गेल्या महिन्यात फेसबुकने चोरट्यांनी ५ कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे अकाऊंट चोरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. त्यानंतर कंपनीच्या संबंधित अधिकार्यांनी याबाबतची सविस्तर माहिती मागवली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर फेसबुकच्या उपाध्यक्षांनी डेटा चोरीला गेल्याची माहिती ब्लॉगद्वारे दिली. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी दीड कोटी वापरकर्त्यांची नावे, संपर्काचा तपशील चोरला तर, १ कोटी ४० लाख वापरकर्ते असे आहेत, ज्यांची नावे आणि संपर्काशिवाय त्यांच्या प्रोफाईलशी संबंधित माहिती चोरली आहे. यात वापरकर्त्याचे नाव, लिंग, भाषा, धर्म जन्मतारीख, शिक्षण आणि त्यांनी शेवटच्या १० ठिकाणी दिलेल्या भेटीची माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही माहिती चोरीला जाणे म्हणजे फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या डोक्यावर फुकटचा सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यासारखे आहे. कारण शेवटच्या १० ठिकाणी संबंधित वापरकर्त्याने नेमके काय केले, हे त्याच्या अनुमतीशिवाय कोणीतरी त्रयस्थ पाहात आहे, त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे आता फेसबुक वापरकर्त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरच गदा येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फेसबुकमध्ये विविध प्रकारचे जन उपयोगी अॅप असल्याने जगभरातील असंख्य लोकांनी आपले फेसबुक अकाऊंट सुरू केले. मात्र, त्याची सुरक्षा राखण्यात आणि आपल्या ग्राहकांना ती सुरक्षा प्रदान करण्यात फेसबुक अपयशी ठरल्याचे या वृत्तावरून दिसून येते.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात बराक ओबामा केवळ फेसबुक आणि इतर साधनांच्या मदतीने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा इतिहास आहे. असे असताना फेसबुकची लोकप्रियता किती अफाट आहे, याची जाणीव होते. तसेच त्यावर होणारे लिखाण आणि प्रसारित होणारे छायाचित्र हे जागतिक जनमानसाचा वेध घेते, हेही वेळोवेळी दिसून आलेले आहे. त्यामुळे अशा प्रभावी माध्यमाची सुरक्षा ऐरणीवर येणे, हे सामाजिक शांतीच्या दृष्टीने घातकच म्हणावे लागेल. आता चोरी झालेला डेटा येणार्या काळात आपले रंग दाखविल्याशिवाय राहणार नाही. तसेच, त्यातून काही संघर्ष निर्माण झाल्यास संशयित ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रादेखील घेऊ शकतात. त्यासाठी पुरावा म्हणून या डेटा चोरीचा दाखला ते न्यायालयात सादर करू शकतात. त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळून ते सुटण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. वापरकर्ता स्त्री आहे की पुरुष याचीही चोरी झाल्याने नाहक बदनामीच्या अनेक घटना यापुढील काळात उघडकीस आल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच, धर्म, जात, पंथ या माहितीचीही चोरी झाल्याने भारतासारख्या अठरापगड जातींच्या देशात काही वाद उद्भवल्यास त्याचे दायित्व कोण स्वीकारणार? हा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/