- सात्यकी सावरकर यांची मातृवंशावळ तपासण्याचा अर्ज फेटाळला
31-May-2025
Total Views | 77
नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटल्यात सात्यकी सावरकर यांची मातृवंशावळ तपासण्याची विनंती करणारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अर्ज पुणे येथील विशेष आमदार – खासदार (एमपी/एमएलए) न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे खटल्यास वेगळे वळण देण्यासाठी नथुराम गोडसेचा आधार घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील विशेष एमएपीए/एमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विनायक दामोदर सावरकर बदनामी खटल्यातील तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या मातृवंशाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणूनबुजून लपवल्या आहेत – विशेषतः ते महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे धाकटे भाऊ गोपाळ विनायक गोडसे यांचे नातू आहेत; त्यामुळे त्यांची मातृवंशावळ तपासण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) अमोल शिंदे यांनी राहुल गांधी यांचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. आढळून आले की आरोपीने तक्रारदाराकडून त्याच्या आईवडिलांचा म्हणजेच आई हिमानी यांचा वंशावळ मागितली आहे.
आरोपीने म्हटले आहे की श्रीमती हिमानी अशोक सावरकर या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम विनायक गोडसे, ज्यांना फाशी देण्यात आली होती; त्यांचे धाकटे भाऊ गोपाळ विनायक गोडसे यांची मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांची वंशावळ आवश्यक आहे.
मात्र, न्यायालयास असे आढळून आले की हा खटला केवळ आरोपीने लंडनमध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध केलेल्या कथित बदनामीकारक भाषणाशी संबंधित आहे. हे प्रकरण दिवंगत श्रीमती हिमानी अशोक सावरकर यांच्याशी संबंधित नाही किंवा त्यांची वंशावळ वादग्रस्त नाही. त्यामुळे, आरोपीच्या अर्जात न्यायालयास कोणतेही तथ्य आढळून आले नसून हा अर्ज फेटाळण्यात येत आहे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
राहुल गांधी न्यायालयात येण्यास घाबरतात – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीरांचे नातू
सावरकर मानहानी खटल्यामध्ये राहुल गांधी यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज करून आपली मातृवंशावळ, अर्थात गोडसेंची वंशावळ तपासण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. आपण त्याविषयीची माहिती लपविल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयावने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
हा खटला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राहुल गांधी यांनी मानहानी केल्यासंबंधीचा आहे. संबंधित आरोपी हा न्यायालयास घाबरत असून त्यामुळे न्यायालयात उपस्थित न राहण्यासाठी विविध कारणे देण्यात येत आहेत. हा खटला आपण अखेरपर्यंत लढणार असून राहुल गांधी यांचा खटल्यात पराभव होईल, असा विश्वास सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केला आहे.