नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच भंभेरी उडाली आहे. अशामध्ये पाकिस्तानचे नेते आणि खेळाडूही या मुद्द्यावरून काहींना काही वक्तव्ये करत आहे. यासंदर्भात अनेक वेळा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये पंतप्रधान इम्रान खानच्या रॅलीमध्ये असेच चिथावणीखोर भाषण आफ्रिदीने केले.
"काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत आहे. आपल्या सगळ्यांना अधिक सावध राहायला हवे. जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, तोपर्यंत आपल्यावर जुलूम होत राहणार. पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर जगभरात आवाज उठवला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच, या रॅलीमध्ये सर्वानी सहभागी व्हा." असे यावेळी आफ्रिदीने सांगितले. जम्मू काश्मीरमधून भारताने ३७० रद्द केल्यानंतर अनेकवेळा शाहिद आफ्रिदीकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहे. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने वेळोवेळी त्याच्यावर कडाडून टीका केली आहे. आफ्रिदीला प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करण्याची हौस असेल तर त्याने राजकारणात उतराv, असेही गंभीरने आफ्रिदीला सुनावले होते.