मुंबई : संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या दाव्याला मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांचा अतिरेकी असा उल्लेख करत त्यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.
संजय राऊतांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून मोदी आणि शाह यांच्याबद्दल अनेक दावे केले आहेत. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "संजय राऊतांना लिहिण्याला आणि बोलण्याला किती महत्व द्यावे? त्यांना कुणीही सिरियस घेत नाही. सकाळ झाली की, त्यांचा भोंगा सुरु असतो. युद्ध सुरु असताना संपूर्ण देश सेनेच्या आणि मोदीजींच्या पाठीशी उभा होता. अशावेळी ते मोदींनी राजीनामा द्यावा असे म्हणतात. त्यामुळे आता कळतच नाही की, त्या अतिरेक्यांशी लढावं की, या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं, हा मोठा प्रश्न आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांचे कुणीही ऐकत नाही. ते वाट्टेल ती बडबड करत असतात. युद्ध सुरु असताना मोदींनी आणि अमितभाईंनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणतात. सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलतात. त्यामुळे राऊतांना कुणीही आता गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या आणि आपल्या विचारांना तिलांजली दिलेल्या शिवसेनेसोबत आम्ही आहोत. त्यांची अवस्था आज काय झाली आहे हे सर्वांना माहिती आहे," असेही गिरीश महाजन म्हणाले.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. परंतू, त्याआधीच या पुस्तकातील काही मजकूर पुढे आला असून यात राऊतांनी मोदी आणि शाहांबद्दल अनेक दावे केले आहेत. शिवाय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.