मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vyomika Singh Sofia Qureshi) पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत या ऑपरेशनची संपूर्ण माहिती दिली. दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदल यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. विशेष म्हणजे, भारताने ऑपरेशन सिंदूर प्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित करून जगाला महिला शक्तीचा संदेश दिला आहे.
हे वाचलंत का? : भारताच्या एअर स्ट्रईकमध्ये हाफिज अब्दुल मलिक आणि मुद्दासिर ठार!
सोफिया कुरेशी - वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती
कर्नल सोफिया कुरेशी वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाल्या. सोफिया यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्या १९९९ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात भरती झाल्या. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिल्यास ती देखील लष्करीच आहे. अशी माहिती आहे की, त्याचे आजोबा सैन्यात होते. तसेच त्यांची पतीसुद्धा लष्करी अधिकारी आहेत. सोफिया या लष्कराच्या शांती स्थापना अभियानाशी जोडलेल्या आहेत. पंजाब सीमेवरील ऑपरेशन पराक्रम आणि ईशान्येकडील पूर मदत कार्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. याशिवाय, पुण्यात १८ देशांचे मिळून 'एक्सरसाइज फोर्स १८' आयोजित करण्यात आले होते. या ऑपरेशनमधील ४० अधिकाऱ्यांमध्ये सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या.
व्योमिका सिंग - लहानपणापासून आकाशात उंच भरारी घेण्याची इच्छा
विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांना लहानपणापासून आकाशात उंच भरारी घेण्याची इच्छा होती. व्योमिका शब्दाचा अर्थच म्हणजे आकाशाशी जोडलेला. त्यांच्या नावामुळे त्यांच्या आकांक्षा आणखी बळकट झाल्या. त्यांनी एससीसीमधून आपला प्रवास सुरु केला आणि अभियांत्रिकी केल्यानंतर त्या सैन्यात भरती झाल्या. व्योमिका या सैन्यात सहभागी होणाच्या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहेत. भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती झाली आणि २०१९ मध्ये फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले. त्यांनी जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता सारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत. व्योमिका सिंग यांनीही अनेक बचाव कार्यात भाग घेतला आहे. २०२१ मध्ये, माउंट मणिरंगवरील त्रि-सेना महिला गिर्यारोहण मोहिमेचा त्या भाग होत्या. या मोहिमेतून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.