नवी दिल्ली : सुधारित कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणार्या काही शेतकर्यांचे मनपरिवर्तन झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर शेतकर्यांनी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय रविवार, दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे घेतला. दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा शेतकर्यांनी खुली झाली असली तरी अन्य काही ठिकाणी शेतकरी आंदोलनावर ठाम असल्याचे चित्र कायम आहे.
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे गेल्या 12 दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकर्यांनी शनिवार, दि. १२ डिसेंबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीदरम्यान यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग रविवार, दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे खुला करण्यात आला. नोएडाहून दिल्लीला जाणार्या मार्गावरील बॅरिकेट्स रविवारी पहाटे हटवण्यात आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. चिल्ला सीमा बंद झाल्यामुळे वाहनचालकांना दिल्लीला जाण्यासाठी डीएनडी आणि कालिंदी कुंजमधून जावे लागत होते.यावेळी शेतकर्यांच्या शिष्टमंडळाच्यावतीने संरक्षणमंत्र्यांसमोर १८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्य मागणी शेतकरी आयोग स्थापन करण्याची आहे. किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) मागण्यांमध्ये उल्लेख नाही. आमच्या नेत्यांनी संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्र्यांची भेट घेतली. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे, म्हणून आम्ही मार्ग मोकळा केला आहे, असे एका शेतकरी नेत्याने सांगितले.
इतर ठिकाणी आंदोलन कायम
दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरील आंदोलन शेतकर्यांनी मागे घेतले असले तरी राजधानी दिल्लीत अन्य ठिकाणी सुरु असलेले शेतकर्यांचे आंदोलन कायम आहे. काही ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. सोमवार, दि. १४ डिसेंबर रोजी काही ठिकाणी शेतकर्यांकडून सामूहिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते कमलप्रीत पन्नू यांनी दिली. हजारो शेतकरी राजस्थान सीमेवरुन ट्रॅक्टर मार्च काढून दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करतील, असे ते म्हणाले. पंजाबमधून येणार्या शेतकर्यांना रोखले जात आहेत. शेतकर्यांना दिल्लीपर्यंत पोहोचू द्या. सरकारने १९ डिसेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिवसापासून आमरण उपोषण सुरू करू, असे शेतकरी नेते गुरनामसिंग चारुनी म्हणाले.