर्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले असून सुधारित कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द न करण्याची मागणी केली आहे. शेतकर्यांच्या मागणीनुसार कृषी कायद्यात बदल जरूर करावा. मात्र, कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी या पत्रातून शेतकर्यांनी केली आहे. केवळ पत्र लिहिण्यापुरते मर्यादित न राहता हरियाणाच्या फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्सच्या (एफपीओएस) शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने दि. ७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेत याबाबत लेखी निवेदनही दिले आहे.
कृषी कायद्याला अनेक शेतकरी संघटनांचा गेल्या काही दिवसांपासून कडाडून विरोध होत आहे. याविरोधात ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली असतानाच ७ डिसेंबर रोजीच हरियाणातील लाखो शेतकर्यांनी या कायद्याचे समर्थन केल्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये मतप्रवाह बदलण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.