संघटित हिंदूशक्तीसाठी...

    02-May-2025
Total Views | 15
 
Dinesh Bharti
 
‘संघटित हिंदूशक्ती’ ही काळाची गरज आहे, हे सत्य ओळखून त्यासाठी कार्यरत माटुंगा, मुंबईचे दिनेश भारती यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
१९८० चे दशक होते. गुजरात दंगलीने होरपळला होता. संचारबंदी लागणे नित्याचेच होते. याच काळात रा. स्व. संघाचे अत्यंत साधी राहणीमान असलेले एक तरुण प्रचारक अहमदाबादला आले होते. किशोरवयीन संघ स्वयंसेवकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी स्वयंसेवकांना सांगितले, “तुम्हाला जे प्रश्न आहेत, ते विचारा.” त्यावेळी त्या सर्वच स्वयंसेवकांचे प्रश्न समान होते; ते म्हणजे होणार्‍या दंगली. या दंगलींमध्ये नित्यनियमाने हिंदूंवरच अत्याचार होतात. त्यांच्यावर होणारा हा हिंसक अन्याय कधी आणि कसा बंद होणार? या स्वयंसेवकांनी दंगलींमध्ये अत्याचारांनी होरपळलेल्या बांधवांबद्दल त्या प्रचारकांना सांगितले.
 
ते शांतपणे ऐकताना त्या प्रचारकांच्या डोळ्यांत एकाचवेळी अश्रू, दुःख, संताप आणि निर्धार होता. सगळ्यांचे बोलणे झाल्यावर प्रचारकांनी उत्तर दिले, “जोपर्यंत हिंदू जात, भाषा, प्रांतवादामध्ये विभागला आहे, तोपर्यंत त्याचा गैरफायदा घेतला जाणारच! त्याच्यावर अत्याचार होणारच! या सगळ्याला एकच उत्तर आहे; हिंदू समाजाने सर्व प्रकारचे भेद मिटवून संघटित व्हायला हवे. त्यासाठी आपण स्वतःपासून प्रयत्न करू. समाज, धर्म आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या हिंदूंनी संघटित व्हायलाच हवे!” त्या प्रचारकाचा निर्धार तिथे उपस्थित असलेल्या किशोरवयीन संघ स्वयंसेवकांना आयुष्यभराची प्रेरणा देणारा ठरला. त्या किशोरवयीन स्वयंसेवकांमध्ये दिनेश भारती हेसुद्धा होते आणि हो, ते प्रचारक होते नरेंद्र मोदी!
 
तर, हिंदू म्हणून आपण जातपात, वर्ण, वंश, प्रांत न मानता, ‘हिंदू’ म्हणून संघटित राहिले पाहिजे. हे विचार मनापासून स्वीकारण्यासाठी आणखी एक घटना कारणीभूत होती. प्रचारकांशी संवाद होण्याआधी एक-दोन वर्षांपूर्वीच दिनेश भारती यांच्यासोबत ती घटना घडली होती. त्यावेळी ते शाळेत होते. मित्रांसोबत शाळेत जात असताना रस्ता ओलांडणार, इतक्यात समोरच्या रस्त्यावरून एक भलामोठा जमाव आला. या घोळक्याने दुचाकीवरून येणार्‍या एका माणसाला थांबवले. त्याचे कपडे उतरवायला लावले. त्या जमावातील पुढे असलेले लोक तुच्छतेने थुंकत म्हणाले, “साला ये तो काफिर हैं।” तो माणूस गयावया करत होता; जीवाची भीक मागत होता. पण, लोकांनी त्या माणसाची निर्दयीपणे हत्या केली आणि उन्मादात पुढे निघून गेले.
 
