जयपूर : (PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
"जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल..."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी बिकानेर येथे पोहोचल्यावर नल विमानतळावर उतरलो, याच विमानतळाला पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये त्यांना अजिबात यश आले नाही. मात्र, भारताच्या अचूक लष्करी हल्ल्यांमुळे सीमेपलीकडील पाकिस्तानच्या रहीम यार खान हवाई तळाचे नुकसान होऊन त्याच्या परिचालनावर गंभीर परिणाम झाला असल्याने तो अनेक दिवसांकरिता बंद ठेवणे पाकिस्तानला भाग पडले आहे, तो कधी उघडला जाईल माहिती नाही. आता पाकिस्तानबरोबर ना व्यापार होणार ना ही चर्चा, जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे सुरूच ठेवले तर त्यांना जबर आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. भारत आपल्या वाट्याचे पाणी पाकिस्तानला मिळू देणार नाही तसेच भारतीयांच्या जीवाशी खेळ केल्यास त्याचीही जबरदस्त किंमत मोजावी लागेल, हा भारतीयांप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठीचा निर्धार आहे, आम्हाला या संकल्पापासून रोखू शकत नाही." असेही त्यांनी नमूद केले.
"सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा"
पंतप्रधानांनी यावेळी एका महत्त्वपूर्ण योगायोग सांगत आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली. पाच वर्षांपूर्वी बालाकोट हवाई हल्ल्यानंतरही त्यांची पहिली जाहीर सभा राजस्थानमध्ये झाली होती. योगायोगाने, आत्ताच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, त्यांची पहिली सभा पुन्हा राजस्थानच्या बिकानेरमध्ये झाली. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले 'सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दुंगा, देश नहीं झुकने दूंगा' आणि आज पुन्हा राजस्थानच्या भूमीमधून देशातील नागरिकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, जे लोक सिंदूर मिटवण्यासाठी आले होते. त्यांना आम्ही मातीत गाडलं आहे. ज्यांनी भारतीयांचे रक्त सांडले त्यांच्याकडून रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला आहे”, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\