२७ वर्षांपूर्वी पहलगामसारखाच हल्ला झाला होता हिमाचलमध्ये, दहशतवाद्यांकडून ३५ हिंदू मजुरांची हत्या

    01-May-2025   
Total Views |

Chamba Massacre 1998
 
Chamba Massacre 1998 : मंगळवार दि. २२ एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. ज्यानं संपूर्ण देश हादरला. तब्बल २६ पर्यटकांचा या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालाय तर २० हून अधिक जण जखमी आहेत. खरंतर जम्मू-काश्मीर खोरं हे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखलं जातं. पण या नंदनवनाला देशाच्या स्वातंत्र्यापासूनच रक्तरंजित घडामोडींचा शाप मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. याच काश्मीरच्या दक्षिणेला लागून असलेला प्रांत म्हणजे हिमाचल प्रदेश. ज्याला देवभूमी म्हणून ओळखलं जातं. २७ वर्षांपूर्वी याच हिमाचलमध्ये पहलगामसारखा इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला होता, दहशतवाद्यांनी ३५ हिंदूंची अमानुषपणे कत्तल केली होती. हा हल्ला हिमाचलमधील हिंदूंना भळभळती जखम देऊन गेला. काय आहे १९९८ च्या दहशतवादी हल्ल्याची कहाणी? जाणून घेऊयात
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरलाय. आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगाचा परिणाम असा झाला की ही बातमी क्षणार्धात जगभरात पसरली. मात्र २७ वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती ज्यानं देशाला हादरवून टाकले. १९९८ मध्येही असंच काहीसे घडलं होते. २ ऑगस्ट १९९८ ची काळरात्र, हिमाचल प्रदेशच्या शांत टेकड्यांमध्ये वसलेलं चंबा शहर, या शहरातील कालाबन आणि सतरूंडी परिसरात दहशतवाद्यांनी ३५ हिंदू मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. चंबाच्या इतिहासातील त्या दुर्दैवी रात्रीच्या जखमा अजूनही त्या रात्री जगलेल्यांना आठवतात. या दुर्घटनेचा तिथल्या जनसमुदायावर खोलवर परिणाम झाला आणि त्याचे पडसाद दोन दशकांहून अधिक काळानंतरही आजही जाणवतात. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्हा हा काश्मीरच्या सीमेशी जोडलेला, त्यामुळे काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादाचा परिणाम हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही दिसून आला. नव्वदच्या दशकात काश्मीर दहशतवादाच्या आगीत जळत होते आणि काश्मीरमधील हिंदू पंडितांचं स्थलांतर होत होते. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसरातही दहशत पसरवली होती.
 
हल्ल्याच्या दिवशी, चंबामधील दुर्गम जंगलपहाडी भागात रस्ता बांधण्याचे काम हे मजूर करत होते. दुर्गम भागात रस्ताबांधणी केली, तर इथे लोकांची वर्दळ वाढेल. तसेच, स्थानिक लोकांचाही बाहेरच्या समाजाशी संपर्क वाढेल. त्यामुळे या दुर्गम भागाचा विकास होऊच नये, अशी दहशतवाद्यांची भूमिका. त्यामुळे इथे विकासकामांमध्ये मजुरीचे काम करणार्‍या निष्पाप गरीब मजुरांवर ते झोपेत असताना गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी दहशतवाद्यांनी फक्त हिंदूंना लक्ष्य केले आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मुस्लिम कामगारांना सोडून ३५ हिंदूं कामगारांना ठार मारले. त्या गरिब कामगारांचे सामानही लुटण्यात आले. इतकेच काय तिथे विकासकामांसाठी लागणारी जी काही साधनं होती, तीसुद्धा लुटून नेण्यात आली. हे लुटलेले सामान उचलून नेण्यासाठी दहशतवाद्यांनी सहा जणांना बंधक बनवले. त्यापैकी एकाला दहशतवाद्यांनी सोडून दिले; पण बाकीच्या पाच बंधकांचे काय झाले, हे त्यानंतर कुणालाच कळले नाही. त्यांचा ठावठिकाणा आजपर्यंत कळू शकलेला नाही. यामध्ये ज्या बंधकाला दहशतवाद्यांनी सोडले होते, ती व्यक्ती स्थानिक मुस्लीम समाजातली होती. पुढे या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणार्‍यांची धरपकड करण्यात आली. त्यावेळी या हल्ल्यासाठी काही स्थानिक मुस्लीम व्यक्तींनी दहशतवाद्यांना सहकार्य केले होते, हे उघड झाले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली होती.
 
या हल्ल्यानंतर, त्या शहीद कामगारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १४ सप्टेंबर २०१४ रोजी त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं. भावी पिढ्यांना या भयानक हल्ल्याची जाणीव व्हावी आणि त्या कामगारांच्या हौतात्म्याचे स्मरण करता यावे म्हणून घटनेच्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले. या स्मारकावर हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये असे सांगितले आहे की सतरुंडी गावात दहशतवाद्यांनी ९ हिंदू मजुरांची हत्या केली आणि कलावन गावात २६ हिंदू मजुरांची हत्या केली. हे कामगार चंबा जिल्ह्यातील एका दुर्गम भागात साच पास मार्गावर रस्ता बांधकामाच्या कामात गुंतले होते. रात्रीच्या अंधारात हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला निघृणपणे गोळ्या घातल्या. या निष्पाप कामगारांनी कोणत्याही राजकारणात भाग घेतला नव्हता किंवा कोणताही संघर्ष सुरू केला नव्हता. ते फक्त त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काम करत होते. त्यांचा एकमेव गुन्हा असा होता की ते जम्मू आणि काश्मीरच्या सीमेजवळ काम करत होते आणि त्यातही ते हिंदू होते.
 
या हल्ल्यानं तिथल्या स्थानिक समुदायाला हादरवून टाकलं होतं. या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या व्यक्तींसंबंधित खटला गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अनुत्तरित आहे. काळ उलटून गेला तरी, त्या रात्रीचं दुःख अजूनही पीडित कुटुंबियांच्या हृदयात सलतंय. बरेच जण अजूनही निकालाची वाट पाहतायत. पहलगामच्या हल्ल्यानंतर चंबावासीयांच्या १९९८ च्या हल्ल्याच्या वाईट आठवणी निश्चितच डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या असतील.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\