अबू आझमींना औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे!
जिहाद्यांची वळवळ चालू देणार नाही; कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची अबू आझमींवर टीका
04-Mar-2025
Total Views |
मुंबई : ( Nitesh Rane on Abu Azmi ) कुणाला औरंगजेबाची एवढी आठवण येत असेल तर त्यांना त्याच्या कबरीच्या बाजूला जागा झोपवले पाहिजे, अशी टीका मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमींवर केली. अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केल्याने राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले असून मंगळवार, ४ मार्च रोजी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "कुणाला औरंगजेबाची आठवण येत असेल तर त्याच्या कबरीच्या बाजूला जागा खोदून देऊ. औरंग्याने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केलेत, ते छावा चित्रपटाच्या निमित्ताने अख्ख्या जगाने पाहिले आहेत. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती. तेव्हा सेक्युलर वगैरे विषय नव्हता. इस्लामच्या विरोधात छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदू विरुद्ध मुसलमान असा तो विषय असल्याचे जेवढ्या लवकर जिहादी मानसिकतेच्या लोकांना कळेल तेवढे त्यांना औरंग्याचे स्वप्न पडणार नाहीत," अशी टीका त्यांनी अबू आझमी यांच्यावर केली.
"औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना मारत असताना त्यांना त्यांचा धर्म बदलायला सांगितला. तेव्हा मी माझा धर्म बदलणार नाही, असे महाराजांनी त्याला स्पष्ट केले. पण अबू आझमींसारखे लोक आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असून आमच्या हिंदुत्ववादी सरकारच्या काळात आम्ही त्यांची ही वळवळ चालू देणार नाही. हा विषय देशद्रोहाच्या पलिकडचा आहे. त्यामुळे अबू आझमींना औरंगजेबाच्या बाजूला झोपवणे, यापेक्षा मोठी कोणतीही कारवाई होऊ शकत नाही," असेही ते म्हणाले.
सेक्युलर शब्द काँग्रेसचाच
"औरंगजेब हा इस्लाम पसरवणारा राजा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मूळ मसुद्यात सेक्युलर हा शब्द नव्हता. पुढे काँग्रेसनेच सेक्युलर शब्द आणला. औरंगजेब हा फक्त इस्लाम वाढवण्यासाठी राज्य करत होता," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.