आनंद दिघेंची संपत्ती किती? धर्मवीरांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न
06-May-2024
Total Views |
मुंबई : उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांची संपत्ती कुठे आणि किती आहे, असा प्रश्न विचारला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. सोमवारी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी एका खोट्या प्रकरणात माझं नाव गोवण्याचं कारस्थान केलं. मी कधीही कोणाकडे पद मागितलं नाही. आनंद दिघे साहेबांनी मला उभं केलं. मी एका दुख:द प्रसंगात असताना ते माझ्या पाठीशी उभे होते. दिघे साहेबांना कायम त्रास दिला गेला. ते आमच्याजवळ व्यक्त करायचे. दिघे साहेबांना बाळासाहेबांएवढी लोकप्रियता मिळाली होती. पण त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. राजीनामा द्या म्हणून त्यांना फर्मान आलं होतं. मग कुणीतरी सांगितलं की, दिघे साहेबांचं पद काढलं तर एकही माणूस तुमच्यासोबत राहणार नाही. सगळे त्यांच्यासोबत जातील. मग ते थांबले," असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
"दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी मला विचारलं की, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? त्यावेळी मला आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत असं वाटलं. पण शेवटी नाईलाजाने काम करावं लागलं," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, बाळासाहेबांचे विचार, धनुष्यबाण आणि महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत आहेत. त्यांना बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण नको आहेत. त्यांना फक्त पैसे हवे आहेत. शिवसैनिकांच्या खात्यातील ५० कोटी रुपये त्यांनी घेतले," असेही त्यांनी सांगितले.