जगाचे बाकी काहीही होवो, ते काहीही विचार करो, आपला विचार, आपला देश, आपली जमीन हेच सर्वोच्च असा हा आत्मकेंद्री विचार. अजूनही चीन त्याच पुरातन भूमी पादाक्रांत करण्याच्या मानसिकतेत अडकलेला दिसतो.
चिनच्या धूर्तपणाविषयी कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नसावीच. कारण, या देशाची एकूणच वागणूक कायमच संशयास्पद आणि बेभरवशाची राहिली आहे. त्यामुळे चीनचे आज जागतिक स्तरावरील मित्रत्व हे दिखाऊ आणि व्यापारी गरजांची पूर्तता करणारेच. पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. एखाद्या देशाला मदत करा, त्यांची संसाधने वापरा आणि त्या देशाला भिकेला लावा, हीच चीनची व्यापारयुगातील रणनीती. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या इतर देशांच्या जमिनी, समुद्र यांवरही मालकी हक्क मिरवण्यात चीन सदैव अग्रेसर. एकूण १४ देशांबरोबर चीनच्या सीमा लागून आहेत. पण, जवळपास या सगळ्याच देशांबरोबर इतर ४ अशा मिळून एकूण १८ देशांबरोबरही चीनचे काही ना काही सीमावाद आजही कायम आहेत. कारण, चीनलाही ते सोडवण्यात रस नाही, उलट या देशांनीच आपल्या मालकीची जमीन बळकावल्याचे, समुद्रावर कब्जा केल्याचे चीन उच्चरवाने सांगत असतो. भारत, तिबेट, भूतान बरोबरच जपान, उत्तर कोरिया, म्यानमार या देशांशीही चीनचे सीमावाद आहेतच. रशिया, नेपाळसारख्या देशांबरोबर असलेले सीमावाद चीनने करारान्वये मिटवल्याचे वरकरणी दाखविले असले तरी चिनी सीमेवर सर्व काही अजूनही आलबेल नाही. मंगोलिया, पाकिस्तानच्या सीमेवर सध्या इस्लामिक कट्टरवाद्यांनीही चीनविरोधात आघाडी उघडल्याचे चित्र आहे. पण, केवळ चिनी दडपशाहीमुळे या देशात नेमके चाललेय तरी काय, हे कळायचा मार्ग नाही.
चिनी सरकार त्यांच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये वेळोवेळी अशा धाडी मारून हजारो नकाशे जप्त करते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काडीमात्र फरक पडत नसला तरी चिनी विद्यार्थी, नागरिक यांच्या मनावर सातत्याने तिबेट असो तैवान अथवा अरुणाचल प्रदेश हे त्यांच्याच मालकीचे प्रदेश असल्याचा चुकीचा इतिहास बिंबवला जातो. साहजिकच, यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांचे संबंधही खराब होऊ शकतात पण, चीनलाही या सगळ्याशी काहीही देणेघेणे नाही. उलट, सार्वभौमत्वाचा दाखला देत, चीनने आंतरराष्ट्रीय नकाशालाही न जुमानण्याचा खुजेपणा कित्येक वर्षांपासून दाखवला आहे. जगाचे बाकी काहीही होवो, ते काहीही विचार करो, आपला विचार, आपला देश, आपली जमीन हेच सर्वोच्च असा हा आत्मकेंद्री विचार. अजूनही चीन त्याच पुरातन भूमी पादाक्रांत करण्याच्या मानसिकतेत अडकलेला दिसतो. म्हणूनच, जे अस्तित्वात नाही, जे जमिनी सत्य नाही, ते नकाशातही खपविण्याचीही चीनची तयारी नाही. त्यामुळे चीनचे असे हे द्वेषमूलक वागणे भविष्यातही बदलण्याची शक्यता तशी धूसरच असली तरी भारताने या पूर्वेच्या शत्रूपासूनही सावध राहायलाच हवे!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat