शिक्षणव्रती शुक्राचार्य

    01-Jun-2025   
Total Views | 12
शिक्षणव्रती शुक्राचार्य
घरातील गरीबीवर मात करत शिक्षणावर श्रद्धा ठेवून शिक्षणाचा ध्यास घेत अनेक पदवी घेणार्या आणि महाविद्यालयात प्राचार्य ते बँकेच्या संचालकपदापर्यंत झेप घेणार्या शुक्राचार्य गायकवाड यांच्याविषयी...


शुक्राचार्य यांचा जन्म दि. १ जून १९४८ रोजी भिवंडीतील एका छोट्याशा गावात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने बालपण कष्टातच गेले. शुक्राचार्य यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, त्यांच्या वडिलांनी त्यांना आदिवासी कुटुंबांकडे गुरे सांभाळण्यासाठी पाठविले. त्यांना या कामातून वर्षाला २० रुपये आणि एक जोडी कपडे मिळत असत. पण म्हात्रे सरांनी शुक्राचार्यांना काम करताना पाहून विचारले, "तु येथे का आला आहेस? तु घरी परत जा आणि मला आईची आठवण येते असे वडिलांना सांग.” म्हात्रे सरांनी दिलेला सल्ला ऐकून शुक्राचार्य पुन्हा घरी परतले. त्यानंतर त्यांनी शिक्षणाची कास पकडली.

शुक्राचार्य यांना शिक्षणासाठी घरातून विरोध नव्हता पण, परिस्थितीमुळे त्यांना काम करणे भाग होते. त्यांनी गावात काम करून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे ते तीन-चार किमी पायी प्रवास करून ते शाळेसाठी भिवंडीत आले. दगडी शाळेत त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सहावीला त्यांनी अंबरनाथ येथील वसतिगृहात प्रवेश घेतला. आठवीला ते पुन्हा भिवंडीत ‘पद्मश्री’ पी. डी. जाधव शाळेत आले. त्याठिकाणी एकाच वसतिगृहाची सोय होती. या वसतिगृहात राहण्याची आणि खाण्याचीही सोय होत असे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्कदेखील आकारले जात नसे. शुक्राचार्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण भिवंडीत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ‘वांद्रे स्कूल ऑफ आर्ट्स’ येथे चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षण पूर्ण होताच त्यांना १९७४ मध्ये ठाण्यातील नाखवा हायस्कूल येथे नोकरीही मिळाली. शुक्राचार्य यांना नोकरी मिळाली. पण, शिक्षणाचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे दहा वर्षांनी त्यांनी शिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा केला. सुरुवातीला त्यांची अकरावी जुन्या अभ्यासक्रमानुसार झाली होती. त्यामुळे त्यांनी नव्या अभ्यासक्रमानुसार पुन्हा अकरावीचे शिक्षण घेतले. एम.एच. हायस्कूल, ठाणे येथे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरी आणि शिक्षण असा त्यांचा प्रवास सुरूच होता. एम.जी. बेडेकर महाविद्यालयातून त्यांनी पदवीही घेतली. पुढे ‘एमए’ उल्हासनगरच्या आर.के.टी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पेंढरकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.


१९८६ ते २००६ सालापर्यंत त्यांनी पेंढरकर महाविद्यालयात नोकरी केली. कवी पी. सावळाराम यांनी शुक्राचार्य यांना पेंढरकर महाविद्यालयात, तर कवी प्रविण दवणे यांना साधना महाविद्यालयात जाण्याचा असा सल्ला दिला होता. शुक्राचार्य यांची मुलाखत झाली, त्याच दिवशी आकाशवाणीवर त्यांचा काव्यवाचन कार्यक्रम प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्यांची पेंढरकर महाविद्यालयात लगेचच निवड झाली. मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. दरम्यान १९७१ साली त्यांनी हिंदी शिक्षकपदाची सनद घेतली होती. ‘डीएचई’ म्हणजे डिप्लोमा इन हायर एज्युकेशन हा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला होता.


शुक्राचार्य यांचे वडील बाळू हे इतरांच्या शेतात मोलमजुरी तर, आई रखमाबाई यादेखील सुईणीचे आणि मोलमजुरीचे काम करत असत. घरात एक बहीण आणि तीन भाऊ अशी पाच भावंडे होती. सर्व भावंडांमध्ये उच्च शिक्षण हे केवळ शुक्राचार्य यांनीच घेतले. गायनातून शुक्राचार्य यांना थोडाफार पैसे मिळत ते पैसे शिक्षणासाठी त्यांनी शिक्षणासाठी वापरले. १९७४ साली त्यांचा शशिकला यांच्याशी विवाह झाला. शशिकला यादेखील ‘बीए’ पदवीधारक होत्या. त्यामुळे लग्नानंतरही त्यांनी शुक्राचार्य यांना शिक्षण घेण्यास कधी अडवले नाही. संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी, शुक्राचार्य यांना शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिले. शुक्राचार्य यांना सुदेश आणि संदेश अशी दोन मुले आहेत. पुढे त्यांनी २००७ आणि २००८ साली सेवानिवृत्तीनंतर ‘एमए इन पाली’ आणि ‘एमए इन मराठी’ या पदव्यांच्या मार्फत दोन विषयांचे ज्ञान घेतले. ‘डिप्लोमा इन बुद्धिझम आणि विपश्यना’ याचे शिक्षणदेखील त्यांनी घेतले आहे.


शुक्राचार्य यांनी इयत्ता सहावीत असताना एक कविता लिहिली होती, त्यावेळी भाषा अशुद्ध होती. ते पुस्तक ‘निंबार’ १९९२ साली प्रकाशित झाले. या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी पाच हजार रुपये खर्च येणार होता. पाच हजार रुपयांचे कर्ज काढण्यासाठी डोंबिवली नागरी बँकेत शुक्राचार्य गेले. त्याचवेळी त्यांना ’डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या संचालकपदी काम करण्याची संधी चालून आली. त्यांनी १९९६ ते २००१ सालापर्यंत बँकेच्या संचालकपदाचे काम सेवा म्हणून केले. आतापर्यंत त्यांची काव्य, वैचारिक, नाटक, एकांकिका, संपादित आणि चरित्रात्मक अशी ६० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची विविध विषयांवर २ हजार, १८८ भाषणेही प्रसिद्ध झाली आहेत. ‘बौद्ध साहित्य प्रसार संस्थे’चे संस्थापक अध्यक्षही शुक्राचार्य असून, त्यांची तीन संमेलने झाली आहेत. त्यांपैकी एक भीमा-कोरेगाव पुणे, कळवा, जळगाव येथेही संमेलन झाली आहेत. शुक्राचार्य यांनी कळव्याच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेे. शुक्राचार्य यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षणावर श्रद्धा ठेवून शिक्षणाचा ध्यास घेणार्या शुक्राचार्य यांच्या पुढील वाटचालीसाठी दै‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121