१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान
08-May-2025
Total Views | 14
मुंबई : ( Maharashtra State Rural Improvement Mission honored in 100day office improvement program ) १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याचे प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार आणि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयांच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणण्यासाठी १०० दिवसांचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाचा उद्देश शासकीय कार्यालयांना अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे हा होता. विविध मापदंडांच्या आधारे या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱया कार्यालयांचे भारतीय गुणवत्ता परिषद आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडून मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (एमएसआरएलएम) राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालयाची पहिल्या पाच मध्ये निवड झाली आहे.
त्यामुळे मंत्रालयात बुधवारी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाचा नसून, अभियानातील प्रत्येक सदस्य आणि ग्रामीण भागातील जीवनोन्नतीसाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आहे, असे मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. अभियानाने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. आता कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात मिळालेल्या या यशामुळे अभियानाची कार्यक्षमता अधिक वाढेल आणि ते अधिक प्रभावीपणे आपले उद्दिष्ट साध्य करु शकतील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.