नवी दिल्ली:संसदेत उल्लेखनीय योगदान देणार्या 17 खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार 2025’साठी निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार संसदेत सक्रिय सहभाग, वादविवादात सहभाग, प्रश्न विचारणे आणि कायदेविषयक कामात योगदान याआधारावर दिले जातात.
देशातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा ‘संसदरत्न’ पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह सात खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो.
संसदेत प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक कामात योगदान आणि समित्यांमधील कार्य या विविध निकषांवर आधारित विशेष मूल्यांकनानंतर ही निवड केली जाते. या पुरस्कारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली आहे.
महाराष्ट्रातील खा. स्मिता वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट), श्रीरंग बारणे (शिवसेना), नरेश म्हस्के (शिवसेना), अरविंद सावंत (शिवसेना- उबाठा)आणि वर्षा गायकवाड (काँग्रेस) या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये खा. स्मिता वाघ (भाजप), अरविंद सावंत (शिवसेना - उबाठा), नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), रवि किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरण महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठौर (भाजप), सी. एन. अन्नादुरई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे.
दोन संसदीय समित्यांचाही सन्मान
यावर्षी दोन संसदीय स्थायी समित्यांनाही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. भर्तृहरी महताब अध्यक्ष असलेले ‘वित्त स्थायी समिती’ला हा पुरस्कार मिळाला असून या समितीने संसदेला आर्थिक धोरणांवरील अनेक प्रभावी आणि अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले आहेत. तसेच, चरणजित सिंग चन्नी अध्यक्ष कृषी स्थायी समितीचीही दखल घेण्यात आली असून या समितीने शेतकर्यांच्या समस्या आणि कृषी सुधारणांवर ठोस सूचना संसदेत मांडल्या आहेत.