नागपूर : नुकतेच सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पूर्णपणे क्लीनचिट दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. परंतु यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. वेळ पडल्यास आपण या प्रकरणात मध्यस्ती अर्ज करू अशी भूमिकाही फडणवीस यांनी घेतली आहे. पत्रकार परिषद देऊन अनेक बाबी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या.
"लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल केलेले शपथपत्र हे जुन्या शपथपत्राच्या पूर्णत: विसंगत आहे. याद्वारे सिंचन घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहेत ." असा आरोप फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. "अजित पवार दोषी असल्याचा एसीबीकडे पुरावा नाही असे म्हणणे म्हणजे दिशाभूल करण्यासारखेच आहे. त्यांना जेवढी सोईची आहे तितकीच आणि किंबहुना त्रोटत माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे." असे पुढे फडणवीस यांनी सांगितले आहे.