क्षणार्धात हे सगळे पाहून दिनेश जागच्या जागी थबकले. हे का? कशासाठी? हिंदू होता म्हणून त्या माणसाला असे पशुसारखे कापले? हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी जर धर्मांध संघटित होतात, तर हिंदूंनी कुणावर अत्याचार करण्यासाठी नव्हे, तरी निदान स्वसंरक्षणासाठी एकत्रित यायलाच पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटू लागले. ही संकल्पना व हा विचार त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला. ‘हिंदू आहे ना, मग तो माझा बांधव’ या एकाच विचाराचा प्रचार-प्रसार त्यांनी केला. नुकतेच दिनेश भारती हे ‘प्रिन्सिपल चीफ कर्मशियल मॅनेजर’चे ‘पीएस’ (पर्सनल सेक्रेटरी, रेल्वे) या पदावरून निवृत्त झाले आहेत. रेल्वेमध्ये प्रदीर्घ नोकरी करताना, ते अनेक वर्षे ‘एससीएसटी असोसिएशन रेल्वे’ या संघटनेचे कोषाध्यक्षही होते. या संघटनेमध्ये काम करण्यामागेही त्यांची एक भूमिका होती. ती म्हणजे शोषित-वंचित समाज गट किंवा संधी न मिळालेल्या समाजघटकांना चिथावण्यासाठी अनेक विघातक शक्ती काम करत असतात. भोळ्या-भाबड्या समाजबांधवांचे मन कलुषित करतात. तसेच, अनेकदा समाजबांधवांवर अन्याय होतो.
 
पण, हा अन्याय नेहमीच जातीय विखाराने होत नाही, तर त्याला इतरही अनेक पदर असतात. पण, असे जरी असले, तरी समाजविघातक शक्ती प्रत्येक घटनेला जातीयतेचे रूप देते आणि समाजात द्वेष पसरवते. या सगळ्यांना उत्तर द्यायचे, तर समाजात राहून काम करायला हवे. यासाठीच दिनेश या संघटनेचे काम करू लागले. या संघटनेच्या मदतीने त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांच्या सुविधा सवलतींसाठी काम केले. तसेच, निवृत्तिवेतन असू दे की, प्रलंबित इतर कामे असू दे, या सगळ्यांचा पाठपुरावा ते करत असत. दिनेश यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया.
 
दिनेश भारती यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशच्या हाथरसचे. मात्र, कामानिमित्त मुलचंद भारती हे अहमदाबाद, गुजरातला आले. मग तिथेच रेल्वेत नोकरी करू लागले. त्यांची पत्नी कमलादेवी या गृहिणी. दोघेही शिवभक्त. अत्यंत धार्मिक. या दोघांना पाच अपत्ये. त्यांपैकी एक दिनेश. हे कुटुंब ज्या वस्तीत राहायचे, ती निम्न स्तराची वस्ती. दोन वेळेचे अन्न मिळाले, तरी सौभाग्यच. कष्ट करत राहायचे. मात्र, मुलचंद यांचे विचार वेगळे होते. त्यांना वाटे, मुलांनी शिकावे. ते अत्यंत समाजशील होते. गुजरातमध्ये नियमित होणार्‍या दंगलींमुळे त्यांनाही हिंदूएकतेचे महत्त्व पटले होते. त्यामुळेच लहानपणी केवळ खेळण्याच्या उद्देशाने दिनेश जेव्हा रा. स्व. संघाच्या शाखेत गेले, तेव्हा मुलचंद यांनी मत व्यक्त केले की, “आजची समाजाची परिस्थिती पाहता, मुलांनी रा. स्व. संघाच्या शाखेत जायलाच हवे.” त्यामुळे दिनेश शाखेत जाऊ लागले.
 
पुढे पदवीनंतर खासगी नोकरी करू लागले. ब्राह्मण समाजाच्या नीता यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला, जो त्याकाळी सहज होणे शक्य नव्हते. विवाहानंतर त्यांना रेल्वेची नोकरी लागली. ‘स्टेनो टायपिस्ट’ पदावरून ते रेल्वेच्या वरिष्ठ पदावर रुजू झाले. ते म्हणतात, “हिंदू समाजाची संघटनशक्ती वाढणे गरजेचे आहे. समाजात समरसता निर्माण होण्यासाठी मी खारीचा वाटा उचलणार आहे.” दिनेश भारती यांच्या समरसतेच्या कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
अग्रलेख
जरुर वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121